सदानंदगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : सिंधुदुर्ग

उंची : २७५ फुट

श्रेणी : मध्यम

फोंडा घाटात उगम पावणारी आचरा नदी साधारण ६० कि.मी.प्रवास करत आचरा येथे अरबी समुद्राला मिळते. समुद्रापासून साधारण ३५ कि.मी.आत आचरा नदीकाठी असलेले साळशी गाव मध्ययुगीन काळात बंदर म्हणुन प्रसिध्द होते. बंदराहुन घाटावर जाण्यासाठी फोंडाघाट हा जवळचा घाटमार्ग होता. या साळशी गावामागे असलेल्या झाडीभरल्या टेकडीवर सदानंदगड नावाचा अपरीचीत व दुर्लक्षीत किल्ला आहे. इतिहासाच्या पानात साळशी व सदानंदगड नावाने क्वचित आढळणारा हा किल्ला अलीकडील काळापर्यंत कोणाला माहीत नव्हता. आजही या किल्ल्याची माहिती अनेकांना नाही. ब्रिटीश ग्याझेटमध्ये देखील या किल्ल्याची नोंद दिसुन येत नाही. सदानंदगडला जाण्यासाठी साळशी हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव कणकवली पासुन २० कि.मी.अंतरावर असुन साळशी व अलीकडील कुवळे गावातुन गडावर जाण्यासाठी वाटा आहेत. या मार्गावर एस.टी. सेवा मर्यादीत असल्याने स्वत:चे वाहन सोयीचे पडते. ... साळशी व कुवळे या दोन्ही वाटांनी गडावर जाण्यासाठी साधारण एक तास लागतो. गडावर असलेल्या दाट झाडीमुळे वाट चुकण्याची शक्यता असल्याने सोबत वाटाड्या असणे गरजेचे आहे. विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी त्याने माणसाच्या मनातील भीतीवर मत केली नाही याची जाणीव आम्हाला साळशी गावात झाली. भर दुपारी दोन वाजता साळशी गावात जाऊन १०-१२ जणांना विनंती करूनही भुताखेतांच्या भीतीने कोणीही सोबत गडावर येण्यास तयार झाले नाही. त्यांनी उद्या सकाळी आल्यास आम्ही केवळ वाटेपर्यंतच सोडु सांगितल्याने आमचे गडावर जाणे झाले नाही. साळशी गावात पावणाई व सिद्धेश्वर हि दोन सुंदर मंदिरे असुन पावणाई मंदिराच्या आवारात दोन उलट पुरलेल्या तोफा पहायला मिळतात. मंदीर परिसरात मोठया प्रमाणात नवीन जुन्या समाधी दिसुन येतात. साळशी हे प्रमुख शहर व व्यापार पेठ असल्याने साळशी गावामागे असलेल्या डोंगरावर करवीरकर संभाजीराजे यांनी १७३० मध्ये सदानंदगड बांधला अथवा याची पुनर्बांधणी केली असावी. आदिलशाही काळात १५७० साली साळशीचा ठाणेदार खान असल्याचा उल्लेख येतो. त्यानंतर आदिलशाही सरदेशमुख जानातराव यांच्या ताब्यात असलेला साळशी महाल इ.स. १६६१ ते ६४ दरम्यान मराठयांच्या ताब्यात आला. त्यानंतर १६८५ दरम्यान सरदार चंद्राजी घाटगे यांनी साळशी गावातील देवस्थानाला सनद दिल्याचा उल्लेख येतो. राजाराम महाराजांच्या काळात एप्रिल १६९३ मध्ये साळशीची सरदेशमुखी रामचंद्रपंत अमात्य यांना देण्यात आली. सन १७०७ मधील मराठा राज्याच्या वाटणीनंतर सावंत करवीरकराना सामील झाले पण शाहु महाराजांना आपण त्यांच्याशी एकनिष्ठ असल्याचे सांगत त्यांच्याकडून साळशी महालाचे अर्धे उत्पन्न वसुलीची सनद घेतली. २३ एप्रिल १७३१ रोजी झालेल्या वारणेच्या तहानुसार साळशी ते अंकोलेपर्यंतचा प्रदेश करवीर करांच्या ताब्यात आला व या काळातच सदानंदगड बांधला गेला. इ.स.१७३२ साली फोंड सावंतानी सदानंदगडावर हल्ला केला पण अमात्यांचे सरदार गोपाळ रामराव यांचे सैन्य आल्याने सावंतानी माघार घेतली. इ.स.१७५६ मधील तुळाजी आंग्रे यांच्या पराभवानंतर त्याच्या अमलाखालील साळशीचे अर्धे वतन पेशव्यांच्या ताब्यात आले पण लवकरच सावंतानी हा प्रदेश ताब्यात घेतला. इ.स.१७८५ साली पेशवे व करवीरकर यांच्या संयुक्त स्वारीत सावंतांचा पराभव झाला व साळशी महाल पेशव्यांच्या ताब्यात आला. इ.स. १८०५ साली चिटकोपंत हे पेशव्यांचे साळशी येथील अमंलदार होते. इ.स.१८१८ साली साळशी महाल इंग्रजांच्या ताब्यात आला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!