रवळ्या

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : नाशिक

उंची : ३९७० फुट

श्रेणी : मध्यम

महाराष्ट्रात आढळणारी दुर्ग विविधता इतरत्र कोठेही आढळत नाही आणि म्हणुनच महाराष्ट्राला दुर्गाचा देश म्हणुन ओळखले जाते. नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात सातमाळ डोंगररांगेत रवळ्या जवळ्या हे असेच दोन किल्ले आपल्याला एका पठारावर पहायला मिळतात. हे किल्ले साधारण ३.५ कि.मी. लांब व १.५ कि.मी.रुंद अशा मोठ्या पठारावर वसलेले दोन स्वतंत्र किल्ले आहेत. या दोन किल्ल्यांमधील अंतर साधारण १ कि.मी. असुन पठार चढुन आल्यावर एका दिवसात हे दोन्ही किल्ले पाहुन होतात. मुळाणे व बाबापुर हि या दोन्ही किल्ल्याच्या पायथ्याची गावे असुन या दोन गावाच्या मध्ये असलेली मुळाणे बारी किंवा बाबापुर खिंड येथुन या किल्ल्यांवर जाण्यासाठी सोयीचा मार्ग आहे. याशिवाय मुळाणे गावातुन देखील किल्ल्याखालील पठारावर जाता येते. नाशीकहुन वणीमार्गे बाबापुर खिंड हे अंतर ५३ कि.मी.असुन वणीपासुन हे अंतर ९ कि.मी.आहे. ... वणीहुन बाबापूर मार्गे या खिंडीत आल्यास डावीकडील वाट मार्कंडेय किल्ल्यावर जाते तर उजवीकडील वाट रवळ्या जवळ्या खालील पठारावर जाते. खिंडीत वनखात्याने पर्यटन निवारा उभारला असुन वाहनतळाची सोय केली आहे. पठारावर जाणारी वाट मळलेली असल्याने चुकण्याची शक्यता नसली तरी दोन्ही गड संपुर्णपणे पहायचे असल्यास बाबापुर गावातुन अनुभवी वाटाड्या घेणे उत्तम. त्यामुळे कमी वेळात संपुर्ण गड व त्यावरील सर्व अवशेष पहाता येतात. उजवीकडील सोंडेवरून पठार चढायला सुरवात केल्यावर साधारण अर्ध्या तासाने समोर पठाराचा दुसरा भाग दिसतो व येथुन वाट डावीकडे वळते आणि परत उजवीकडे वळून पठारावर जाते. वाट जेथुन उजवीकडे त्या ठिकाणी उध्वस्त दरवाजाचे अवशेष पहायला मिळतात. खिंडीतुन पठारावर जाण्यास साधारण एक तास लागतो. रवळ्या जवळ्या किल्ले ओळखण्यात गोंधळ होऊ नये यासाठी मार्कंड्याच्या बाजुस असलेला जवळ्या व धोडपच्या बाजुस असलेला रवळ्या हे लक्षात ठेवावे. पठारावर आल्यावर समोरच त्रिकोणी आकाराचा जवळ्या किल्ला दर्शन देतो. येथुन उजवीकडून तसेच डावीकडुनही रवळ्या जवळ्या मधील खिंडीत जाण्यासाठी वाट आहे. जाताना डावीकडुन गेल्यास व येताना उजवीकडून आल्यास जवळ्या किल्ल्याला संपुर्ण फेरी मारून होते व पठारावरील सर्व अवशेष पहाता येतात. या दोन्ही वाटा पुर्णपणे मळलेल्या आहेत. पठारावर काही ठिकाणी झाडीत लपलेले वास्तुचे अवशेष पहायला मिळतात. किल्ल्याला वळसा घालताना पुर्व बाजुस एका ठिकाणी ८-१० कबर व त्यावर कोरीव दगड दिसुन येतात. या कोरीव दगडावर दिवा ठेवण्याची सोय केलेली आहे. वाटेच्या पुढील भागात खडकात खोदलेले लहान पाण्याचे टाके असुन टाक्यात माती वाहुन येऊ नये यासाठी टाक्याचा डोंगराकडील भाग घडीव दगडांनी बांधुन काढला आहे. गडावर पिण्यायोग्य पाण्याचे हे एकमेव टाके असुन या टाक्यातील पाणी वर्षभर पुरते. टाक्याच्या काठावर दगडी ढोणी असुन काही अंतरावर कोरीव नंदी,शिवलिंग व पादुका पहायला मिळतात. टाक्याच्या वरील बाजुस अजुन एक खोदीव टाके असुन या टाक्यात जमा झालेले पाणी पाझरून खालील टाक्यात येते. टाक्याच्या समोरील बाजुस पठारावर ४-५ घरे असुन हि वस्ती तिवारी वस्ती म्हणुन ओळखली जाते. हे तिवारी सध्या नाशीक येथे राहायला असुन पावसाळ्यात किल्ल्याखालील गावातील गुराखी गुरांसह येथे राहायला असतात. इतर वेळी हि घरे रिकामी असल्याने येथे राहण्याची चांगली सोय होते. पठारावरून इथवर येण्यास पाउण तास लागतो. इथुन समोरच काही अंतरावर त्रिकोणी आकाराचा रवळ्या किल्ला दिसतो. वस्तीकडून रवळ्या किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा आहेत. यातील एका वाट तिवारी वस्तीसमोरील गडाच्या उजव्या सोंडेवरून वर जाते तर दुसरी वाट गड उजव्या हाताला ठेवत झाडीमधून गडाच्या डाव्या सोंडेवरून वर चढते पण ही वाट घसाऱ्याची असल्याने शक्यतो टाळणे योग्य आहे. उजवीकडील सोंडेवरून वर जाणारी वाट मळलेली असुन वळणे घेत घेत ती रवळ्याच्या कड्याखाली पोहोचते व डोंगर उजव्या बाजुला ठेवत या कड्याला चिटकून डावीकडील सोंडेच्या वरील भागात येते. या वाटेवर काही अर्धवट खोदलेल्या गुहा पहायला मिळतात. यातील एक गुहा म्हणजे अर्धवट खोदलेले लेणे असुन या लेण्याचे चार खांब कोरले आहेत. लेणी पाहुन पुढे आल्यावर डावीकडील सोंडेवरून येणारी वाट या वाटेला मिळते. या सोंडेच्या खालील बाजूस पठारावर मोठया प्रमाणात घरांचे तसेच वाड्यांचे चौथरे दिसुन येतात. सोंडेवर आल्यावर काही क्षण आता वर कसे जायचे हा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही कारण इथुन वर जाणाऱ्या पायऱ्या अथवा वाट दिसत नाही. ब्रिटीशानी येथील पायऱ्या तोडल्याने इथून वर जाणारी वाट म्हणजे पायऱ्या नसुन जेमतेम पाउल मावेल अशा खडकात खोदलेल्या खाचा आहेत त्यामुळे हि वाट जरा सावधपणेच चढावी लागते. एकदा चढायला सुरवात केल्यावर वाट आपोआप मिळत जाते. वर चढायला सुरवात करण्यापुर्वी कड्याला चिटकून थोडे पुढे गेल्यावर कातळात खोदलेली एक प्रचंड मोठी गुहा पहायला मिळते. या गुहेचा कड्याकडील भाग खिडकीप्रमाणे कोरलेला असुन पुढील भागात आत शिरण्यासाठी बसुन जाण्याइतपत लहानसा दरवाजा कोरला आहे. या गुहेत काही प्रमाणात पावसाचे पाणी साठले आहे. गुहा पाहुन परत फिरावे व कातळावर चढायला सुरवात करावी. वाटेच्या पुढील भागात कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. पायऱ्या चढून गेल्यावर कातळात कोरलेला किल्ल्याचा लहान भुयारी दरवाजा लागतो. दरवाजाबाहेर उजवीकडील भिंतीवर पर्शियन शिलालेख कोरलेला आहे. यात अलावर्दीखान याने इ.स.१६३६ मध्ये रवळ्या-जवळ्या किल्ले जिंकल्याचा उल्लेख येतो. भुयारी दरवाजाच्या पायऱ्या चढून आपण दरवाजाच्या वरील बाजुस प्रवेश करतो. येथे एक वाट तुटलेल्या पायऱ्यांनी वर जाते तर दुसरी वाट डावीकडे वळते. या वाटेवर वरून येणाऱ्या पाण्याच्या वाटेवर कातळात कोरलेल्या दोन मोठया गुहा आहेत. यातील एक गुहा म्हणजे कोरडे ठणठणीत कोठार असुन दुसरी गुहा म्हणजे पाण्याचे टाके आहे. गुहेचे तोंड घडीव दगडांनी बांधलेले असुन गडावरून पाण्याबरोबर वाहत येणाऱ्या मातीने गाडले गेले आहे त्यामुळे आपल्याला सरपटतच या गुहेत प्रवेश करावा लागतो. गुहा पाहुन तुटलेल्या पायऱ्यांनी माथ्यावर जाताना किल्ल्याचा बुरुज डाव्या बाजूस ठेवत पुर्वाभिमुख उध्वस्त दरवाजाने आपण गडमाथ्यावर प्रवेश करतो. दरवाजाच्या कमानीचा एक दगड आजही तग धरून उभा आहे. किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची ३९७० फुट असुन त्रिकोणी आकाराचा गडमाथा १६ एकर परिसरावर पसरलेला आहे. माथ्यावर आल्यावर एक वाट समोर टेकाडावर किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाकडे जाताना दिसते. वाटेच्या सुरवातीला दोन्ही बाजुस दोन वास्तुंचे चौथरे पहायला मिळतात. वाटेने सरळ गेल्यावर उंचवट्याखाली खडकात खोदलेली तीन टाकी पहायला मिळतात. यातील तिसरे टाके खांबटाके आहे. या टाक्याच्या पुढील भागात अर्धवट तोंड बुजलेले चौथे खांबटाके पहायला मिळते. या टाक्या समोरच कातळात खोदलेले अजुन एक टाके पहायला मिळते. या पाच टाक्यापैकी कोणत्याही टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही.किल्ल्याच्या कडेने फेरी मारताना काही ठिकाणी पठारावर नजर ठेवण्यासाठी असलेल्या चौकीचे अवशेष दिसतात तर दोन ठिकाणी साचपाण्याची तळी दिसतात. याशिवाय जवळ्याच्या दिशेने असलेल्या पठारावर एक अर्धवट बुजलेले टाके दिसते. माथ्यावरून पश्चिमेला जवळ्या त्या मागे मार्कंड्या,सप्तशृंगीगड, कण्हेरगड, मोहनदर तसेच धोडप, कंचना, कोळधेर, राजधेर, इंद्राई असे ८-१० किल्ले नजरेस पडतात. गडमाथा फिरून दरवाजाकडे आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. संपुर्ण किल्ला फिरण्यास एक तास पुरेसा होतो. रवळ्या व जवळ्या हे दोन्ही किल्ले पाहून खाली खिंडीत यायला ७ ते ८ तास लागतात. इ.स.१६३५-३६ मध्ये शहाजहान याने निजामशाही सांभाळणाऱ्या शहाजी राजांचा पाडाव करण्यासाठी खानदौरान, खानजमान व दिलेरखान असे तीन सरदार पाठवले. दिलेरखानावर नाशिक-त्रिंबक या भागातील किल्ले घेण्याची जबाबदारी होती. त्यात अलावार्दीखन या दिलेरखानाच्या हाताखालील सरदाराने इ.स.१६३६ मध्ये हे दोन्ही किल्ले जिंकुन घेतले. रवळ्या किल्ल्याच्या दरवाजावरील शिलालेखात याचा उल्लेख येतो तसेच बादशहानामा या ग्रंथात या किल्ल्यांचा रोला-जोला म्हणुन उल्लेख येतो. इ.स.१६७० साली नोव्हेंबर मध्ये शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सरत लुटली त्या काळात हा किल्ला स्वराज्यात सामील केला. सभासदाच्या बखरीमधील वर्णनानुसार इ.स.१६७१ मध्ये दिलेरखान याने या किल्ल्यांना घातलेला वेढा मोरोपंत यांनी रवाना केलेल्या सैन्याने उधळून लावला. त्यानंतर आलेल्या महाबतखानाने मात्र वेढा घालुन हा किल्ला जिंकून घेतला. पेशवेकाळात हा किल्ला पुन्हा स्वराज्यात आला. इ.स. १८१८ मध्ये कॅप्टन ब्रिग्जने ब्रिटीशांच्या वतीने किल्ला ताब्यात घेतला. १८१९ मध्ये ब्रिटीश अधिकारी म्याकीन्तोष याने किल्ल्याच्या पायऱ्या व तटबंदी तोफ़ा लावुन उध्वस्त केली.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!