माहुली

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : ठाणे

उंची : २६१५ फुट

श्रेणी : मध्यम

मुंबई-ठाण्यापासून जवळ असलेल्या शहापुर तालुक्यात एक दिवसाच्या भटकंतीसाठी माहुली किल्ला हे प्रसिद्ध ठिकाण आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये येणारा हा किल्ला म्हणजे एक दुर्गत्रिकुट असुन माहुली, भंडारगड, आणि पळसगड असे तीन किल्ले मिळून हे दुर्गत्रिकुट झाले आहे. हे तीन किल्ले त्यातील खिंडीमुळे एकमेकापासुन वेगळे झाले असुन मध्यभागी माहुली उत्तरेस पळसगड तर दक्षिणेस भंडारगड अशी याची रचना आहे. या सर्व किल्ल्यांना स्वतंत्र दरवाजे असुन वर जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. यातील मधला माहुली किल्ला आकाराने सर्वात मोठा असुन त्यावरून भंडारगड तसेच पळसगडावर जाण्यासाठी मार्ग आहे. वेळेचे व्यवस्थित नियोजन केल्यास आदल्या दिवशी गडाच्या पायथ्याशी मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर सुरवात केल्यास एका दिवसात तीनही किल्ले व्यवस्थित पाहुन संध्याकाळी पायथ्याशी परतता येते. माहुली, भंडारगड, आणि पळसगड हे तीनही स्वतंत्र किल्ले असल्याने त्यांचे एकत्र वर्णन न देता या तीनही किल्ल्यांचे वेगवेगळे वर्णन केलेले आहे. ... मुंबई -ठाण्यावरून माहुली गडावर जाण्यासाठी ठाणे-नाशीक महामार्गावरील आसनगाव येथुन किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले माहुली गाव गाठावे लागते. मुंबईहुन हे अंतर ७७ कि.मी तर ठाण्याहून हे अंतर ५५ कि.मी. आहे. पर्यटकांना येथे रहाण्यासाठी पर्यटक निवास बांधलेला असुन गावातील गणपती व महादेव मंदिरात राहण्याची सोय होते. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वाडीत एकुण तीन जुनी मंदीरे असुन यातील एक मंदीर गणपतीचे दुसरे शंकराचे तर तिसरे ग्रामदेवतेचे आहे. या मंदिराच्या आवारात काही शिल्प विखुरलेली असुन गावात एक मध्ययुगीन काळातील तलाव पहायला मिळतो. शिवमंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यावर मंदिराच्या मागील बाजुने उजवीकडे एक रस्ता जातो. या रस्त्यावर काही मिनिटाच्या अंतरावर गणेश मंदिर असून मंदीरासमोर असलेल्या हातपंपावर पिण्याच्या पाण्याची सोय होते. गणेश मंदीराच्या आवारात एक दगडी घुमट व अर्धवट तुटलेली विरगळ पहायला मिळते. या पायवाटेने नव्याने बांधलेली कमान पार करत आपण वनखात्याने नव्याने बांधलेल्या पर्यटन केंद्रात पोहोचतो. किल्ल्यावर जाण्यासाठी येथे प्रती व्यक्ती २० रुपये प्रवेश शुल्क भरावे लागते. किल्ल्यावर पर्यटकांची सतत वर्दळ असल्याने वाट मळलेली असुन तुरळक जंगलातुन जाणाऱ्या या वाटेवर बऱ्यापैकी चढण आहे. पर्यटन केंद्रासमोर असलेली टेकडी व ओढा पार केल्यावर आपण सपाटीवर पोहोचतो. या ठिकाणी काही वास्तुंचे अवशेष पहायला मिळतात. पेशवेकाळात माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी सरदारांची कचेरी व वाडे असल्याचे उल्लेख येतात हे बहुदा त्यांचेच अवशेष असावेत. या वाटेने वाटेत २-३ ठिकाणी सोपे प्रस्तरारोहण करत साधारण दोन तासात आपण आपण माहुलीच्या कड्याखाली येतो. कडयाच्या या भागात असलेली किल्ल्याची तटबंदी आजही शिल्लक असुन हा कडा व तटबंदी चढून जाण्यासाठी सुमारे १५-२० फुट उंचीची लोखंडी शिडी बसवली आहे. हि शिडी चढून तटबंदी पार केल्यावर आपला माहुली किल्ल्यात प्रवेश होतो. गडावर येण्यासाठी महादरवाजा, हनुमान दरवाजा, कल्याण दरवाजा, वांद्रे खिंड, पळसगड व माहुली यामधील खिंड असे वेगवेगळे मार्ग आहेत. माहुली गावातुन आपण आलो ती शिडीची वाट हि जरी किल्ल्यावर येणारी अधीकृत वाट नसली तरी सध्या किल्ल्यावर येण्यासाठी हाच सोपा व रुळलेला मार्ग आहे. तटबंदी पार केल्यावर सरळ जाणारी वाट आपल्याला माहुली गडाच्या महादरवाजाकडे नेते. या वाटेने जाताना खडकात खोदलेले एक पाण्याचे टाके पहायला मिळते.या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. या वाटेने ५ मिनिटे चालल्यावर डावीकडे भंडारगडाकडे जाणारा फाटा फुटतो तर त्यापुढे आल्यावर उजवीकडे फाटा फुटतो. येथुन सरळ जाणारी वाट माहुली गडावरील नमाजगीर नावाने ओळखल्या जाणाऱ्या इदगाहकडे जाते तर उजवीकडील वाट खाली उतरत माहुली गडाच्या महादरवाजाकडे जाते. माहुली गडाचा महादरवाजा एका घळीच्या तोंडाशी कातळात कोरलेला असुन त्याला दोन्ही बाजुंनी बुरुजाचे सरंक्षण देण्यात आले आहे. दरवाजावरील कमान कोसळुन पडली आहे. येथे असलेल्या पहारेकऱ्याच्या देवड्या देखील कातळात कोरल्या असुन पावसाळा वगळता इथे १०-१२ जणांची राहण्याची सोय होते. गडाखालील माची गावातुन या दरवाजात येणारा मार्ग काळाच्या ओघात पुर्णपणे नष्ट झाला आहे. दरवाजाबाहेर दोन शरभशिल्प कोरलेल्या शिळा असुन एका शिळेवर कलश व कमळे कोरलेली आहेत. दरवाजा समोरील भागात पिण्याच्या पाण्याचे टाके असुन माहुली किल्ला व पळसगडावरील पिण्याच्या पाण्याचा हा एकमेव स्त्रोत आहे. येथे असलेल्या आंब्याच्या पारावर काही भग्न शिल्प ठेवलेली असुन गाडलेले तुळशी वृंदावन आहे. दरवाजा शेजारील बुरुजावर शिवप्रेमींनी महाराजांची मुर्ती स्थापन केली आहे. महादरवाजाच्या उजव्या बाजुस उत्तरेच्या दिशेने कारवीत हरवलेली पळसगडाकडे जाणारी वाट आहे. या वाटेने १० मिनिटे चालल्यावर वाटेच्या उजव्या बाजुस उंचवट्यावर एका वास्तुचे जोते पहायला मिळते. हि वास्तु म्हणजे किल्लेदाराचा वाडा असल्याचे सांगीतले जाते. येथुन पुढे आल्यावर वाटेला उजवीकडे जाणारा फाटा फुटतो. येथुन सरळ जाणारी वाट माहुली गडाच्या उत्तर टोकावर जाते. या टोकावर चौकीचे तुरळक अवशेष वगळता इतर कोणतेही अवशेष दिसुन येत नाही. येथुन उजवीकडे उतरत जाणारी वाट पळसगडावर जाते. या वाटेने माहुलीगडाची तटबंदी पार करत आपण माहुलीगड व पळसगड यामधील दरीत उतरत जातो. माहुली गडाचा या तटबंदीत असलेला दरवाजा आज पुर्णपणे ढासळला असुन त्याचा केवळ तळातील चौथरा व काही तटबंदी शिल्लक आहे. पळसगडाच्या पश्चिमेला असलेल्या खोर येथुन येणारी वाट दरीमध्ये उतरताना या वाटेला येऊन मिळते. माहुली गडाचा हा भाग पाहुन परत महादरवाजाकडे यावे. आता आपल्याला संपुर्ण माहुली किल्ल्याला फेरी मारायची असल्याने येथील टाक्यातून पुरेसे पाणी घेऊन पुढील भटकंतीस सुरवात करावी. येथुन आपण सुरवातीस पाहिलेल्या भंडारगडाकडे जाणाऱ्या वाटेवर यावे. या वाटेने सरळ निघाल्यावर काही अंतरावर उघडयावर भग्न समाधीचे तीन दगड रचलेले दिसतात. समाधी पाहुन पुढे गेल्यावर वाटेच्या डावीकडे कारवीच्या रानात पायऱ्या असलेला सहा फुट उंचीचा घडीव दगडात बांधलेला एक मोठा चौथरा पहायला मिळतो. कधीकाळी चिरेबंदी असणाऱ्या वाड्याचा आज हा केवळ चौथरा शिल्लक आहे. या चौथऱ्याच्या आसपास अनेक वास्तु अवशेष कारवीच्या रानात लपले आहेत. चौथरा पाहुन पुढे जाताना वाटेतील झाडीत अनेक अवशेष दिसतात. पुढे वाटेवर उभी केलेली एक आयताकृती कोरीवकाम केलेली शिळा पहायला मिळते पण हि शिळा नेमकी कशाची वा कशाबद्दल असावी याचा बोध होत नाही. या शिळेच्या पुढील भागात शिवमंदिर आहे. एका चौथऱ्यावर असलेल्या या मंदिराच्या तीन बाजुच्या भिंती आजही शिल्लक असुन या भिंतीत कोनाडे आहेत. मंदिरात दगडावर कोरलेले शिवलिंग तसेच एक विरगळ असुन काही भग्न झालेली शिल्प ठेवलेली आहेत. मंदिराच्या समोरील भागात कोरडा पडलेला पाण्याचा मोठा तलाव आहे. तलाव पाहुन पुढे आल्यावर वाटेत कबरीवर ठेवला जाणारा कोरीव दगड दिसतो. येथुन पुढे जाणारी वाट टेकाडाच्या दिशेने जाते. हे टेकाड चढुन आल्यावर सरळ जाणाऱ्या या वाटेला उजवीकडे जाणारी एका पुसटशी वाट दिसते. या वाटेने साधारण ५०० फुट आत आल्यावर शोधक नजरने पाहिल्यास उजवीकडे एका मोठया वाड्याचे अवशेष दिसतात. या वाड्यापासून काही अंतरावर चारही बाजुस भिंत असलेले एक कोठार असुन या कोठारात खापराचे तुकडे दिसुन येतात. कोठार पाहुन मुळ वाटेवर परतल्यावर सरळ जाणाऱ्या वाटेला डावीकडे जाणारा फाटा दिसतो. ही वाट माहुलीच्या पुर्व कडयाच्या टोकाशी असलेल्या हनुमान दरवाजाकडे जाते. कडयाच्या दिशेने उतरत जाणाऱ्या या वाटेच्या टोकाला हनुमान दरवाजाचे केवळ अवशेष पहायला मिळतात. या भागात किल्ल्याची ढासळलेली तटबंदी असुन दरवाजा खालील भागात वर येण्यासाठी दोन लोखंडी शिड्या लावलेल्या आहेत. या वाटेच्या कड्यावरील भिंतीत गणपती व मारुतीचे शिल्प कोरलेले आहे. या वाटेने माहुली गावात जाता येते पण स्थानिक वगळता कोणीही या वाटेचा वापर करत नसल्याने वाट मळलेली नाही. येथुन समोरच उभे असणारे भटोबा, नवरा व नवरीचे सुळके तर उजवीकडे वजीरचा सुळका दिसतो. हनुमान दरवाजा पाहुन मुळ वाटेवर परत आल्यावर सरळ जाणारी वाट जांभळाच्या रानातुन गडाच्या दक्षिण टोकावर असलेल्या माहुली आणि भंडारगड मधील खिंडीजवळ पोहोचते. या टोकावरून भंडारगडाची तटबंदी, त्यात वर जाण्यासाठी दगडात कोरलेल्या पायऱ्या व दोन डोंगरामधील खिडीचे सुंदर दर्शन होते. हि खिंड वांद्रे खिंड म्हणुन ओळखली जाते. खिंड पाहुन परत फिरल्यावर आल्या वाटेने न जाता पश्चिम कड्याजवळुन जाणारी वाट धरावी. या वाटेने साधारण २० मिनिटे गडाचा पश्चिमकडा पार करत आपण अर्धवट उध्वस्त झालेल्या वास्तुकडे येतो. हि वास्तु म्हणजे महादरवाजाच्या वरील बाजुस असलेली नमाजगीर इमारत. एका चौथऱ्यावर उभ्या असलेल्या या वास्तुची केवळ पश्चिम बाजुची भिंत उभी असुन या भिंतीत दोन मोठे कमानीदार कोनाडे आहेत. या वास्तुजवळ एक पर्शियन शिलालेख असुन इमारतीच्या चर्या असलेले दगड आसपास विखुरले आहेत. नमाजगिराच्या उजवीकडे जाणाऱ्या वाटेने सरळ गेल्यावर एका वाड्याचे अवशेष आढळतात तर समोरच्या झाडीत मोठया प्रमाणात सतीशीळा व समाधी दिसतात. या झाडीतुन महादरवाजाकडे उतरताना कोरीवशिल्प तसेच तुळशी वृंदावन पहायला मिळते. महादरवाजाकडे आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. शिवदुर्ग प्रतिष्ठान हि संस्था सध्या या गडावर संवर्धनाचे काम करत असुन त्यांनी राजसदर,माहुलेश्वर मंदीर व हनुमान दरवाजा परीसर झाडीतुन मोकळा केलेला असुन त्याचे सुंदर संवर्धन केलेले आहे. त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप पडायलाच हवी. गडावरून उत्तरेला अलंग, मदन, कुलंग व कळसूबाई पर्वतरांग तर पश्चिमेला तुंगारेश्वर आणि गुमतारा किल्ला दिसतो तर पूर्वेला हरिश्चंद्रगड, आजोबा व दक्षिणेला माथेरान रांग आणि इतर प्रदेश नजरेस पडतो. पायथ्यापासुन गडावर येण्यासाठी तीन तास तर संपुर्ण गड फिरण्यास दोन तास पुरेसे होतात. मध्ययुगीन काळात माहुली हा एक महत्वाचा किल्ला असल्याने याचा ताबा घेण्यासाठी गडाच्या आसपास अनेक लढाया झाल्याचे दिसुन येते. हा किल्ला कोणी बांधला हे माहित नसले तरी बहामनी राज्याच्या अस्तानंतर १४८५ च्या सुमारास हे ठिकाण निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमदच्या ताब्यात आले. मध्ययुगीन कालखंडात कल्याण सुभ्याजवळ असलेला हा किल्ला नाशिक, सुरत,जुन्नर व अहमदनगर अशा महत्वाच्या ठिकाणाशी जोडलेला होता. माहुलीवरून जव्हार मार्गे सुरत व मुरबाडमार्गे नाणेघाट ओलांडून जुन्नर तसेच अहमदनगरला जाणारा मार्ग अशा भौगोलिक रचनेमुळे माहुलीला महत्व प्राप्त झाले होते. पळसगडचा इतिहास हा माहुलीगडाशी संबंधीत आहे. मुघल व आदिलशाही यांच्या एकत्रीत सेना निजामशाही बुडवण्यासाठी आल्या असता १६३५-३६ च्या सुमारास शहाजीराजे यांनी निजामशाही वाचवण्यासाठी बळकट अशा माहुली किल्ल्याचा आश्रय घेतला. खानजमान याने माहुलीला वेढा दिला. शहाजीराजांनी पोर्तुगीजांकडे मदत मागितली पण त्यांनी नकार दिला व शहाजीं राजानी शरणागती पत्करली. पुढे ८ जानेवारी १६५८ रोजी शिवाजीराजांनी हा किल्ला मोगलांकडून मिळवला. १६६५ च्या पुरंदर तहात मोगलांना २३ किल्ले देताना शिवाजी महाराजांनी चातुर्याने हे एकत्रित असलेले दुर्गत्रिकुट तीन किल्ले म्हणून मोगलांना दिले. त्यानंतर मनोहरदास गौड हा मोगलांचा कर्तबदार सरदार माहुलीवर किल्लेदार म्हणुन कारभार पाहू लागला. त्याने गडावर बरीच बांधकाम केली. इ.स.१६७०च्या फेब्रुवारी महिन्यात हा किल्ला जिंकण्यासाठी खुद्द शिवाजीराजांनी माहुलीवर केलेल्या हल्ल्यात किल्लेदार मनोहरदास गौड याच्या सावधानतेने दीड हजार मावळ्यांपैकी तब्बल हजार मावळे मोगलांनी कापून काढले व मराठ्यांना पराभव पत्करावा लागला. पण मनोहरदास गौड याने मराठयांच्या दहशतीने माहुलीची किल्लेदारी सोडली व त्याच्या जागी अलावर्दी बेग हा नवा किल्लेदार आला. त्यांनतर १६ जून १६७० रोजी मोरोपंत पिंगळे यांनी दोन महिन्यांच्या वेढ्यानंतर माहुली, पळसगड व भंडारगड हे त्रिकूट स्वराज्यात सामील करून घेतले. संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर व्दारकोजी या किल्लेदाराने फितुरीने किल्ला मोगलांच्या ताब्यात दिला व त्यांची चाकरी पत्करली. गडावर हल्ला चढवून गड घेणे अवघड असल्याने भेदनीतीचा वापर करत मराठ्यांनी इ.स.१७३५ मध्ये गड ताब्यात घेतला. पुढे दुसऱ्या बाजीरावाने जून १८५७ मध्ये इंग्रजांशी झालेल्या तहानुसार माहुली किल्ला त्यांच्या हवाली केला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!