मांचना

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : नाशिक

उंची : ३७०० फुट

श्रेणी : मध्यम

शिवाजी महाराजांनी स्वतः भाग घेतलेल्या लढाईमधील एक महत्वाची लढाई म्हणजे कांचनबारीची लढाई’. दुसऱ्यांदा सुरत शहर लुटुन परत जात असताना मराठा सैन्य व मुघलांची कांचनबारी येथे समोरासमोर गाठ पडली व मराठ्यांनी मुघलांचा दारुण पराभव केला. उघड्या मैदानावर पहिल्यांदाच समोरासमोर शत्रुचा त्यांच्याच प्रदेशात केलेला पराभव यामुळे वणी-दिंडोरीचा हा संग्राम कांचनबारीची लढाई म्हणुन प्रसिद्ध आहे. पण हि लढाई ज्या किल्ल्यांच्या साक्षीने लढली गेली ते किल्ले कांचना मंचना मात्र प्रसिद्धीपासून खुप दूर आहेत. कांचना मंचना हि एकाच डोंगरावर असलेली दोन स्वतंत्र शिखरे असल्याने काहीजण यांना एकच किल्ला मानतात तर काहीजण यांना जुळे दुर्ग मानतात. हे दोन्ही किल्ले एकाच डोंगरावर असले तरी त्यामधील एका शिखराने या दोन्ही किल्ल्यांमध्ये दोन खिंड निर्माण झाल्याने ते एकमेकांपासून दुरावलेले आहेत. या दोन्ही किल्ल्यांवर जाण्यासाठी दोन दिशांना दोन वेगवेगळे मार्ग असल्याने यांचा दोन स्वतंत्र किल्ले असाच उल्लेख करता येईल. यातील दुसरा किल्ला म्हणजे किल्ले मांचना. देवळा तालुक्यात असलेला हा किल्ला नाशिक शहरापासुन १०० कि.मी.अंतरावर असुन देवळा या तालुक्याच्या ठिकाणाहून १४ कि.मी. अंतरावर आहे. ... मांचना किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा असुन पहिली वाट हि कांचना मंचना किल्ल्याच्या उत्तर पायथ्याशी असलेल्या कांचने गावातुन वर जाते. उभा चढ व मातीचा घसारा असणारी हि वाट थेट मंचना किल्ल्याच्या पायथ्याशी जाते. मांचना किल्ल्यावर जाणारी दुसरी वाट हि किल्ल्याच्या दक्षिण बाजुस आहे. कांचने गावातुन जाताना कांचनबारी (खिंड) पार केल्यावर डावीकडील रस्ता खेळदरी गावात जातो. खेळदरी गाव येथुन ६ कि.मी.अंतरावर आहे. या रस्त्याने साधारण १००० फुट आत आल्यावर डावीकडे एक कच्चा रस्ता कांचन मंचन किल्ल्याच्या दिशेने जाताना दिसतो. या कच्च्या रस्त्याने १ कि.मी.आत आल्यावर हा रस्ता काटकोनात उजवीकडे वळतो. या वळणावर डावीकडे एक शेतघर असुन तेथुनच किल्ल्यावर जाण्यासाठी मळलेली वाट आहे. या वाटेने किल्ल्याचा डोंगर डावीकडे ठेवत आपण कांचना किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. येथुन या दोन्ही किल्ल्याच्या मध्यात असलेल्या सुळक्याला डाव्या बाजूने वळसा घालुन मांचना किल्ल्याच्या पायथ्याशी जाता येते. या वाटेने गेल्यास प्रथम कांचना करून नंतर मांचनावर जाता येते. कांचने गावातुन थेट मांचन किल्ल्याच्या पायथ्याशी येणाऱ्या वाटेच्या तुलनेने हि वाट सोपी पण वेळ खाणारी आहे. एका वाटेने चढुन दुसऱ्या वाटेने खाली उतरल्यास कमी वेळात व कमी श्रमात दोन्ही किल्ले पाहू होतात. या दोन्ही वाटांवर काही ठिकाणी पायऱ्या कोरलेल्या आहेत. कांचने गावातुन म्हणजे किल्ल्याच्या उत्तर बाजुने किल्ला चढायला सुरवात केल्यास साधारण एक तासात आपण मांचना किल्ल्याच्या सुळक्याखाली पोहोचतो. या वाटेने मांचना किल्ल्याच्या सुळक्याखाली आल्यावर डावीकडे वळावे. या वाटेने साधारण २ मिनीटे वाटचाल केल्यावर डावीकडे किल्ल्याच्या माथ्यावर जाण्यासाठी कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसतात. या २०-२२ पायऱ्या चढुन घडीव दगडात बांधलेल्या उत्तराभिमुख भग्न दरवाजाने आपण गडावर प्रवेश करतो. या दरवाजा शेजारी असलेली तटबंदी आजही काही प्रमाणात शिल्लक आहे. गडाचा निमुळता माथा समुद्रसपाटीपासुन ३७०० फुट उंचावर असुन पुर्वपश्चिम साधारण दीड एकरवर पसरलेला आहे. दरवाजाच्या डावीकडील गडाचा माथा अत्यंत निमुळता असुन त्याच्या टोकावर गेल्यास कांचना किल्ल्याचे व त्यावरील शिखराचे सुंदर दर्शन होते. हा भाग निमुळता असल्याने या भागात कोणतेही अवशेष नाहीत. दरवाजाच्या उजवीकडील म्हणजे पश्चिम दिशेस असलेला भाग काहीसा पसरट असुन किल्ल्याचे बहुतांशी अवशेष याच भागात आहेत. किल्ला भटकंतीस सुरवात केल्यावर सर्वप्रथम डावीकडे म्हणजे किल्ल्याच्या उत्तर बाजुने गडावर येणारा प्राचीन कातळकोरीव मार्ग दिसतो. हा मार्ग जेथे गडावर प्रवेश करतो तेथेच पहारेकऱ्याच्या निवाऱ्यासाठी गुहा कोरलेली आहे. गड नांदता असताना काळाच्या ओघात वा इतर कारणाने या दरवाजाची पडझड झाल्याने उत्तरेकडील दरवाजा बांधण्यात आला असावा. गडाच्या पुढील भागात बांधकामासाठी दगड काढल्याने निर्माण झालेले प्रशस्त टाके असुन या टाक्याच्या पोटात दोन गुहावजा टाकी आहेत.गडाचा या पुढील भाग दोन उंचवट्यात विभागलेला असुन यातील पहील्या भागावर एक समाधी व एक थडगे आहे. घडीव दगडातील हि समाधी एका चौथऱ्यावर बांधलेली असुन समाधीच्या वरील भागात दिवा लावण्याची सोय आहे. समाधीपासुन काही अंतरावर असलेल्या थडग्याची मात्र मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. या भागात काही उध्वस्त वास्तुंचे चौथरे आहेत. येथे दरीच्या काठाने कातळ फोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात खळगे कोरलेले आहेत. उंचवट्याच्या पुढील भागात कातळात कोरलेले मोठे टाके असुन यात पाणी असले तरी ते पिण्यायोग्य नाही. या टाक्याशेजारी दुसरे टाके खोदण्याची प्रक्रीया सुरु केल्याच्या खुणा दिसतात. या भागात देखील दरीच्या दोन्ही काठावर कातळ फोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात खळगे कोरलेले आहेत. गडमाथ्यावरून धोडप,राजधेर, कोळधेर,इंद्राई हे किल्ले सहजपणे नजरेस पडतात. किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने पाण्यासाठी आपल्याला कांचना किल्ल्याचा पायथा गाठावा लागतो. टाके पाहुन भग्न दरवाजात आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. संपुर्ण गडमाथा पहाण्यास एका तास पुरेसा होतो. कांचने गावातुन आल्यास मांचन किल्ला पाहुन झाल्यावर शेजारील सुळक्याला उजव्या बाजूने वळसा घालत कांचना किल्ल्याकडे प्रस्थान करावे. पश्चिम महाराष्ट्रात दोन डोंगरामधील खाच खिंड म्हणुन ओळखली जाते तर बागलाण खानदेशात हि खिंड बारी म्हणुन ओळखली जाते. बागलाण मधील या कांचन खिंडीमार्गे म्हणजे कांचनबारीमार्गे होणाऱ्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कांचन-मांचन किल्ल्याची निर्मिती प्राचीन काळात केली गेली असावी. ऑक्टोबर १६७० मध्ये सुरतेची दुसऱ्यादा लुट करून राजगडकडे जात असता दाऊदखान कुरेशी हा मोगली सरदार बुऱ्हाणपुर येथुन महाराजांच्या मागावर निघाला. त्यावेळी बागलाण मोगलांच्या ताब्यात असल्याने स्वराज्यात जाण्यासाठी सातमाळा रांग ओलांडणे गरजेचे होते शिवाय दाऊदखान बरोबर गाठ पडण्याची शक्यता होती. यावेळी महाराजांनी सेनेची दोन भाग करून २००० सैनिकांसोबत लुटीचा माल पुढे पाठवला तर १०००० मावळे सोबत घेऊन पिछाडीवर थांबले. दाउदखान व इख्लासखान हे दोन सरदार सुमारे १५००० सैन्य घेऊन कांचनबारी परीसरात पोहोचले. १७ ऑक्टोबर १६७० रोजी सकाळीच कांचनबारी परीसरात युद्धाला तोंड फुटले. समोरासमोर झालेल्या या पहील्या लढाईचे स्वतः महाराजांनी नेतृत्व केले. सहा तास चाललेल्या या युद्धात प्रतापराव गुजर, मोरोपंत पिंगळे, आनंदराव,भिकाजी दत्तो यांनी मोगलांवर आक्रमण करत त्यांचे जवळपास ३००० सैन्य कापून काढले व मोगलांचा दारुण पराभव झाला. समोरासमोर झालेल्या या लढाईत मराठ्यांनी कमी वेळात मोठ्या फौजेचा लावलेला निकाल यामुळे कांचनबारीची लढाई इतिहासात प्रसिद्ध आहे. या युद्धभूमीचे नेमके स्थान आजही निश्चित नसल्याने इतिहासात काही ठिकाणी ही लढाई वणी-दिंडोरी संग्राम म्हणुन ओळखली जाते. या युद्धामुळे आपण मोगलांना समोरासमोरील युद्धात पराभुत करू शकतो हा मराठ्यांचा आत्मविश्वास दुणावला. महाराज येथुन कुंजरगडाकडे निघुन गेले. या लढाईनंतर दिंडोरीचा मुघल सुभेदार सिद्धी हिलाल मराठ्यांना मिळाला. पुढील काळात या भागातील बहुतांशी किल्ले महाराजांनी स्वराज्यात सामील केले. इ.स.१८१८ मध्ये जून महिन्यात हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!