मनसंतोषगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : सिंधुदुर्ग

उंची : २०६५ फुट

श्रेणी : अत्यंत कठीण

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून कोकणात उतरण्यासाठी अनेक घाटमार्ग असले तरी त्यातील काही घाटमार्ग हे प्रामुख्याने व्यापारासाठी वापरले जात होते. कोकणातील बंदरात आलेला माल या घाटमार्गांनी घाटामाथ्यांवरील बाजारपेठात जात असे. या व्यापारी घाटमार्गातील हनुमंतघाट हा एक प्रमुख घाटमार्ग होता व याच्या रक्षणासाठी शिवपुर्वकाळात घाटाच्या माथ्यावर रांगणा तर पायथ्याशी मनोहर-मनसंतोष हि दुर्गजोडी उभारली गेली. आजही हे दुर्ग आपल्या अंगावर अनेक अवशेष बाळगुन असले तरी घनदाट जंगलात असलेल्या या किल्ल्यावर जाण्यासाठी असलेली अपुरी दळणवळण व्यवस्था यामुळे दुर्गप्रेमींची पावले या किल्ल्यांकडे सहसा वळत नाही. मनोहर- मनसंतोष या दुर्गजोडीतील हे दोन्ही दुर्ग केवळ एका लहान खिंडीमुळे एकमेकांपासून वेगळे झाले असुन मनोहरगडावर सहजपणे जाता येते तर मनसंतोष गडावर जाण्यासाठी मात्र गिर्यारोहण साधनांची गरज भासते. गडावर जाण्यासाठी पायथ्याशी गडाची पेठ असलेल्या पेठशिवापुर येथुन तसेच शिरसिंगे गावाच्या गोठवेवाडीतुन वाट आहे. ... पेठशिवापुर व गोठवेवाडी हि दोन्ही गावे या गडाच्या दोन बाजुस असुन एकमेकाशी रस्त्याने जोडली गेली आहेत पण शिवापुर येथुन गडाच्या खिंडीपर्यंत येणारा रस्ता कच्चा आहे तर गोठवेवाडी येथुन येणारा रस्ता पक्का आहे. या दोन्ही गावात जाण्यासाठी असलेली एसटी बसची मर्यादीत सेवा पहाता खाजगी वाहनाने गोठवेवाडी येथे जाणे सोयीचे पडते. शिवाय खाजगी वाहनाने आपण थेट गडाच्या पायवाटेजवळ पोहोचत असल्याने आपला जवळपास २ तासाचा वेळ तर वाचतोच पण चढ चढायचे श्रमही काही प्रमाणात कमी होतात. मनोहरगडास भेट देण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला सावंतवाडी शहर गाठावे लागते. मुंबई-गोवा महामार्गाने सावंतवाडी हे अंतर ५०६ कि.मी.असुन सावंतवाडीहुन कळंबस्ते-शिरसिंगे-गोठवेवाडी ३० कि.मी. अंतरावर तर पेठशिवापुर ४० कि.मी.अंतरावर आहे. या दोन्ही गावातुन किल्ल्यावर जाण्यास अडीच तास लागतात पण खाजगी वाहन असल्यास गोठवेवाडी पुढील ४ कि.मी अंतराचा चढ आपण वाहनाने पार करतो व आपले ४५ मिनिटांचे श्रम वाचतात. गोठवेवाडीत पोहोचताच मनोहर आणि मनसंतोष गडाचे दर्शन घडते. यातील आकाराने मोठा असलेला गड मनोहरगड तर आकाराने लहान असलेला गड म्हणजे मनसंतोषगड.रस्त्यावरून गडाची पायवाट जेथुन सुरु होते त्या ठिकाणी किल्ल्याच्या डोंगराची एक सोंड उतरलेली असुन गावातील तरुण मंडळींनी येथे कमान उभारली आहे. हि सोंड गरुडझाप म्हणुन ओळखली जाते. या सोंडेवरून उभा चढ चढत किल्ल्याचा डोंगर डाव्या बाजुला ठेवत आपण पुर्व दिशेला असलेल्या किल्ल्याच्या दरवाजाखालील वाटेवर पोहोचतो. शिवापुर येथुन येणारी पायवाट देखील येथेच या वाटेला मिळते. चढाचा काही भाग वगळता उर्वरित भागात जंगल असल्याने उन्हाचा त्रास जाणवत नाही शिवाय गोठवेवाडी ग्रामस्थांनी गडाच्या वाटेवर लावलेल्या दिशादर्शक फलकांमुळे सहसा वाट चुकण्याचा संभव नाही. या वाटेवर आपल्याला गडाचे एक मेट (चौकी) पहायला मिळते. शिवापूर व गोठवेवाडीतुन येणाऱ्या वाटा जेथे एकत्र होतात तिथून काही उध्वस्त पायऱ्या व घसारा पार करत १५ मिनिटात आपण किल्ल्याच्या तटबंदीपाशी पोहोचतो. या ठिकाणी असलेला किल्ल्याचा पहिला उत्तराभिमुख दरवाजा पुर्णपणे नष्ट झाला असुन आज केवळ एकच बुरुज शिल्लक आहे.या दरवाजातून आत आल्यावर सरळ जाणारी वाट मनोहरगडास वेढा मारून मनसंतोष गडाकडे तर उजवीकडची वाट मनोहरगडावर जाते. या वाटेने थोडे चालुन गेल्यावर काही नैसर्गिक गुहा दिसतात. या गुहा पार करून मनोहरगडला वळसा मारत आपण गोठवेवाडीच्या दिशेने मनोहर आणि मनसंतोषमधील खिंडीत पोहोचतो. येथे मनसंतोषगड सुळका उजव्या हातास ठेवून एक पायवाट मनसंतोष गडाच्या पायथ्याशी जाते. या वाटेने थोडे अंतर चालल्यावर आपण किल्ल्यावर जाणाऱ्या उद्ध्वस्त पायऱ्यांपाशी पोहोचतो. मनसंतोष गडावर जाण्यासाठी कातळात खोदलेला पायरीमार्ग आहे.येथे सुरवातीला काही पायऱ्या असुन त्यापुढील पायऱ्या मात्र इंग्रजांनी हा किल्ला निकामी करण्यासाठी सन १८४५ साली तोफा डागुन उध्वस्त केल्याने पुढचा टप्पा थोडासा अवघड बनला आहे. हा टप्पा दोर लावुन पार करावा लागत असल्याने गिर्यारोहण तंत्राची माहिती व साहित्य सोबत असणे गरजेचे आहे अन्यथा मनोहरगड वरूनच मनसंतोष गडाचा माथा पहाणे उत्तम. हा टप्पा पार करून पुढे एक वळसा घेऊन आपण गडाच्या उध्वस्त प्रवेशव्दारातून गडावर प्रवेश करतो. शिवापूर व गोठवेवाडी गावातुन गडमाथा गाठण्यास २ ते २.५ तास लागतात. मनसंतोषगडाचा निमुळता गडमाथा पुर्वपश्चिम साधारण एक एकरवर पसरलेला असुन गडाची समुद्रसपाटीपासुन उंची २००० फुट आहे. गडाच्या माथ्यावर एक-दोन घरांचे चौथरे व दोन कोरडी पडलेली पाण्याची टाकी वगळता फारसे अवशेष नाहीत. गडावरून पारपोली घाटाचा परीसर, नारायणगड , महादेवगड, रांगणा हे किल्ले तसेच कोकणचा मोठा प्रदेश नजरेस पडतो. संपुर्ण गडफेरीस १५ मिनिटे पुरेशी होतात. शिवकाळात तसेच करवीरच्या कागदपत्रात मनोहरगडचा वारंवार उल्लेख येत असला तरी मनसंतोष गडचा मात्र उल्लेख येत नाही. त्यामुळे शिवकाळात हा गड अस्तित्वात असावा का? याबाबत प्रश्नचिन्हच आहे. असल्यास हे दोन्ही गड एकच किल्ला मानल्याने मनोहरगडचा इतिहास हाच मनसंतोष गडाचा इतिहास ठरतो. या गडाची मुळ बांधणी कोणी व केंव्हा केली हे माहित नसले तरी बहामनी काळानंतर आदिलशहाच्या ताब्यात असलेला हा किल्ला १६६४ मधील जुन-जुलै महिन्यात स्वराज्यात दाखल झाला. यावेळी आदिलशाही सरदार असलेले सावंतवाडीचे लखम सावंत यांनी चांगला पराक्रम गाजवला पण मराठ्यांपुढे त्यांना माघार घ्यावी लागली. १६६६च्या सुमारास बाजी घोलप येथील किल्लेदार तसेच रुद्राजी तुकदेव, बोमाजी कालुजी हे सरनोबत तर रामजी विश्वनाथ हे सबनीस असल्याचे दिसुन येते. इ.स. १६८१ ते १७०७ दरम्यान औरंगजेब मराठा राज्य बुडवण्यासाठी आला असता त्याने अनेक किल्ले घेतले पण हा किल्ला त्याला जिंकता आला नाही. नंतरच्या काळात मनोहर- मनसंतोष गडाचा ताबा कोल्हापूरच्या छत्रपतींकडे गेला. १८३४ मध्ये गडकऱ्यानी केलेले बंड मोडण्यासाठी छत्रपतींनी अप्पाजीराव जाधव यांना पाठवुन बंड मोडले पण पुढील काळात बंड वारंवार होऊ लागल्यामुळे बंड मोडून काढण्यासाठी छ.शहाजी महाराज स्वत: १८३६ साली गडावर चालून आले. त्यांनी गडकऱ्याना अटक करून गडावरील २ तोफा नेल्याची नोंद आहे. इ.स.१८४४मध्ये इंग्रजांनी करवीरकरांचे स्वतंत्र हिरावल्याने राज्यातील गडकऱ्यानी २२ जुलै १८४४ला बंड पुकारले. या बंडात मनोहर- मनसंतोष गडाने इंग्रजांना चांगलेच जेरीस आणले. हे बंड मोडण्यासाठी मेजर बेनबो याच्या नेतृत्वाखाली एक तुकडीने मनोहरगड व रांगणा यामधील हनुमंतघाटाच्या पायथ्याशी असलेल्या नेरुर गावी तळ दिला. १० ऑक्टोबर १८४४ला गडावरील तुकडीने गोठोस गावातील सबनीस व कुलकर्णी यांना ताब्यात घेत त्याच्या ताब्यातील सरकारी व खाजगी कागदपत्रे जाळली. या बंडाचा सुत्रधार फोंड सावंत तांबूळकर याने सावंतवाडी संस्थानाचे अनासाहेब यांना बंडात सामील करून मनोहर गडावर आणून ठेवले व त्यांच्या नावाने आजूबाजूच्या परीसरात वसूली केली. त्याचप्रमाणे बंडवाल्यांनी मनोहर गडाच्या परीसरात स्वत:चा दारूगोळा बनविण्याचा कारखाना सूरु केला. या सर्व घटनांमुळे इंग्रजांनी कर्नल वॉलेस व जनरल डेलामोंटी यांना मनोहर गडावरील बंडाचा बिमोड करण्यासाठी पाठविले. १६ जानेवारी १८४५ रोजी कर्नल वॉलेस याने शिवापुर येथे बंडकऱ्यावर भयानक गोळीबार केला. २६ जानेवारी १८४५ रोजी जनरल डेलामोंटी याने केलेल्या कुलपी गोळ्यांच्या माऱ्याने त्रस्त होऊन सावंतानी त्यांची मुले व अण्णासाहेब यांना सोबत घेऊन इंग्रजांना चकवत गोव्याला पलायन केले व गड इंग्रजांच्या ताब्यात आला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!