भांबोरे

प्रकार : गढी

जिल्हा : अहमदनगर

उंची : 0

छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज तसेच पुर्वज यांच्या विषयी जाणुन घेण्याची ओढ तमाम मराठी मनाला असते. आपल्या भटकंतीच्या मार्गात अशी काही ठिकाणे दिसली तर ती आपण आवर्जुन पहातो. इतिहासाची साक्ष देणारे असेच एक ठिकाण आपल्याला अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असलेल्या भांबोरे गावात पहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे चुलत आजोबा विठोजीराजे भोसले यांच्या वंशजांचा वाडा या गावात आहे. भांबोरे हे गाव पुणे - सोलापूर महामार्गावरील भिगवणपासून २२ कि.मी अंतरावर तर श्रीगोंदा येथुन २८ कि.मी. अंतरावर आहे. काळाच्या ओघात या वाड्याची पडझड झाली असुन आता काही भागच शिल्लक आहे. शिल्लक असलेला हा भाग एखाद्या बुरुजाप्रमाणे असुन त्याचे दोन भाग पडलेले आहेत. याचे तळातील बांधकाम घडीव दगडात केलेले असुन त्यावरील बांधकाम मात्र ओबडधोबड दगडांनी केलेले आहे. शिल्लक असलेले हे संपुर्ण बांधकाम साधारण २५ फुट उंच आहे. यात प्रवेश करण्यासाठी काहीसा उंचावर ३ x ५ फुट आकाराचा लहान दरवाजा असुन त्यासमोर आता पायऱ्या बांधल्या आहेत. या दरवाजाने आत शिरल्यावर उजवीकडे डावीकडे व आपण आत आलो ते अशी एकुण तीन बंदीस्त दालने आहेत. ... यातील डावीकडील दालनात बसुन बाहेर जाण्याइतपत लहान वाट (चोरवाट) असुन आता हि वाट दालनात आतील बाजुने भिंत घालुन बंद करण्यात आली आहे पण बाहेरील बाजूने हि चोरवाट आजही पहाता येते. आम्ही गेलो त्यावेळेस या वाटेवर पाईपसाठा करण्यात आला होता. मधील दालनातून समोर जाऊन उजवीकडे वळल्यास येथुन वाड्याच्या वरील भागात जाण्याचा मार्ग आहे. वाड्याचा इतपत भागच आता शिल्लक असुन हा भाग म्हणजे साठवण करण्याचे ठिकाण असावे. वाड्याचा इतर कोणताही भाग आज शिल्लक नसल्याने हा भाग पाहण्यासाठी १० मिनिटे पुरेशी होतात. विठोजी भोसले यांचे वंशज प्रवीण भोसले सध्या येथे वास्तव्यास असुन यांच्याकडे भांबोरकर भोसले दफ्तर हे पुस्तक व पुरातन तलवार पहायला मिळते. मालोजीराजे व विठोजीराजे हे दोघे बंधु वणगंपाळ निंबाळकरांकडे चाकरीत होते. वयाच्या १७-१८ व्यावर्षी दोघा बंधूंना चांगले घोडे देऊन १२०० होनांची आसामीस तैनात करून चाकरीस ठेवले. ते कोल्हापूर प्रांतात स्वारीसाठी १२००० फौजेसह गेले. मालोजी व विठोजी यांनी स्वारीत पराक्रम गाजविला. त्यांना १५०० मनसबदारी व जुन्नर परगणा मिळाला. पुढे निजामशाहीत मालोजी व विठोजी यांनी मलिकअंबरची पाठराखण केली. इ.स. ऑगस्ट १६०६ ते जून १६०७ या दरम्यान मालोजी राजे इंदापूरच्या लढाईत धारातीर्थी पडले. विशेष म्हणजे मालोजीराजे व विठोजीराजे यांनी घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्या मंदिरात दास मालोजी बाबाजी व विठोजी बाबाजी भोसले असा शिलालेख आहे. शिखर शिंगणापूर येथे मालोजी राजांनी तळे बांधल्याचा उल्लेख छ. संभाजी महाराजांच्या दानपत्रात आहे. विठोजीराजे यांना आठ पुत्र, व एक कन्या होती. मुलीचे नाव अंबिकाबाई. ती ज्येष्ठ होती. त्यांचा पहिला मुलगा संभाजी. मीरजुमल्याच्या लढाईत जाधवरावांकडून मारला गेला. दुसरा मुलगा खेलाजी, तिसरा मुलगा मालोजी, चौथे कबाजी हे शहाजीराजांबरोबर तंजावरला गेले. पाचवे नागोजीराजे सहावे - परसोजीराजे तर त्रिंबकजी हे सातवे पुत्र तंजावरला गेले. सहावे पुत्र परसोजी राजे यांचे वंशज भांबोरे या ठिकाणी राहतात. शहाजीराजे विजापूरला गेले त्या वेळी आपले चुलतबंधू विठोजीराजे यांचा सहाही मुलांची व्यवस्था जागजागी लावली. त्यातूनच परसोजीराजे यांना निजामशाहीतील दौलताबादकरांकडून जागा तैनात लावून दिली. तेथे पराक्रम करून त्यांनी चांगला नावलौकिक प्राप्त केला. वऱ्हाड, खानदेश मधील बंडखोरांचा शिताफीने बंदोबस्त केला. त्यांना त्याबद्दल जळगाव जामोद येथील वतनाची सनद मिळाली. परसोर्जीचा मुलगा सयाजी निजामशाही बुडाल्यावर मोगली अंमलात दाखल झाले. सयाजींचे दोन पुत्र राजरूप व रुस्तुमजी. राजरुपराजे हे नांदनजच्या गढीत राहून बादशाही कामगिरी उत्तम प्रकारे निष्ठेने बजावीत होते. रुस्तुमजी मोठे कर्ते व इभ्रतदार होते. रुस्तुमजींचे मोठे चिरंजीव खेलोजीराजे यांना बरोबर घेऊन नांदनज येथील वडिलार्जित जहागिरीवर ते राहिले. छत्रपती शाहूमहाराज मोगली कैदेतून सुटून साताऱ्यात आले. त्यांच्याबरोबर खेलोजी होते. त्यांना नांदवज व भांबोरे येथील मोकासा राजपत्रे करून दिली. तेव्हापासून खेलोजीराजे हे स्वराज्याच्या सेवेत आले. त्यांना सातारा मुक्कामी देवाज्ञा झाली. खेलोजीराजांची चार मुले - १) शहाजी २) कक्काजी ३) रुस्तुमजी ४) सुभानजी. सुभानजी व जानोजी हे भोसले नागपूरकर भोसले यांच्या लष्करात सेवा करीत होते. ते राक्षसभुवनच्या लढाईत (१७५३) होते.श्री कक्काजीराजे हे आपल्या कुटुंबासह भांबोऱ्यास राहिले. त्यांना दोन मुले होती. एक चिमणाजी राजे तर दुसरा अप्पाजीराजे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!