प्रबळगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : रायगड

उंची : २४६० फुट

श्रेणी : मध्यम

मुंबई-पुणे प्रवास करताना शंकुच्या आकाराची टेकडी आणि त्याच्याशेजारी प्रशस्त माथा असणारा डोंगर सहजपणे आपले लक्ष वेधुन घेतो. दोन डोंगराची ही जोडगोळी म्हणजेच कलावंतीण दुर्ग व किल्ले मुरंजन उर्फ प्रबळगड. प्रबळगड व त्याच्या बाजूचा कलावंतीणीचा सुळका हे एका खिंडीने एकमेकांपासुन वेगळे झाले आहेत. प्रबळगडावर जाण्यासाठी जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर शेडुंग येथे फाटा आहे. प्रबळगडाच्या पायथ्याशी असलेले ठाकूरवाडी गाव पनवेलपासुन १४ कि.मी.अंतरावर आहे. पनवेलवरुन सहा आसनी रिक्षा भाड्याने करुन गडाच्या पायथ्याशी असलेल्या ठाकुरवाडी गावापर्यंत जाता येते. याशिवाय पनवेल ते ठाकुरवाडी अशी बससेवा असली तरी ती फारशी सोयीची नाही. नावाप्रमाणेच प्रबळ असलेला हा किल्ला शिवकाळात कल्याण ते रोहा या प्रदेशातील एक महत्वाचे ठिकाण होते. विस्ताराने अतिशय प्रचंड असलेला हा किल्ला माची व बालेकिल्ला अशा दोन भागात विभागलेला असुन माचीवर कलावंतीण सुळका व प्रबळगडचा बालेकिल्ला आहे. म्हणजे एकप्रकारे कलावंतीण हा देखील प्रबळगडचा बालेकिल्ला आहे. गडाच्या माचीवर २०-२५ घरांची वस्ती असुन वस्तीपर्यंत जाण्यासाठी वनखात्याने कच्चा मातीचा रस्ता बांधला होता. ... २००६ पर्यंत जीपसारखे वाहन या रस्त्याने वस्तीच्या अलीकडे असलेल्या सोंडेपर्यंत जात होते पण २००६च्या प्रलयात हा रस्ता अनेक ठिकाणी वाहुन गेला तो आजवर दुरुस्त झाला नाही व या रस्त्याचे आता पायवाटेत रुपांतर झाले आहे. साधारण पाउण तासाच्या वाटचालीनंतर आपल्याला गडाचा एक उध्वस्त बुरुज काही पायऱ्या व त्याजवळ बांधलेला कट्टा दिसतो. २०१०पर्यंत ठळकपणे दिसणारे हे ठिकाण आता त्यावर बांधलेल्या उपहारगृहामुळे सहजपणे लक्षात येत नाही. या ठिकाणाच्या आसपास कोठेतरी गडाचा पहिला दरवाजा असावा असे वाटते. पायथ्यावरून आलेला कच्चा रस्ता या ठिकाणी संपतो. येथे जवळच कातळात कोरलेली गणेशाची व हनुमानाची मुर्ती असुन या मुर्तीला वंदन करून आपण किल्ल्याच्या माचीवर प्रवेश करतो. येथुन कलावंतीण सुळका नजरेसमोर ठेवत १५ मिनिटात आपण प्रबळमाची वस्तीवर पोहोचतो. पायथ्यापासुन प्रबळमाचीवर येण्यास साधारण दीड तास पुरेसा होतो. वस्तीच्या उजवीकडे माचीवर दुरवर शंकराचे उध्वस्त मंदिर आहे. प्रबळमाची गावातून समोरच किल्ला व कलावंतीणीचा सुळका यामधील खिंडीतून कलावंतीणीच्या सुळक्यावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायऱ्याची सुंदर नागमोडी पायवाट आहे. या खिंडीपर्यंत जाणारी वाट म्हणजे उभा चढ असुन खिंडीत जाईपर्यंत चांगलाच थकवा जाणवतो. या खिंडीतुन कलावंतीणीच्या सुळक्यावर जाण्यासाठी साधारण अर्धा तास लागतो. हि संपुर्ण पाउलवाट कातळात कोरलेली असुन या वाटेच्या डाव्या बाजुस दोन ठिकाणी कातळात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या पहायला मिळतात. यातील पहिले टाके मातीने भरलेले असल्याने कोरडे पडले आहे तर दुसरे टाके गुहेसारखे असुन त्यात पिण्यायोग्य पाणी आहे. पण तिथे जाणारी वाट मात्र काहीशी अवघड आहे. वाटेच्या शेवटच्या टप्प्यात थोडे प्रस्तरारोहण करावे लागते. स्थानिकांनी येथे दोरी बांधली असुन वर चढण्यासाठी ते पैसे आकारतात. सुळक्यावर फारच थोडी जागा असुन कुठलेही अवशेष नाहीत. येथे भगवा झेंडा फडकवलेला आहे. येथुन प्रबळगडाच्या तटबंदीत असलेले चार बुरुज दिसुन येतात. होळीच्या दिवशी माचीप्रबळ गावामधील लोक येथे होळीचा सण साजरा करतात. कलावंतीण सुळका व प्रबळगड यामधील खिंडीतुन प्रबळगडच्या कड्याखालुन प्रबळगडाकडे जाताना डाव्या बाजुस कडयाच्या पोटात एक मानवनिर्मित गुहा असुन तिची लांबी जवळपास २५ फुट आहे. या गुहेला आत काटकोनात वळवले असुन गुहेच्या आत १५ X २० फुट आकाराचे प्रशस्त कोठार आहे. या गुहेशेजारी कातळावर झीज झालेले मारुतीचे शिल्प आहे. गुहा पाहुन खाली न उतरता कड्याला लागुन सरळ जाणाऱ्या पायवाटेने अर्ध्या तासात आपण प्रबळगडच्या बालेकिल्ल्याखाली असलेल्या घळीत पोहोचतो. हि घळ जेथे उतरली आहे तेथेच कलावंतीन सुळक्याच्या दिशेने कातळात खोदलेली दुसरी गुहा आहे. आपण कलावंतीण सुळक्याकडे पाहिलेली गुहा व हि गुहा एकसमान आहे. या घळीतून अर्ध्या तासाचा उभा चढुन आपण किल्ल्याच्या उध्वस्त दरवाजात पोहोचतो. स्थानिक लोक या वाटेला बैलशिंगाची वाट म्हणुन ओळखतात. दरवाजाचे घडीव दगड या वाटेवर मोठ्या प्रमाणात पसरलेले असुन दरवाजाची अर्धी चौकट कशीबशी तग धरून आहे. हि तटबंदी चांगलीच रुंद असुन मोठया प्रमाणात मातीखाली गाडली गेली आहे. दरवाजाच्या उजवीकडील तटबंदीत गाडलेली एक लहान कमान असुन त्यापुढे काही अंतरावर कातळात कोरलेले पाण्याचे टाके आहे. उपसा नसल्याने तुर्तास यातील पाणी पिण्यायोग्य नाही. टाके पाहुन दरवाजात येऊन आपल्या गडफेरीस सुरवात करावी. साधारण Y आकाराचा बालेकिल्ला समुद्रसपाटीपासुन २४६० फुट उंचावर असुन याच्या एका टोकावर कलावंतीण कुरुज, दुसऱ्या टोकावर काळा बुरुज तर तिसऱ्या टोकावर बोरीची सोंड आहे. गडाचा माथा म्हणजे दाट जंगल असुन किल्ल्यावरील इमारती व तटाबुरुजाचे अवशेष या जंगलात लपलेले आहेत. त्यामुळे आपली भटकंती शोधकपणे व सावधतेने करावी. दरवाजातील वाटेने थोडे पुढे गेल्यावर वाटेस दोन फाटे दिसतात. सरळ जाणारी वाट कलावंतीण सुळक्यासमोरील बुरुजावर जाते तर उजवीकडील वाट काळा बुरुज व बोरीच्या सोंडेकडे जाते. उजवीकडील वाटेने थोडे पुढे आल्यावर जंगल नसलेली थोडीशी मोकळी जागा लागते. येथे बहुदा साचपाण्याचा तलाव असावा. येथे वाटेला पुन्हा दोन फाटे असुन आपण उजवी कडील वाट धरावी. या वाटेने साधारण १५ मिनिटे चालल्यावर पुन्हा दोन वाटा दिसतात. येथे पुन्हा उजवीकडील वाट धरावी. या वाटेने १० मिनिटे चालल्यावर आपल्याला एका रांगेत परंतु वेगवेगळ्या सहा फुट उंचीच्या चौथऱ्यावर घडीव दगडांनी बांधलेल्या व आजही सुस्थितीत असलेल्या चार स्वतंत्र इमारती पहायला मिळतात. काही ठिकाणी या इमारतींचा उल्लेख राजवाडा म्हणुन येतो परंतु या चारही वास्तु म्हणजे धान्यकोठारे आहेत. या प्रत्येक इमारतीच्या भिंतीत चार फुट उंचीवर एक लहान दरवाजा असुन वरील पट्टीवर नक्षी कोरलेली आहे. इमारतीच्या आत प्रकाशासाठी झरोका बांधलेला असुन याची एकुण रचना पहाता या इमारतीचे बांधकाम बहामनी कालखंडात झाले असावे. या इमारती पाहुन झाल्यावर चौथ्या इमारतीकडून खाली उतरणाऱ्या पायवाटेने आपल्या पुढील गडफेरीस सुरवात करावी. या वाटेने खाली उतरल्यावर वाटेशेजारी असलेल्या पाण्याच्या प्रवाहावर पाणी अडविण्यासाठी बांधलेला एक बंधारा पहायला मिळतो. सध्या हा बंधारा पुर्णपणे गाळाने भरलेला असून त्याच्यावरील केवळ एकच दगडी थर नजरेस पडतो. या वाटेच्या आसपास कोसळलेल्या वास्तुंचे ढिगारे पहायला मिळतात. या वाटेवरच एक घडीव दगडात बांधलेला समाधी चौथरा असुन त्यावर मोठया प्रमाणात झाडे वाढलेली आहेत. या चौथऱ्याच्या डावीकडे काही अंतरावर मातीत अर्धवट गाडलेला समाधीचा दुसरा मोठा कोरीव दगड आहे. हा दगड समाधी चौथऱ्यावरील भाग असावा. येथुन थोडे पुढे आल्यावर आपण एका मंदिराजवळ पोहोचतो. या मंदिरात असलेल्या गणपतीच्या मुर्तीमुळे हे मंदीर गणेश मंदिर म्हणुन ओळखल्र जाते. या मंदिरात एक व मंदिराबाहेर एक असे दोन नंदी आहेत. गणेशाच्या मुर्तीमागे भद्रपीठावर स्थापन केलेले त्रिस्तरीय शिवलिंग असुन या शिवलिंगामुळे किल्ल्याचा इतिहास थेट अकराव्या शतकात जातो. मंदिर पाहुन थोडे पुढे आल्यावर वाटेच्या डाव्या बाजुस कोरडा पडलेला मोठा तलाव नजरेस पडतो. येथुन साधारण १० मिनिटाची पायपीट केल्यावर वाटेला पुन्हा दोन फाटे फुटतात. येथुन उजवीकडील वाट २० मिनिटात आपल्याला बोरीच्या सोंडेवर घेऊन जाते. येथे असलेल्या बोरीच्या झाडांमुळे हि सोंड बोरीची सोंड या नावाने ओळखली जाते. या वाटेने सोंडेच्या टोकाकडे जाताना सरळ न जाता डावीकडुन गेल्यास दरीच्या काठावर कातळात कोरलेले मोठे टाके नजरेस पडते. वापरात नसल्याने यातील पाणी मात्र पिण्यायोग्य नाही. या सोंडेवरून बालेकिल्ल्याखाली अस्ताव्यस्त पसरलेली प्रबळमाची, पनवेल शहर,कर्नाळा,माणिकगड यांचे सुंदर दर्शन घडते. या सोंडेखालील माचीवर काही घरांची वस्ती असुन येथुन एका अवघड वाटेने या सोंडेवरून गडावर येता येते. बोरीची सोंड पाहुन झाल्यावर फाट्यावरील मुळ वाटेवर येऊन काळा बुरुजाच्या दिशेने आपली वाटचाल सुरु करावी. या वाटेने साधारण १५ मिनिटे चालल्यावर एक ओझरती वाट दरीच्या दिशेने खाली उतरताना दिसते. या वाटेने साधारण २०० फुट खाली उतरल्यावर आपण गडाच्या दुसऱ्या उध्वस्त दरवाजात पोहोचतो. या दरवाजाची देखील कमान उध्वस्त झाली असुन केवळ चौकट शिल्लक आहे. या दरवाजातुन उतरणारी वाट इरशाळगडाकडे जात असल्याने हा दरवाजा इरशाळ दरवाजा म्हणुन ओळखला जातो. दरवाजाच्या खालील बाजुस एक मोठे दगडी जाते पडलेले आहे. हा दरवाजा पाहून मागे फिरल्यावर सरळ जाणाऱ्या वाटेने आपण काळ्या बुरुजाजवळ पोहोचतो. आपण प्रवेश केलेला गडाचा दरवाजा व काळा बुरुज हे अंतर साधारण ३.५ कि.मी. आहे. काळ्या बुरुजाच्या या भागात जंगल काहीसे विरळ असल्याने आपल्याला मोठया प्रमाणात गडाचे अवशेष पहायला मिळतात. दरीच्या काठावर तटबंदी बांधलेली असुन टोकावर लहानसा बुरुज बांधलेला आहे. येथे कातळात कोरलेली पाण्याची दोन टाकी असुन यातील एका टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. या भागात मळलेल्या चुन्याचे दोन मोठे ढिगारे असुन ते इंग्रजांच्या काळातील आहेत. माथेरानचा थंड हवेचे ठिकाण म्हणुन विकास करण्यापुर्वी इंग्रजांनी प्रबळगडची निवड केली पण येथील पाण्याची कमतरता पाहुन माथेरानचा पर्याय निवडला गेला. पण बांधकामासाठी येथे आणलेला चुना व मोठया प्रमाणात घडवलेले दगड मात्र तसेच राहुन गेले. काळ्या बुरुजावरून माथेरानचे विविध पाँईंटस्, सोंडाई, इरशाळगड, मोरबे धरण यांचे सुंदर दर्शन होते. काळया बुरुजाच्या डावीकडे खालील बाजुस आपल्याला तटाने बंदिस्त केलेली अजुन एक लहान माची व तिच्या टोकावरील बुरुज पहायला मिळतो. या माचीवर एक इमारत व तिच्या पुढील भागात कातळात कोरलेले पाण्याचे टाके आहे. या माचीच्या तटातुन बाहेर पडण्यासाठी एक लहान दरवाजा बांधलेला आहे. या माचीचा हा भाग पडघे बुरुज नावाने ओळखला जातो. काळा बुरुज पाहुन आल्या वाटेने पुन्हा गणेश मंदीराजवळ यावे. येथुन एक मळलेली वाट आपल्याला सहदेव सावंत यांच्या समाधी स्थळाकडे घेऊन जाते. या समाधीच्या पुढील बाजूस उतरत जाणाऱ्या गडाच्या तीन सोंडा असुन या तीनही सोंडा दोन्ही बाजुने तटबंदीने बंदिस्त करून त्यांच्या टोकाशी बुरुज बांधण्यात आले आहेत. येथे असलेल्या घनदाट जंगलामुळे या सोंडेवर उतरण्याच्या वाटा मोडलेल्या असुन स्थानिक वाटाड्याला देखील ठाऊक नाहीत. या तीनही सोंडा त्यावरील तटाबुरुजासह कलावंतीण सुळक्यासमोरील बुरुजावर जाताना पहायला मिळतात. येथुन मागे फिरून मंदिराकडे यावे व तेथुन आल्या वाटेने मागे फिरून सरळ वाटेने गडाच्या कलावंतीण सुळक्याच्या दिशेने निघावे. या वाटेने जाताना आपल्याला झाडीमध्ये काही ठिकाणी घडीव दगडात बांधलेल्या वास्तुंचे अवशेष दिसून येतात. जंगलातील हि वाट पार करून मोकळ्या जागेवर आल्यावर उजवीकडे आपल्याला गडाच्या उतरत जाणाऱ्या सोंडा व त्यावरील तटबंदीबुरुज नजरेस पडतात. या मोकळ्या जागेत एक लहानशी पायवाट या सोंडेच्या दिशेने जाताना दिसते. या वाटेने ५ मिनिटे चालत गेल्यावर पाण्याने भरलेले कातळात कोरलेले मोठे टाके दिसते. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. या टाक्याकडून एका सोंडेवरील तटबंदी व बुरुज अगदी जवळुन पहाता येतात. येथुन मागे फिरुन वाटेवर येत आपण कलावंतीण सुळक्यासमोर असलेल्या बुरुजावर पोहोचतो. या बुरूजाच्या अलीकडे झाडीत कातळात कोरलेले पाण्याचे एक टाके आहे पण ते पहाण्यासाठी बरीच शोधाशोध करावी लागते. गडाचा हा बुरुज सोंडयेची सोंड म्हणुन ओळखला जातो. या टोकावरून कलावंतीण सुळक्याचे विहंगम दर्शन होते. येथुन चंदेरी,पेब, हे किल्ले व पसरत जाणारी नवी मुंबई इतका दूरचा परीसर नजरेस पडतो. गडाच्या तटबंदीत सोंडयेचा बुरुज,बोरीची सोंड,काळा बुरुज,पडघे बुरुज, सोंडेवरील तीन बुरुज व कलावंतीण सुळक्यावरून दिसणारे चार बुरुज असे लहानमोठे अकरा बुरुज व दोन उध्वस्त दरवाजे आहेत. गडाच्या माथ्यावरून फेरी मारताना काही ठिकाणी तुटलेली तटबंदी पहायला मिळती. गडमाथा फिरण्यासाठी वाटाड्या सोबत घेतला तरी ते फारशी माहिती देत नाहीत व संपुर्ण गड फिरवण्यासाठी फारसे उत्सुक नसतात. गडमाथ्यावर लिंबूसरबत, कोकम सरबत,बाटलीबंद पाणी विकले जात असल्याने पाण्याच्या टाक्यादेखील दाखवण्यास तयार नसतात. गडाच्या पायथ्याशी असलेल्या प्रबळमाची राहण्याची व खाण्याची सोय होते पण जवळच असलेला मुंबईचा सहवास यामुळे येथे सौजन्यायेवजी व्यावसायीकता वाढीस लागलेली आहे असे खेदाने म्हणावे लागते. येथे होत असलेला धांगडधिंगा पहाता गडप्रेमीनी शनिवार- रवीवार व सुट्टीचे दिवस टाळूनच गडावर जावे. गडावरील शांतता व या शांततेचा अनुभव घेत प्रबळमाचीवरून पाहीलेला सुर्यास्त हे सारे आज लयास गेले आहे. उत्तर कोकणात असलेल्या या किल्ल्याची निर्मिती बोरघाटाकडे जाणाऱ्या मार्गावर नजर ठेवण्यासाठी करण्यात आली असावी. गडावर असलेल्या गुहा पहाता याची निर्मिती सातवाहन काळातच झाली असावी व नंतरच्या शिलाहार, यादवकाळात त्याला लष्करी चौकीचे रूप मिळाले असावे. बहामनी राज्याची शकले पडल्यावर हा किल्ला निजामशाहीच्या ताब्यात आला. निजामशाहीच्या शेवटच्या काळात शहाजीराजांनी निजामशाहीचा वारस उभा करून राज्यकारभार स्वतःच्या ताब्यात घेतला. पण मोगल बादशहा शाहजहान व आदिलशहा यांनी तह करून आपल्या संयुक्त फौजा शहाजीराजांवर पाठवल्या. १९ जून १६३५ रोजी मुघल सरदार खानजमान जुन्नर व शिवनेरी किल्ला जिंकून दख्खनमध्ये उतरला तर आदिलशाही कडून रणदुल्लाखान उतरला. पावसाळा संपताच खानजमान शहाजीराजांच्या मागावर आला असता शहाजीराजे कोंढाणा व मुरंबदेवाच्या डोंगरात निघून गेले. तेथुन कोकणात उतरल्यावर जंजिऱ्याचा सिद्दी व चौलचे पोर्तुगीज यांनी आश्रय नाकारल्यावर ते जिजाऊ, बालशिवाजी आणि लष्करासह मुरंजनावर म्हणजेच प्रबळगडावर आले. येथे काही दिवस थांबल्यावर खान पाठीशी आल्याचे कळताच त्यांनी माहुली गडाकडे कुच केले. १६३६ मध्ये माहुलीचा तह झाला व उत्तर कोकण मोगलांच्या ताब्यात गेले. मोगलांनी हा प्रदेश अदिलशहाच्या ताब्यात दिला. शिवरायांनी जावळी ताब्यात घेतल्यावर इ.स. १६५६ मध्ये आबाजी महादेव यांनी कल्याण-भिवंडीपासुन रायरीपर्यंतचा सारा प्रदेश स्वराज्यात आणला. यावेळी मुरंजन किल्लादेखील स्वराज्यात सामील झाला. यावेळी मुरंजन किल्ल्याचे प्रबळगड असे नामकरण करण्यात आले. इ.स. १६६५ मधील पुरंदरच्या तहानुसार मोगलांना दिलेल्या २३ किल्ल्यांमध्ये प्रबळगडचा सामावेश होता. जयसिंगाने किल्ल्यावर राजपूत केशरसिंह हाडा हा किल्लेदार नेमला. पुढे पुरंदरचा तह मोडल्यावर मराठ्यानी किल्ल्यावर केलेल्या हल्ल्यात मराठयांशी झालेल्या लढाईत केशरसिंह धारातीर्थी पडला. केशरसिंहाची आई व दोन लहान मुले मराठयांच्या हातात सापडली. महाराजांच्या आदेशानुसार त्याना सन्मानाने देऊळगावी मोगल छावणीत पाठवण्यात आले. नंतर किल्ल्यावर केलेल्या खोदकामात बरीच संपत्ती सापडली. शिवकाळात आबाजी महादेव हे या किल्याचे सुभेदार असुन येथुनच उत्तर कोकणाचा कारभार चालत असे. इ.स. १८२८ मध्ये उमाजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली पुरंदर परिसरातील रामोशी लोकांनी ब्रिटिशांविरोधात बंड केले. यावेळी उमाजी नाईक यांच्यासह ३०० लोकांची टोळी तळकोकणात उतरली व त्यांनी प्रबळगडाचा आश्रय घेतला. या वेळी त्यांनी परिसरातील जनतेने ब्रिटिशांना वसुल देऊ नये यासाठी जाहीरनामा काढला. या जाहीरनाम्यावर तारीख होती २५ डिसेंबर १८२७. प्रबळगडच्या आश्रयाने या क्रांतिकारकांनी ब्रिटिशांना अनेक दिवस सळो की पळो करून सोडले पण अखेरीस इंग्रजांनी हे बंड मोडून काढले.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!