पनवेल कोट

प्रकार : भुईकोट

जिल्हा : रायगड

उंची : 0

श्रेणी : सोपी

काळाच्या ओघात दुर्लक्षित झाल्यामुळे अनेक गडकोट आज नष्ट झाले असुन त्यांचा मागमुस देखील लागत नाही. इतिहास वाचताना आपल्याला काही किल्ल्याची नावे वाचनात येतात व आपण आपल्या दुर्गप्रेमापायी त्या स्थानाची भटकंती करतो पण काहीच हाती न लागल्याने काळाच्या ओघात हा किल्ला नष्ट झाला असे समजुन हळहळ व्यक्त करतो. पण बऱ्याचदा आपल्याला हे लक्षात घ्यायला हवे कि काही किल्ले हे काळाच्या ओघात नष्ट झाले नसुन तत्कालीन राजवटीला ते अडचणीचे ठरू लागल्याने त्यांनी ते स्वतः भुईसपाट केले. हा नियम केवळ इंग्रजांना लागु होत नसुन तत्कालीन देशी राजवटीने देखील असे केल्याची उदाहरणे दिसुन येतात. याचे एक उदाहरण म्हणजे पनवेलचा किल्ला. संभाजी महाराजांच्या काळात अस्तित्वात आलेला हा लहानसा कोट फार लवकरच पाडला गेला पण तो नेमका कोणी व केव्हा पाडला याबाबत ठोस पुरावे मिळत नाहीत. उपलब्ध पुराव्यामुळे याची स्थान निश्चिती होत असली तरी त्या ठिकाणी आज कोटाचे कोणतेही अवशेष उपलब्ध नाहीत. या कोटाच्या जागी पनवेल शहरात बडी दर्गा म्हणुन ओळखली जाणारी पीर करमअली शहाबाबा यांची दर्गा आहे ... देवळे तलावाच्या काठावर उभ्या असलेल्या या दर्ग्याच्या ठिकाणीच कधीकाळी पनवेलचा किल्ला उभा होता. या ठिकाणास भेट द्यावयाची असल्यास सर्वप्रथम पनवेल शहर गाठावे, बडी दर्गा हे ठिकाण पनवेल एस.टी.स्थानकापासून १.५ कि.मी.अंतरावर तर रेल्वे स्थानकापासून २ कि.मी. अंतरावर आहे. चालत अथवा खाजगी रिक्षाने १० मिनीटात या ठिकाणी जाता येते. आता येथे कोटाचे कोणतेही अवशेष नसुन त्या ठिकाणी असलेला दर्गा व त्याच्या आतील भिंतीवर असलेला पर्शियन शिलालेख पहाता येतो. या शिलालेखात हा दर्गा इ.स.१७४७ साली बांधल्याचे नमूद केले आहे म्हणजे हा कोट त्यापुर्वीच पाडला गेला असावा. कोटाचे अवशेष नसल्याने हा परीसर पहाण्यासाठी ५ मिनिटे पुरेशी होतात. पनवेल शहर काळूंद्री नदीच्या काठावर वसलेले असुन कधीकाळी बेलापूरच्या खाडीतून लहान गलबते या नदीपात्रातुन थेट पनवेलपर्यंत ये-जा करत असत. इ.स.१६८२मध्ये संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांच्या चौल-रेवदंडा ठाण्यास घातलेला वेढा उधळल्यावर उरण,कारंजा व पनवेल या भागाचा ताबा घेतला. औरंगजेबाच्या स्वारीमुळे मराठा सैन्य अनेक आघाडीवर लढत असल्याने एका ठिकाणी जास्त शिबंदी ठेवणे शक्य नव्हते. त्यामुळे संभाजी महाराजांनी देवाळे तलावाच्या काठावर एक लहानसा कोट बांधुन या भागाच्या रक्षणासाठी काही प्रमाणात तेथे शिबंदी ठेवली. पण संभाजी महाराजांच्या मृत्यु (१६८९) नंतर हा प्रदेश मुघलांच्या ताब्यात गेला व त्यांनी हा कोट उध्वस्त केला असावा.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!