निमगाव

प्रकार : गढी

जिल्हा : पुणे

उंची : 0

पुणे जिल्ह्याची दुर्ग भटकंती करताना आपल्याला पुणे शहराच्या आसपास पसरलेल्या बारा मावळात अनेक लहानमोठ्या गढी पहायला मिळतात. यातील बहुतांशी गढी या पेशवेकाळात उदयास आलेल्या असुन त्यातील काही गढी तर शनिवारवाड्याच्या तोलामोलात बांधलेल्या आढळतात. सरदार चंद्रचुड यांनी बांधलेली अशीच एक गढी आपल्याला खंडोबा देवस्थानामुळे ओळखल्या जाणाऱ्या निमगाव खंडोबा या गावात पहायला मिळते. पेशवेकाळात भरभराटीस आलेले हे गाव आजमात्र पुर्णपणे दुर्लक्षित आहे. महाराष्ट्रात निमगाव नावाची अनेक गावे असल्याने हे गाव त्याच्या शेजारील दुसऱ्या गावासोबत जोडनावाने ओळखले जाते. या गावाशेजारील दुसरे गाव म्हणजे दावडी. त्यामुळे हे गाव निमगाव दावडी म्हणुन ओळखले जाते. आपल्यासारख्या भटक्यांसाठी निमगाव व दावडी ही दोन्ही गावे महत्वाची आहेत कारण निमगावात आपल्याला चंद्रचूड यांची गढी तर दावडी गावात गायकवाड यांची गढी पहायला मिळते. पुर्वीच्या खेड तालुक्यात (आता राजगुरूनगर) असलेले निमगाव दावडी हे गाव आपल्यासोबत चंद्रचूड घराण्याचा इतिहास बाळगून आहे. चला तर आज निमगाव दावडी गावाची भटकंती करूया. ... निमगाव दावडी हे ठिकाण पुणे जिल्ह्यात खेड तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या राजगुरूनगर येथुन १० कि.मी. अंतरावर आहे.राजगुरुनगर हे शहर असल्याने मुंबई-पुणे येथून तेथे जाण्यासाठी वाहनांची चांगली सोय आहे पण पुढे मात्र खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो. निमगाव हे गाव भीमा नदीच्या काठावर वसलेले असुन गावाबाहेर भीमा नदीच्या काठावरच सरदार चंद्रचुड यांची गढी बांधलेली आहे. नव्याने बांधलेल्या कमानीतुन आपला गावात होणारा प्रवेश पहाता कधीकाळी हे गाव देखील तटबंदीच्या आत असावे असे वाटते. गढीच्या दरवाजासमोर उभे रहाताच या दरवाजाचे बांधकाम काही प्रमाणात शनिवार वाड्याच्या दरवाजासारखा असल्याचे दिसुन येते. गढीच्या दरवाजा शेजारी उजव्या बाजुस तटबंदी जवळ पेशवेकाळात बांधलेले महादेवाचे मंदीर आहे. घडीव दगडात बांधलेल्या या मंदीरात दोन शिवपिंडी पहायला मिळतात. गढीचा पश्चिमाभिमुख दरवाजा चांगलाच प्रशस्त असुन दरवाजाच्या दर्शनी भागात कमलपुष्प व कोनाडे कोरलेले आहेत. दरवाजाच्या वरील भागात रेखीव नगारखाना व त्याच्या दर्शनी भागात दगडी सज्जा बांधलेला आहे. साधारण वीस फुट उंच असलेल्या या दरवाजाची लोखंडी खिळे ठोकलेली कमानीदार लाकडी दारे आजही शिल्लक असुन त्यात लहान दिंडी दरवाजा पहायला मिळतो. या दरवाजाने आत शिरताच दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन त्यात त्यांच्या निवासाची दालने आहेत. गढीत प्रवेश केल्यावर तटाला लागुनच दरवाजाच्या वरील भागात जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढुन वर सज्जात आले असता तेथुन सज्जाच्या माथ्यावर जाण्यासाठी पायऱ्या असुन तेथे ध्वज लावण्याची जागा आहे. सज्जाच्या वरील भागातुन खूप मोठा परीसर नजरेस पडतो. आयताकार आकाराची हि गढी साधारण सव्वा एकरवर पसरलेली असुन संपुर्ण गढीचे बांधकाम घडीव दगडात केलेले आहे. एक दोन ठिकाणी तटबंदी ढासळलेली असल्याने तटावरून फेरी मारता येत नसली तरी बाहेरील बाजूने संपुर्ण गढीची प्रदक्षिणा करता येते. या संपुर्ण तटबंदीत आपल्याला लहानमोठे आकाराचे एकुण सहा बुरुज पहायला मिळतात. आतील बाजुस तटबंदीच्या काठाने फिरताना या तटबंदीत असलेले शौचकूप तसेच काही बंदीस्त दालने व एक भुयार पहायला मिळते. या शिवाय प्रत्येक बुरुजाच्या आतील भागात कोठार/दालन पहायला मिळते. गढीच्या मुख्य दरवाजा शिवाय उत्तर व पुर्व बाजुस अजून दोन लहान दरवाजे पहायला मिळतात. या दोन्ही दरवाजाच्या वरील भागात तटावर एक लहान खोली असुन त्यांची लाकडी दारे आज देखील आपल्या मूळ अवस्थेत आहेत. गढीच्या आतील भागात मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली असल्याने मोकळेपणाने फिरता येत नसले तरी या झाडीत आपल्याला दोन वाड्याचे चौथरे पहायला मिळतात. हे चौथरे म्हणजे कधीकाळी चंद्रमहाल व सुर्यमहाल नावाने ओळखले जाणारे वाडे असल्याचे स्थानीक सांगतात. संपुर्ण गढी फिरण्यासाठी अर्धा तास पुरेसा होतो. सध्या या वाड्याची मालकी दावडी येथील शिंगवी कुटुंबाकडे आहे. गढी पाहुन शेजारी असलेल्या भीमा नदीच्या काठावर गेले असता तेथे घडीव दगडात बांधलेले पेशवेकालीन विष्णुमंदीर पहावयास मिळते. या मंदीरात विष्णुलक्ष्मीची सुंदर मुर्ती असुन या मंदीरासमोरच गरुडाची घुमटी आहे. पेशवे दफ्तरमध्ये निमगावचा उल्लेख निमगाव – नागना या नावाने केलेलाही आढळतो. थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या काळात कन्हेरसर व निमगाव येथील चंद्रचूड घराणे नावलौकिक मिळवून होते. निमगाव – नागना भागातील पूर, खेड या गावच्या पाटीलकी त्यांनी खरेदी केल्या होत्या. मल्हारराव होळकरांच्या काळात यशवंतराव चंद्रचूड यांचे बाजी व गंगाधर हे पुत्र स्वकर्तृत्वाने उदयास आले होते. पण या घराण्याचे नाव खऱ्या अर्थाने लौकिकास आणणारा सरदार म्हणजे गंगाधर यशवंत चंद्रचूड उर्फ गंगोबातात्या. गंगाधर उर्फ गंगोबातात्या यांना मल्हारराव होळकर यांच्याकडे फडणिशी मिळविली. किंवा मल्हारराव होळकरावर नियंत्रण ठेवण्यासाठी पेशव्यांनी गंगाधर यशवंत चंद्रचूड यांची आपल्या मर्जीतील एक कारभारी म्हणुन मल्हारराव होळकरांच्या पदरी त्यांची नेमणूक केली असावी. एकाच वेळी पेशवे व होळकर अशा दोघांच्या मर्जी संपादन करणारं इतिहासातलं हे एक व्यक्तिमत्त्व होतं. होळकरांच्या पदरी नोकरीस लागल्यावर गंगाधर यशवंत चंद्रचूड यांनी मोठी प्रगती केली. मुत्सद्देगिरी व कारकुनीच्या सोबतच त्याला राजकारण आणि मैदानी कामगिरीची जोड मिळाली. होळकरांच्या पदरी राहून त्यांची होळकरांवर निष्ठा बसली व त्यांनी पेशव्यांकडे काहीसे दुर्लक्ष केले. होळकरांचा पक्ष घेऊन त्यांनी माळव्यातच आपली सेवा करून त्याच संस्थानाच्या भरभराटीसाठी काम केले. इ.स. १७५० नंतर गंगाधर यशवंत चंद्रचूड याने होळकरांच्या मोठमोठ्या मोहिमांमध्ये सहभाग घेतला. इ.स. १७५१ मध्ये मोगल वजीर सफदरजंग व रोहिले यांच्या भांडणात शिंदे-होळकरांनी सफदरजंग याचा पक्ष घेतला. यावेळी झालेल्या लढाईत गंगाधर यशवंत चंद्रचूड आणि निमगावच्या लोकांनी मोठा पराक्रम गाजवला. मराठ्यांनी अटकेपार झेंडे फडकवले त्यावेळेस गंगाधर चंद्रचूड व तुकोजी होळकर यांनीच प्रामुख्याने होळकरांच्या सैन्याचे नेतृत्व केले. विष्णुभक्त असलेल्या गंगाधर यशवंत चंद्रचूड यांनी इ.स.१७५६ नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेल्या सुंदरनारायण मंदीराची स्थापना केली. इ.स.१७६० मध्ये बुराडी घाटच्या लढाईनंतर अब्दालीसोबत झालेल्या लढाईत २७ फेब्रुवारी १७६० रोजी गंगोबाने दिल्लीजवळील सिकंदरा या नजीबखानाच्या जहागीरीतील प्रदेशावर स्वारी करून लूट मिळवली होती. पुढल्या काळात अब्दालीशी लढताना होळकरांच्या सैन्यात गंगाधर यशवंत चंद्रचूड हाही होता. पानिपत लढाईच्या एक वर्ष आधी मार्च महिन्यात मल्हाररावाचे सरदार आणि अब्दाली यांच्यात सामना झाला होता. या लढाईत शेट्याजी खराडे, शिवाजी खराडे, आनंदराव रामजी यादव व गंगाधर यशवंत चंद्रचूड यांनी भाग घेतला पण गंगाधर यशवंत चंद्रचूड खेरीज बाकी सर्व मंडळी ठार झाली. अफगाण सैन्याने छापा मारून गंगोबाला उधळून लावले. मल्हारराव होळकर यांच्या मृत्यूनंतर उत्तराधिकारी म्हणुन अहिल्याबाई होळकरांचे नाव समोर आले. ही बाब गंगाधर यशवंत चंद्रचूड यांना पटली नाही. राघोबादादांशी त्यांनी अहिल्याबाईंविरुद्ध संधान बांधले आणि इंदूर बळकावण्यासाठी त्यांना उत्तरेत बोलावले पण हा डाव यशस्वी झाला नाही. गंगाधर यशवंत चंद्रचूड यांनी होळकर दरबारातील आपले स्थान गमावले व राघोबा दादाचा पक्ष घेतल्याने तो पेशव्यांच्या मर्जीतुन देखील उतरला. त्यांना २० वर्षाची राजकीय कैद नशिबी आली. इ.स.१७७२ मध्ये ३० लाख रुपये दंड भरल्यावर फेब्रुवारी १७७२ मध्ये त्यांची सुटका झाली व ते निमगावात परत आले. २० फेब्रुवारी १७७४ मध्ये त्यांचा मृत्यु झाला. इ.स. १७३८ मध्ये गंगाधर यशवंत चंद्रचूड यांनी निमगाव खंडोबा मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा शिलालेख या मंदीरात पहायला मिळतो. गंगाधररावांनी हा निमगावाचा वाडा बांधला असावा मात्र तो कोणत्या वर्षी बांधला हे ठामपणे सांगता येत नाही.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!