नागले कोट

प्रकार : सागरी दुर्ग

जिल्हा : पालघर

उंची : 0

श्रेणी : सोपी

प्राचीन काळी कल्याण हे महत्वाचे बंदर होते. अरबी समुद्रातून उल्हास खाडीमार्गे जहाजांची ये-जा चालत असे. ह्या जलमार्गावर घोडबंदर, नागलाबंदर ही प्राचीन बंदरे होती. ह्या बंदरांचे व जलमार्गाचे रक्षण करण्यासाठी उल्हासखाडीच्या दक्षिणेला घोडबंदर, नागलाबंदर, गोमुख व ओवलेकोट हे चार किल्ले बांधले गेले तर उल्हासखाडीच्या उत्तरेला नागले, खारबाव, फिरंगकोट, कांबेकोट हे छोटे छोटे कोट बांधले गेले. नागलाबंदरच्या समोरच्या बाजुस एका छोट्याशा टेकडीवर नागले कोट बांधला गेला. उल्हास खाडीचे रक्षण करण्यासाठी कामवारी खाडीच्या मुखाशी पोर्तुगिजांनी या किल्ल्याची निर्मिती केली होती. नागले कोट व नागलाबंदर कोट या नामसाधर्म्यामुळे होणारा गोंधळ लक्षात ठेवुनच गिरीमित्रांनी या कोटास भेट द्यावी. वसई-चिंचोटी-भिवंडी मार्गावरुन नागले रेल्वे फाटकातून नागले गावात जाता येते. नागले गाव एका छोटयाशा टेकडीवर वसलेले असुन भर गावात असलेल्या या कोटाविषयी गावातील लोकांना माहित नसल्याने येथे शोधयात्रा करावी लागते. ... जुना वाडा अथवा माडी या नावाने विचारल्यास गावातील वयस्कर मंडळी हे ठिकाण दाखवतात व येथे काहीच नसल्याचे सांगतात. गावातील काही मंडळी हा पाटलाचा वाडा असल्याचे सांगतात याचाच अर्थ येथे पोर्तुगीजकालीन प्रशासकीय चौकी असावी. नागले कोटाचा अवशेष आजही काळाशी झुंजत उभा आहे तो म्हणजे कोटाच्या आतील एका वास्तुच्या चार भिंती. याचा कचराकुंडी म्हणुन वापर केल्यामुळे आत दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य आहे. किल्ल्याच्या भिंतींवर व आत झाडे वाढीस लागली आहेत ज्यांची मुळे किल्ल्यांच्या भिंतींमध्ये खोलवर रुतत चालली आहेत. या कोटाच्या बांधणीत अघडीव दगड,चिकटमाती, चुना यांचा वापर केला गेलेला दिसतो. हि वास्तू दुमजली होती हे कोटाच्या भिंतीवर लाकडी वाशाकरिता असलेल्या खोबण्यावरून लक्षात येते पण मोठया प्रमाणात पडझड झाल्याने यात संरक्षणाची सोय होती कि नाही हे कळण्यास वाव नाही. उपलब्ध अवशेष पाहता सदर कोट केवळ जकातीचे अथवा टेहळणीचे एक ठाणे असावे. किल्ला छोटेखानी असून दहा मिनिटात पाहून होतो. आज जरी किल्ला अस्तित्वात नसला तरी त्याचे नेमके भौगोलिक स्थान व उल्हास खाडीवर पहारा देण्याची मोक्याची जागा पाहाता येते. लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. साधारणतः १६व्या शतकात पोर्तुगीजानी उभारलेल्या या टेहळणीवजा कोटांचा मुख्य उपयोग जलमार्गाचे रक्षण करणे हा होता. इ.स.१७३७ मध्ये मराठयांच्या वसई मोहिमेच्या पुर्वार्धात हा परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला आणि पोर्तुगीजाचे या भागातून कायमचे उच्चाटन झाले. किल्ला पाहण्याच्या हेतुने येथे येणाऱ्याचा हिरमोड होण्याची शक्यता आहे पण सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांची टेहळणी चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या स्थानास अवश्य भेट द्यावी.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!