धुकटन कोट

प्रकार : सागरी दुर्ग

जिल्हा : पालघर

उंची : १५० फुट

श्रेणी : सोपी

उत्तर कोकणात बराच काळ पोर्तुगीजांची सत्ता असल्याने त्यांनी केवळ वसई ते दमण या सागरीपट्ट्यातच नव्हे तर जमिनीवर देखील एका समांतर रेषेत लहानमोठे कोट बांधले. वैतरणा खाडीकाठावर असलेले दहिसर,नावजे, खामलोली, धुकटन हे त्याचेच उदाहरण म्हणता येईल. यातील बहुतांशी कोटांची मोठया प्रमाणात पडझड झालेली असुन फारच थोडे अवशेषरुपात शिल्लक आहेत. पालघर जवळ पोर्तुगीजांची निर्मिती असलेला धुकटण कोट हा असाच एक लहानसा अपरिचित कोट. धुकटण कोटास पश्चिम रेल्वेचे पालघर स्थानक तसेच सफाळे स्थानक येथुन जाता येते. धुकटण कोट सफाळे रेल्वे स्थानकापासून २१ कि.मी.तर मुंबई-अहमदाबाद मार्गावर वारई फाट्यापासून ९ कि.मी.वर आहे. वराई फाटा तसेच सफाळे स्थानक येथुन धुकटण गावास जाण्यासाठी खाजगी तसेच शेअर रिक्षा उपलब्ध आहेत. सफाळेहुन जाताना पारगाव फाट्यानंतर दहिसर गावाचा फाटा लागतो. या फाट्यापासून धुकटण गाव साधारण ६ कि.मी.आत आहे. पालघर ते धुकटन हे अंतर जरी १४ कि.मी.असले तरी तेथुन वाहनांची फारशी सोय नाही. धुक्तान गावातील १०० फुट उंचीच्या टेकडीवर हा कोट असुन गावात प्रवेश केल्यावर सहजतेने नजरेस पडतो अन्यथा गावात आल्यावर कोटाकडे जाण्यासाठी माडी अशी विचारणा करावी. ... टेकडीवर आल्यावर ३० x ३० फुट आकाराची हि इमारत वगळता कोटाचे इतर कोणतेही अवशेष दिसुन येत नाहींत. या इमारतीच्या बांधकामात ओबडधोबड दगडांचा व चुन्याचा वापर केलेला आहे. हि संपुर्ण इमारत आजही पुर्णपणे शिल्लक असुन केवळ वरचे छप्पर व कमान नाहीशी झालेली आहे. धुकटन गाव सुर्या नदीच्या काठाजवळ वसलेले असुन त्यावरूनच या कोटाचे महत्व लक्षात येते. या टेकाडावरून खुप दूरवरचा परीसर तसेच सुर्या नदीचे पात्र दिसुन येते. वास्तुचे स्थान-आकार व अवशेष पहाता हि वास्तु म्हणजे गढीवजा टेहळणीचे ठिकाण असावे. कोटाच्या आवारात क्रॉसच्या स्वरूपातील स्मारक स्तंभ असुन त्यावर येथे ३०० ख्रिस्चन मारले गेल्याची नोंद आहे. कोट पाहण्यास १० मिनिटे पुरेशी होतात. या कोटाविषयी कोणतीही ऐतिहासिक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने त्याला स्थानिक गावच्या नावाने धुकटन माडी म्हणुन ओळखले जाते. साधारणतः १६व्या शतकात पोर्तुगीजानी उभारलेल्या या टेहळणीवजा कोटांचा मुख्य उपयोग जलमार्गाचे रक्षण करणे व प्रांतातील लहान मोठया कोटाना आवश्यक रसद पुरविणे हा होता. हे सगळे लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. १७३९ च्या वसई मोहिमे दरम्यान हा संपुर्ण परीसर मराठ्यांच्या ताब्यात आला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!