तडगाम

प्रकार : सागरी दुर्ग (वखार)

जिल्हा : वलसाड

उंची : 0

श्रेणी : सोपी

उत्तर कोकणात बराच काळ पोर्तुगीजांची सत्ता असल्याने वसई ते दमण या समुद्री पट्ट्यात त्यांनी बांधलेले अनेक लहान मोठे गढीवजा कोट पहायला मिळतात. यातील बहुतांशी कोटांची मोठया प्रमाणात पडझड झालेली असुन फारच थोडे अवशेष शिल्लक आहेत. दमणच्या सरहद्दीवर पोर्तुगीजांची निर्मिती असलेला तडगाम कोट हा असाच एक लहानसा कोट. एकेकाळी स्वराज्यात असणारा हा भाग भाषावार प्रांत रचना करताना गुजरात राज्यात सामील झाला. कधीकाळी हा प्रांत स्वराज्यात असल्याने मी या कोटांचा उल्लेख महाराष्ट्रातील किल्ले या सदराखाली करत आहे. आमचे एक दुर्गवेडे मित्र श्री. जगदीश धानमेहेर यांनी दिलेल्या माहितीमुळे आम्ही या कोटाला भेट देऊ शकलो. तडगाम कोटला जाण्यासाठी भिलाड हे जवळचे रेल्वे स्थानक असुन भिलाड- तडगाम अंतर १६ कि.मी.आहे. तडगाम कोट येथे जाण्यासाठी रेल्वे स्थानकातून थेट वाहनाची सोय नसल्याने फन्सामार्गे जाणे जास्त सोयीचे आहे. फन्सा ते तडगाम कोट हे अंतर ९ कि.मी आहे. फन्सा गावातुन दमण-डहाणु सागरी महामार्गाने जाताना साधारण ८ कि.मी.अंतरावर तडगाम क्रिकेट मैदान आहे. ... या मैदानाकडून एक लहान रस्ता तडगाम कोळीवाड्यात जातो. या रस्त्याने सरळ गेल्यास साधारण एक कि.मी. अंतरावर रस्त्याच्या डाव्या बाजुस झाडाझुडुपांनी वेढलेली कोटाची दुमजली वास्तु पहायला मिळते. या वास्तुच्या बांधकामात ओबडधोबड दगडांचा तसेच विटांचा वापर केलेला असुन आतबाहेर भिंतींना चुन्याचा गिलावा केलेला आहे. इमारतीच्या भिंतीत वरील मजल्यासाठी वासा रोवण्यासाठी असलेल्या खोबण्या दिसुन येतात. कोटावर मोठया प्रमाणात वडाची झाडे वाढलेली असुन आसपास काटेरी झुडपे असल्याने नीटपणे फिरता येत नाही. इमारतीच्या बांधकामात कोणतीही संरक्षण व्यवस्था नसल्याने येथे कोट असावा असे ठाम विधान करता येत नाही. या वास्तुच्या भिंतीत असलेल्या मोठमोठया कमानी पहाता हि वास्तु कोट नसुन वखार अथवा प्रशासकीय इमारत असावी. कोटाची सध्याची अवस्था फारच दयनीय असुन कोट पाहण्यास १० मिनिटे पुरेशी होतात. स्थानिकांना या वास्तुची कोणतीही माहिती नसुन या वास्तुला ते मेडी म्हणुन ओळखतात. साधारणतः १६व्या शतकात पोर्तुगीजानी उभारलेल्या या टेहळणीवजा कोटांचा मुख्य उपयोग जलमार्गाचे रक्षण करणे व प्रांतातील लहान मोठया कोटाना आवश्यक रसद पुरविणे हा होता. हे सगळे लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. १७३९ च्या वसई मोहिमे दरम्यान हा भाग मराठ्यांच्या ताब्यात आला. किल्ला पाहण्याच्या हेतुने येणाऱ्याचा येथे हिरमोड होण्याची शक्यता आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!