जुनांदुरखी

प्रकार : गढी

जिल्हा : पालघर

उंची : 0

श्रेणी : सोपी

मध्ययुगीन काळात भिवंडी हे मोठे बंदर असुन सागरी मार्गाने थेट समुद्राशी जोडले होते. उल्हास नदीची उपनदी असलेली कामवारी नदीतुन जहाजांची वाहतुक थेट भिवंडीपर्यंत होत असे. या सागरी मार्गाच्या रक्षणाकरता पोर्तुगीजांनी खारबाव,फिरंगकोट, नांदुर्खी, जुनांदुर्खी, कांबेकोट, कारीवली यासारखे अनेक लहान लहान कोट उभारले. भिवंडी-वसई दरम्यान जुनांदुर्खी गावात पोर्तुगीजांची निर्मिती असलेला जुनांदुर्खी कोट हा असाच एक लहानसा कोट. गावातील वाढत्या वस्तीने आज या कोटाला पुर्णपणे वेढलेले असुन आज हा कोट केवळ एक चौथरा म्हणुन अवशेष रुपात शिल्लक आहे. त्याची ओळख करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न. जुनांदुर्खी कोटास जाण्यासाठी वसई-चिंचोटी -अंजूरफाटा-भिवंडी मार्गावरील खारबाव व फिरंग कोट पाहुन जुनांदुर्खी कोटास जाता येते व तेथुन कांबे कोटास जाता येते अथवा भिवंडीमार्गे भिवंडी-पारोळ रस्त्याने जुनांदुर्खी हे अंतर १० कि.मी.असुन भिवंडीहुन खाजगी रिक्षाने जुनांदुर्खी गावात जाता येते. कांबे गावापासुन हे अंतर साधारण २ कि.मी.आहे. बसने आल्यास मुख्य रस्त्यापासुन जुनांदुर्खी गाव साधारण २ कि.मी. आत आहे. स्थानिकांना या कोटाची फारशी माहीती नाही पण विचारताना माडी म्हणुन चौकशी केल्यास ते आपल्याला या ठिकाणावर आणुन सोडतात. ... किंवा आता हे स्थान गुगल नकाशावर दाखवले आहे त्याची मदत घ्यावी. संपुर्ण कोटाला आता गावातील घरांचा वेढा पडलेला आहे. कोटाची पुर्णपणे पडझड झालेली असुन केवळ चौथरा शिल्लक असल्याने हे ठिकाण कचेरी कि कोट हे ठामपणे सांगता येत नाही. या कोटाचे स्थान व आकारमान पाहता या कोटाचा वापर पोर्तुगीजकालीन जकातीचे व टेहळणीचे ठाणे म्हणुन केला असावा. कोटाच्या चौथऱ्याचा आकार ३०x३० फुट असुन या बांधकामात ओबडधोबड दगड व चुना याचा वापर केलेला आहे. कोट पाहण्यास १० मिनिटे पुरेशी होतात. गावापासुन जवळच कामवारी नदीचे गाळाने भरलेले पात्र आहे. पोर्तुगीज हि दर्यावर्दी जमात. पोर्तुगालशी जलमार्गाने थेट संबंध ठेवता यावा यासाठी त्यांनी बहुतांशी कोट समुद्रकिनाऱ्यावरच बांधले. वसई ते भिवंडी दरम्यान असलेले उल्हास खाडीवरील हे कोट कामवारी खाडीच्या दोन्ही बाजूस बांधलेले आहेत. साधारणतः १६व्या शतकात पोर्तुगीजानी उभारलेल्या या टेहळणीवजा कोटांचा मुख्य उपयोग जलमार्गाचे रक्षण करणे व प्रांतातील लहान मोठया कोटाना आवश्यक रसद पुरविणे हा होता. हे सगळे लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. किल्ला पाहण्याच्या हेतुने येणाऱ्याचा येथे हिरमोड होण्याची शक्यता आहे पण ज्याला प्राचीन सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांची टेहळणी चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या स्थानास अवश्य भेट द्यावी. इ.स.१७३० मध्ये मराठयांनी पिलाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली कांबे कोट जिंकला अशी नोंद आढळते. त्यावेळी जवळच असल्याने कदाचित हा किल्लादेखील मराठ्यांच्या ताब्यात आला असावा. पुढे मराठा-पोर्तुगीज तहात हा किल्ला पुन्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला. इ.स. १७३९च्या या वसई मोहिमेत खारबाव, कांबे, फिरंगीपाडा हा परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला आणि पोर्तुगीजाचे या भागातून बस्तान उठले ते कायमचेच. किल्ला पाहण्याच्या हेतुने येथे येणाऱ्याचा हिरमोड होण्याची शक्यता आहे पण सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांची टेहळणी चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या स्थानास अवश्य भेट द्यावी. इतिहासकाळात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या या गड-किल्ल्यांचा ठेवा आज जपायला हवा, अन्यथा येणाऱ्या पिढीला स्वातंत्र्याच्या अस्तित्वाच्या खुणा शोधाव्या लागतील.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!