खताळे

प्रकार : सागरी दुर्ग

जिल्हा : पालघर

उंची : 0

श्रेणी : सोपी

खटाळे कोटास भेट देण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनने सफाळे अथवा केळवे स्थानकास उतरावे. सफाळे स्थानकापासून मधुकरनगर जाण्यास एसटी बस व खाजगी रिक्षा उपलब्ध आहेत. या वाहनांनी मधुकरनगर येथे उतरून किंवा केळवे स्थानकाहुन आल्यास दांडाखाडीमार्गे चालत १५ मिनिटात आपल्याला खटाळे कोटास पोहोचतो. खटाळे कोट सफाळे स्थानकापासून १० कि.मी.तर केळवे स्थानकापासून १२ कि.मी.वर आहे. कोटाच्या नावाविषयी ऐतिहासिक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने त्याला स्थानिक गावच्या नावाने खटाळे कोट म्हणुन ओळखले जाते. खटाळे कोट गावामध्येच भर वस्तीत असुन कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने व स्थानिक लोकांना जास्त काही माहिती नसल्याने तिथे जाण्यापूर्वी पुर्ण माहिती घेऊनच जावे. सफाळेहुन जाताना डाव्या बाजुला तर केळवेहुन येताना खटाळे गावात मुख्य रस्त्याला लागुनच एक जुनी विहीर आहे. या विहीरीवर शेंदलेले पाणी ठेवण्यासाठी आजही वापरात असलेली एक जुनी दगडी डोणी आहे. ... या विहिरीसमोरच एक छोटा सिमेंटरस्ता आत गेला आहे. या रस्त्याने ५० पाऊले आत गेल्यावर खटाळे कोटाचे अवशेष नजरेस पडतात. खटाळे कोटाचा केवळ पाया व एका बाजूची अर्धवट भिंत अवशेषरूपाने शिल्लक आहेत. सिमेंट रस्त्याने या कोटाचे मधोमध दोन भाग झालेले आहेत. सदर कोटातील उपलब्ध अवशेष पाहता सदर कोट एक लहानशी वखार आहे व नंतरच्या काळात हिचा वापर राहण्यासाठी केला गेला आहे. याच्या सभोवतालच्या भिंती पडून गेल्याने याचे स्वरूप बदललेले आहे. खटाळे परिसरातील कररूपाने जमा झालेल्या धान्याची तसेच जलमार्गाने आलेल्या मालाची साठवण करण्यासाठी या वास्तूची निर्मिती करण्यात आलेली असावी. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हि वास्तू दुमजली होती आणि ते कोटाच्या भिंतीवर लाकडी वाशाकरिता असलेल्या खोबण्यावरूनही लक्षात येते. या कोटाच्या बांधणीत अघडीव दगड, चिकटमाती, चुना, यांचा वापर केला गेला आहे. दातिवरे ते शिरगाव परिसरातील गढय़ा, कोट, वास्तू खाडीच्या समांतर रेषेत बांधण्यात आलेले आहेत. साधारणतः १६व्या शतकात पोर्तुगीजानी उभारलेल्या या वखारी व कोटांचा मुख्य उपयोग दातिवरे ते मनोर प्रांतातील लहान मोठया कोटाना आवश्यक रसद पुरविणे हा होता. हे सगळे लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. इ.स १७३९च्या वसई मोहिमेत माहिम किल्ल्यावरील विजयानंतर १० जानेवारी १७३९ रोजी हा परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला. कोटाची सध्याची अवस्था फारच दयनीय असुन कोट पाहण्यास १० मिनिटे पुरेशी होतात. किल्ला पाहण्याच्या हेतुने येणाऱ्याचा येथे हिरमोड होण्याची शक्यता आहे पण ज्याला प्राचीन सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांची चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या स्थानास अवश्य भेट द्यावी. किल्ले वसई मोहिमेचे प्रतिनिधी डॉ. श्रीदत्त राउत व त्यांचे सहकारी या कोटाची ओळख लोकांना करून देऊन खटाळे गावाचा इतिहास जिवंत ठेउन गतवैभवाचे सरंक्षण करण्याची भक्कम कामगिरी करत आहेत. वसई प्रांतातील वास्तू व पराक्रम येणाऱ्या पिढीना कळlवा यासाठी धडपडणारी किल्ले वसई मोहीम कौतुकास पात्र आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!