कुलाबा

प्रकार : जलदुर्ग

जिल्हा : रायगड

उंची : 0

श्रेणी : सोपी

अलिबाग तालुक्याची किनारपट्टी अष्टागर म्हणुन ओळखली जाते. या अष्टागराचा स्वामी म्हणजे किल्ले कुलाबा. मुंबईजवळ अलिबागच्या निसर्गरम्य भुमीत मराठा स्थापत्याची साक्ष देत जलदुर्ग कुलाबा आजही दिमाखात उभा आहे. कुलाबा हे नाव 'कुल' आणि 'आप' या शब्दांपासून तयार झाले असुन कुल म्हणजे सर्व, तर आप म्हणजे पाणी! सर्व (बाजूने) पाणी असलेली जागा म्हणजे 'कुलाप'! याचाच अपभ्रंश तो कुलाबा ! पुणे मुंबईहून अलिबागला येण्यासाठी थेट बससेवा उपलब्ध आहे. रस्त्याने अलिबाग हे मुंबईपासून अवघे ११० कि.मी. अंतरावर आहे. गेटवे ऑफ इंडियाहुन जलमार्गाने बोटीने दीड तासात अलिबागला पोहोचता येते तर रस्त्याने पनवेल-पेण-अलिबाग हे अंतर सुमारे तीन तास आहे. कुलाबा जलदुर्गावर जाण्यासाठी अलिबाग बसस्थानकाहुन चालत पंधरा-वीस मिनिटांत आपण अलिबाग किनाऱ्यावर पोहोचतो. किनाऱ्यावरून समोर १ कि.मी. अंतरावर अरबी समुद्रात असलेली कुलाबा किल्ला व सर्जेकोट ही दुर्गजोडी नजरेस पडते. ... हे दोन्ही किल्ले मिश्रदुर्ग प्रकारातील आहेत. भरतीच्या वेळी हे किल्ले चारही बाजूने पाण्याने वेढले जाऊन जलदुर्ग बनतात तर ओहोटी वेळी किल्ल्यापर्यंत जमीन उघडी पडल्याने भुईकोट बनतात. ओहोटीच्या वेळेस अलिबाग किनाऱ्याहुन किल्ल्यात चालत जाता येते. दक्षिणोत्तर पसरलेला निमुळत्या आकाराचा हा जलदुर्ग साधारण सात एकरवर पसरलेला असुन किल्ल्यासमोर असलेल्या दुसऱ्या लहानशा खडकावर सर्जेकोट उभारलेला आहे. किनाऱ्यावरून जाताना उजव्या बाजुस प्रथम सर्जेकोट लागतो व नंतर आपण कुलाबा किल्ल्यात पोहोचतो. भरतीच्या वेळेस या दोन्ही किल्ल्यामधील संपर्क तुटू नये यासाठी दगडी पूल बांधण्यात आला असुन त्यात बुरुजाची रचना करण्यात आली आहे. किल्ल्याला उत्तरेस व दक्षिणेस असे दोन दरवाजे असुन उत्तरेकडील मुख्य दरवाजा पुर्वाभिमुख असुन या दरवाजाच्या भागात दुहेरी तटबंदी बांधलेली आहे. शिवाजी महाराजांनी दुर्ग स्थापत्यात केलेल्या निरनिराळ्या प्रयोगातील एक प्रयोग या किल्ल्यावर पहायला मिळतो. हा दुर्ग बांधतांना मोठमोठे दगड खाचा मारून एकमेकांवर रचलेले आहेत. या दोन दगडांतील फटीत चुना भरलेला नसल्याने समुद्राची लाट किल्ल्याच्या तटाच्या भिंतींवर आपटल्यावर पाणी दगडांमधील फटीत घुसते व लाटेचा जोर कमी होतो. दोन बुरुजात असलेला किल्ल्याचा मुख्य दरवाजा दुहेरी तटबंदीच्या आतील बाजुस बांधलेला असुन सहजपणे नजरेस पडत नाही. दरवाजाच्या वरील भागात नगारखाना असुन कमानीच्या मध्यभागी गणेशशिल्प व आसपास मोर, हत्ती, हरिण, शरभ यांची शिल्पे कोरलेली आहेत. या दरवाजाच्या आतील बाजूस असलेला किल्ल्याचा दुसरा दरवाजा आज केवळ अवशेष रुपात शिल्लक आहे. येथे किल्ला पहाण्यासाठी पुरातत्व विभागाचे प्रवेश शुल्क भरावे लागते. किल्ल्याला एकुण १७ बुरुज असुन चार टोकांना चार, पश्चिमेला ५, पूर्वेला ४, उत्तरेला ३ व दक्षिणेला १ बुरुज अशी त्यांची रचना आहे. या बुरुजांना पिंजरा, नगारखानी, गणेश, सूर्य, हनुमंत, तोफखानी, दारुखानी, फत्तेबुरुज, दर्याबुरुज अशी नावे आहेत. याशिवाय दरवाजा समोरील तटबंदीत ६ व दगडी पुलावर ३ असे वेगळे ९ बुरुज आहेत. गडात शिरल्यावर उत्तर दिशेला तटातच तळघरात काढलेले धान्याचे कोठार दिसते. हे कोठार पाहिल्यावर आपल्याला पन्हाळा व शिवनेरी येथील अंबरखान्याची आठवण येते. चार घुमटांचे छत आणि त्याला गोल खांबांचा आधार अशी याची रचना आहे. कधीकाळी इथे धान्याची पोती भरून ठेवली जात असतील पण आता मात्र पुरातत्व विभागाने येथे चुन्याची पोती भरून ठेवली आहेत त्यामुळे आत जाता येत नाही. बुरुजावरील ढालकाठीला आधार म्हणुन बुरुजावरील ढालकाठी वरील बुरुजापासुन या तळघरात आली आहे व येथेच तिला आधारासाठी ओटा बांधलेला आहे. या ओट्यात पुरातन ढालकाठीची काठी आजही दिसून येते. तटाला लागुन दहाबारा घरांची वस्ती असुन येथील बुरूजावर दोन मध्यम आकाराच्या तोफा पडलेल्या आहेत. गडात शिरल्यावर समोर गुलवती देवीची घुमटी तर तटाकडे गडदेवता भवानीदेवी मंदिर दिसते. गडदेवता भवानी देवीच्या मंदिरात गणेश आणि वेताळ यांच्याही मुर्ती आहेत. या देवतांचे दर्शन घेऊन आपल्या पुढील दुर्गफेरीस सुरुवात करायची. येथुन पुढे निघाल्यावर डाव्या बाजुस वाडे, पागा, कोठी यांचे अवशेष दिसतात. डावीकडची वाट हाजी हजरत कमालउद्दीन शहा ह्यांच्या दर्ग्याकडे जाते तर सरळ जाणाऱ्या वाटेने दोन्ही बाजूचे अवशेष पहात किल्ल्याच्या दुस-या दरवाजात जाता येते. या वाटेवर कान्होजी आंग्रे यांचा निवास असलेल्या पडझड झालेल्या वाडय़ाचे अवशेष दिसतात. कधीकाळी पाचमजली असलेला हा वाडा १७५३ ते १७८७ या ३४ वर्षांत तब्बल पाच वेळा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. इ.स. १७७०मधे पिंजरा बुरूजाजवळ आग लागली. काही वेळातच ती फडणीस वाडा, जुना राजवाडा व तबेल्यापर्यंत पसरली. त्यानंतर १७८७ मधे लागलेल्या आगीत वाडयाची प्रचंड हानी झाली. पुढे सन १८१६मधे नानीसाहेबाचा वाडा नावाची पाच मजली इमारत राघोजी आंग्रे यांनी रहाण्यासाठी बांधली पण १८३९ मध्ये आंग्रे संस्थान इंग्रजांनी खालसा केले. इ.स.१८४२ मधे इंग्रजांनी या वाडय़ाच्या लाकडांचा लिलाव केला व इथले दगड वापरुन अलिबागच्या पाणी पुरवठा विभागाची इमारत बांधली. वाटेच्या पुढील भागात प्राकारात बांधलेले गणपतीचे मंदिर असुन मंदिराच्या आवारात उत्तरेस मारुतीचे व दक्षिणेस महादेवाचे मंदिर आहे. महादेव मंदिरासमोर सुंदर नक्षीकाम केलेले तुळशी वृंदावन पहायला मिळते. या मंदिराचे बांधकाम राघोजी आंग्रे यांनी सन १७५९ मध्ये केले. मुख्य मंदिराच्या दारातच दगडातच बांधलेले कारंजे आहे. मुख्य मंदिराला अष्टकोनी सभागृह आणि त्यामागे अष्टकोनी आकारातच गर्भगृह आहे. दोन्ही दालनांना वेलबुट्टीची नक्षी असलेली गवाक्षे आणि घुमटाकृती छत आहे. मंदिरातील गाभाऱ्याचे प्रवेशद्वार खुपच सजवलेले असुन उंबरठयावर कीर्तिमुख, दोन्ही बाजुस द्वारपाल, व्याघ्रमुखे, सभोवतीच्या चौकटीवर पाना-फुलांच्या माळा आणि वरच्या द्वारपट्टीवर अन्य देवतांबरोबर मधोमध गणेशही विराजमान झालेला आहे. या दरवाजाच्या डाव्या बाजूस कार्तिकस्वामी, तर उजव्या बाजूस गणेशमूर्तीची स्थापना केलेली आहे. गर्भगृहात संगमरवरातील उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायकाची दीडफुट उंच मुर्तीची स्थापना केलेली आहे. या मुर्तीशेजारी अक्षमाला, नाग, डमरू आदी आयुधे घेतलेला शिव, कमळे धारण केलेला चतुर्भुज सूर्य, तर पद्म, गदा, चक्र आणि शंख घेतलेला विष्णु तसेच त्रिशूल, चाप, तलवार, नाग आणि पेला हाती घेतलेली अष्टभुजा महिषासुरमर्दिनी या चार देवता स्थापन करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे मंदिर गणेश पंचायतन बनले आहे. मंदीरांचे प्रांगणाबाहेर काळ्या दगडातील जुनी बांधकामातील नक्षीदार २४ फुट उंचीची दीपमाळ आहे. या मंदिरासमोरच एक चिरेबंदी बांधणीची गोडया पाण्याची देखणी पुष्कर्णी आहे. १०० x १०० फुट अशा विस्तीर्ण आकारातील हा तलाव राघोजी आंग्रे यांनी बांधला. चारही बाजूंनी पायऱ्यांची रचना असलेल्या या पुष्करणीच्या एका बाजुस सात कोनाडे असुन त्यात सप्तमातृका स्थापन केल्या आहेत. पुष्करणीचे सौंदर्य आजही शिल्लक असले तरी यातील पाणी मात्र शेवाळाने हिरवेगार झाले आहे. पुष्कर्णीच्या दक्षिणेकडील भिंतीला लागुनच बापदेवाची घुमटी आहे. पुष्कर्णीपुढे तटाबाहेर पायऱ्या असलेली गोड पाण्याची विहीर आहे. याशिवाय गडातील पिण्याच्या पाण्याची सोयीसाठी दक्षिणेकडे अंधारबाव नावाची दुसरी विहीर आहे. किल्ल्यात गोडया पाण्याच्या एकुण चार विहीर असुन त्यातील या दोन भुमिगत विहीरी आहेत. किल्ल्याच्या दक्षिण टोकाला असणारा दरवाजा धाकटा दरवाजा / यशवंत दरवाजा /दर्या दरवाजा/ दस्त दरवाजा अशा वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. या दरवाजावर गणपती, गरुड, मारुती, मगरी, कमळे, वेलबुट्टी यांची नक्षीसोबत पायात चार, तोंडात एक आणि शेपटीत एक असे सहा हत्ती पकडलेले व्यालशिल्प कोरलेले आहे. दरवाजा जवळ कान्होबाची म्हणजेच कानिफनाथांची घुमटी व द्वाररक्षक देवतेचा शेंदुर फासलेला दगड आहे. घुमटीच्या डाव्या बाजूच्या तटाच्या आत लांबवर बांधलेल्या दोन खोल्या दिसतात. हे बहुधा कारागृह अथवा शौचकूप असावे. किल्ल्याच्या या भागात तटाबाहेर आंग्रेकालीन गोदीचे अवशेष आहेत. तेथे नवीन जहाजे बांधली जात व जुनी दुरुस्त केली जात असत. पुरातन गोदीचे हे अवशेष खरोखरच अभ्यासनीय आहेत. गोदीच्या या भागात यशवंत दारीदेवी व वराह हनुमान मंदिर आहे. येथे किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. गडाच्या तटबंदीवरून चालत संपुर्ण गड पाहता येतो. किल्ल्याच्या उत्तर बुरुजावर लोखंडी गाडयावर चढवलेल्या उत्तम स्थितीतील दोन तोफा आहेत. या तोफांवर तोफा बनवणाऱ्या कंपनीच नाव व वर्ष कोरलेल आहे. उत्तरेकडील या बुरूजावरून खांदेरी-उंदेरी, सागरगड हे किल्ले नजरेस पडतात. संपुर्ण किल्ला फिरण्यास दोन तास पुरेसे होतात. कुलाबा किल्ल्याच्या बांधकाम कालखंडाविषयी इतिहासकारात एकवाक्यता नाही. ग्रॅण्ट डफ याच्या मराठयांची बखर या ग्रंथातील नोंदीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला १६६२ च्या सुमारास नव्याने बांधून मजबूत केला तर रियासतकार सरदेसाई यांच्या मते या किल्ल्याचे बांधकाम छत्रपती शिवरायांच्या अखेरच्या काळात सुरू होऊन त्यांच्या मृत्यूआधी काही दिवस पूर्ण झाले. अलिबागच्या समुद्रात असलेल्या खडकावर १२ मार्च १६८० ते जुन १६८१पर्यंत भिवजी गुजर यांच्या नेतृत्वाखाली मराठी सैन्याची चौकी होती. २१ मार्च १६८० रोजी त्यांनी इथल्या नवघर नावाच्या खडकाळ बेटावर हा जलदुर्ग बांधण्यास सुरुवात केली. त्यांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याचे बांधकाम जून १६८१ मध्ये पूर्ण केले. म्हणजे छत्रपती शिवरायांनी बांधलेला हा शेवटचा जलदुर्ग म्हणता येईल. प्रथम शिवशाही नंतर आंग्रे व शेवटी इंग्रज अशा विविध राजवटी कुलाबा किल्ल्याने पाहिल्या. महाराजांनंतर मराठी आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांच्या कारकीर्दीत कुलाबा किल्ला खऱ्या अर्थाने प्रसिध्दीस आला. इंग्रज ज्यांना समुद्रावरील शिवाजी म्हणत त्या कान्होजी आंग्रेनी आपले प्रमुख ठाणे म्हणून कुलाबा किल्ल्याची निवड केली. सुवर्णदुर्ग या किल्ल्यावरून त्यांनी आपले आरमार कुलाबा किल्ल्यावर हलवले आणि हा किल्ला आरमारी डावपेचांचा केंद्र बनला. जंजिऱ्याच्या सिद्दीने अनेक वेळा कुलाबा किल्ल्यावर हल्ला केला पण प्रत्येकवेळी त्याचा पराभव झाला. २९ नोव्हेंबर १७२१ रोजी ब्रिटीश व पोर्तुगिज यांच्या संयुक्त सैन्याने अलिबागवर ६५०० पायदळ,२०० घोडेस्वार,२४ पौंडी आठ व १८ पौंडी आठ तोफा शिवाय इतर लहान मोठया तोफा, ६ युध्दनौका व त्यावरील सैनिक असे प्रचंड सैन्यबळ घेऊन कुलाबा किल्ल्यावर हल्ला केला. यावेळेस किल्ल्यावर फक्त १००० पायदळ आणि ७०० घोडदळ होते. पण कान्होजी आंग्रे यांनी बाजीराव पेशव्यांच्या सहाय्याने या संयुक्त फौजेचा सपशेल पराभव केला. ४ जुलै १७२९ रोजी कान्होजी आंग्रे ह्यांचे कुलाबा किल्ल्यात निधन झाले. त्यांची समाधी आजही आपल्याला अलिबाग मधील ठुकराली नाका येथील छत्रीबागेत पहायला मिळते. इ.स. १८३९ मध्ये आंग्रे संस्थान खालसा केल्यावर काही काळ इंग्रजांच्या सैन्याची एक तुकडी येथे रहात होती. कुलाबा किल्ल्यावर आंग्रे यांच्या पाच पिढय़ा नांदल्याने किल्ल्याचा बहुतांशी इतिहास आंग्रे घराण्याशी निगडीत आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!