आगाशी

प्रकार : भुईकोट

जिल्हा : पालघर

उंची : समुद्रसपाटी

श्रेणी : सोपी

आगाशी येथे आता प्रत्यक्ष कोणताही कोट अथवा त्याचे अवशेष अस्तित्वात नसले तरी महिकावती बखरमध्ये बिंब राजाच्या कारकिर्दीत आगाशी येथे कोट असल्याचे उल्लेख आढळतात. आता असलेले भवानी शंकर मंदिर आणि त्याच्या शेजारील तलाव याच परिसरात हा कोट असावा. तलावाच्या बांधकामात काही प्रचंड दगड व प्राचीन मूर्ती आढळून येतात ज्या तेथील प्राचीन कोटाचे अस्तित्व सिद्ध करतात. ऐतिहासिक नोंदीप्रमाणे वसई किल्ल्यावरील चिमाजी आप्पांच्या १६ मे १७३९ च्या विजयानंतर सन १७३९ ते १७५० या कालखंडात श्री भवानी शंकर मंदिर आगाशीची निर्मिती करण्यात आली. या मंदिराची उभारणी चिमाजी आप्पांचे आगाशी अर्नाळा प्रांताचे सरसुभेदार श्री. शंकराजी केशव फडके यांनी केली. श्री भवानी मंदिराला लागून असणारा भवानी तलाव याच कालखंडात बांधण्यात आला. या तलावातील शिल्पे व नक्षीकाम आजही गतवैभवाची साक्ष देत आहे. ... सध्या जीर्णोद्धाराच्या नावाखाली या मंदिराचे मूळ सौंदर्य पार लयाला गेले आहे. मंदिर विस्तारासाठी आवारातील प्राचीन दीपमाळ उखडली गेली आहे. गेली १०० वर्षाहून अधिक काळ आगाशी शंकर मंदिराच्या आवारातील श्री. शंकराजी फडके व इतर मुत्सद्दी शिलेदार व त्यांच्या नातेवाईकांच्या समाध्या व स्मृतिस्थळे प्रचंड दुरावस्था व दुर्गंधीच्या विळख्यात सापडलेल्या होत्या. किल्ले वसई मोहिमेचे प्रतिनिधी डॉ. श्रीदत्त राउत व त्यांचे सहकारी यांनी अखंड प्रयत्न आणि श्रमदानाने या समाध्या घाणीतून व झाडीतून मोकळ्या करत गतवैभवाचे सरंक्षण करण्याची भक्कम कामगिरी केली आहे. वसई प्रांतातील परकीय आक्रमणांना व जुलमाना धडा शिकवून स्वराज्यासाठी प्राण वेचणाऱ्या या ऐतिहासिक महापुरुषांची आठवण व पराक्रम येणाऱ्या पिढीना कळlवा यासाठी धडपडणारी किल्ले वसई मोहीम कौतुकास पात्र आहे. कोट अथवा किल्ला म्हणुन पाहण्यासारखे येथे काहीच नसले तरी भवानी शंकर मंदिरावरील शिल्पे प्रेक्षणीय व दुर्मिळ आहेत. खासकरून तेथील मंदिरावर असणारे कामधेनु आणि कल्पवृक्ष हे शिल्प सहजासहजी कुठे आढळत नाही. किल्ला पाह्ण्यासाठी अस्तित्वात नसला तरी एका सुंदर ऐतिहासिक स्थानाला भेट देण्यासाठी एकदा तरी येथे यायला हवे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!