VIRATHAN

TYPE : COASTAL FORT

DISTRICT : PALGHAR

HEIGHT : 0

GRADE : EASY

विराथण कोटास भेट देण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनने सफाळे स्थानकास उतरावे. सफाळे स्थानकापासून विराथण येथे जाण्यास एसटी बस व खाजगी रिक्षा उपलब्ध आहेत. विराथण गावात विराथणबुद्रुक येथील विठ्ठल वाडीजवळ १०० फुट उंचीच्या एका लहानशा झाडीभरल्या टेकडीवर विराथण कोट उभा आहे. टेकडी चढण्यास दहा मिनिटे पुरेशी होतात. या विभागातील इतर पोर्तुगीज वास्तुंशी तुलनात्मकदृष्टया विचार करता विराथण कोटाचे बरेचसे अवशेष शिल्लक आहेत. विराथण कोट सफाळे स्थानकापासून ५ कि.मी.वर आहे. कोटाच्या नावाविषयी ऐतिहासिक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने त्याला स्थानिक गावाच्या नावाने विराथण कोट ,विराथण माडी, विराथण किल्ला म्हणुनच ओळखले जाते. गावामध्ये स्थानिक लोकांना याची जास्त माहिती नसल्याने तिथे जाण्यापूर्वी या कोटाची पुर्ण माहिती घेऊनच जावे. टेकडीवर चढताच कोटाचे अवशेष नजरेस पडतात. ... कोटाच्या सर्व भिंतीवर झाडांनी आपले साम्राज्य पसरवले आहे. विराथण कोटाभोवतालची तटबंदी आजही शिल्लक आहेत. सदर कोटातील उपलब्ध अवशेष व ऐतिहासिक संदर्भ पाहता या कोटाचा वापर पोर्तुगीजकालीन शासकीय कार्यालय तसेच वखार म्हणुन केला गेला असावा. या कोटाच्या बांधणीत घडीव व अघडीव दगड, चिकटमाती, चुना, यांचा वापर केला गेला आहे. हि वास्तू तीन मजली होती हे कोटाच्या भिंतीवर लाकडी वाशाकरिता असलेल्या खोबण्यावरूनही लक्षात येते. या वास्तूतील भिंतीत हवा खेळती राहण्याकरता असलेल्या खापरी नळ्या तसेच वरच्या मजल्यावर जाण्यासाठी असलेला जिनामार्ग हे या कोटाचे खास वैशिष्ठय आहे. याशिवाय कोटाच्या आत पोर्तुगीजकालीन चर्च व वेदीची जागा दिसून येते. कोटाच्या तटबंदीत संरक्षणाच्या रचना आढळून येतात. या कोटाच्या बांधकामासाठी वापरलेला दगड याच पठारावरील समोरच्या टेकडीतुन काढला असल्याच्या खुणा आढळून येतात. कोटाची मालकी खाजगी असल्याने आपण हा विचार मनात ठेऊनच भ्रमंती करावी. दातिवरे ते शिरगाव परिसरातील गढय़ा, कोट, वास्तू खाडीच्या समांतर रेषेत बांधण्यात आलेले आहेत. साधारणतः १६व्या शतकात पोर्तुगीजानी उभारलेल्या या कोटांचा मुख्य उपयोग दातिवरे ते मनोर प्रांतातील लहान मोठया कोटाना आवश्यक रसद पुरविणे हा होता. हे सगळे लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. इ.स १७३९च्या वसई मोहिमेत माहिम किल्ल्यावरील विजयानंतर १० जानेवारी १७३९ रोजी हा परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला. संपुर्ण कोट पाहण्यास १ तास पुरेसा होतो. ज्यांना प्राचीन सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांची चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या स्थानास अवश्य भेट द्यावी. किल्ले वसई मोहिमेचे प्रतिनिधी डॉ. श्रीदत्त राउत व त्यांचे सहकारी या कोटाची ओळख लोकांना करून देऊन विराथन गावाचा इतिहास जिवंत ठेउन गतवैभवाचे सरंक्षण करण्याची कामगिरी करत आहेत.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!