SOLSUMBHA KOT

TYPE : COASTAL FORT

DISTRICT : VALSAD

HEIGHT : 0

GRADE : EASY

उत्तर कोकणात बराच काळ पोर्तुगीजांची सत्ता असल्याने वसई ते दमण या समुद्री पट्ट्यात त्यांनी बांधलेले अनेक लहान मोठे गढीवजा कोट पहायला मिळतात. यातील बहुतांशी कोटांची मोठया प्रमाणात पडझड झालेली असुन फारच थोडे अवशेष शिल्लक आहेत. उंबरगाव जवळ पोर्तुगीजांची निर्मिती असलेला सुलसुंभा कोट हा असाच एक लहानसा कोट. एकेकाळी स्वराज्यात असणारा हा भाग भाषावार प्रांत रचना करताना गुजरात राज्यात सामील झाला. वसई मोहिमेनंतर पोर्तुगीजांचे येथुन उच्चाटन झाल्यावर हा प्रांत स्वराज्यात आल्याने मी या कोटांचा उल्लेख महाराष्ट्रातील किल्ले या सदराखाली करत आहे. आमचे एक दुर्गवेडे मित्र श्री. जगदीश धानमेहेर यांनी दिलेल्या माहितीमुळे आम्ही या कोटाला भेट देऊ शकलो. सुलसुंभा कोट पहाण्यासाठी उंबरगाव हे जवळचे रेल्वे स्थानक असुन उंबरगाव- सुलसुंभा कोट हे अंतर १.५ कि.मी.आहे. सुलसुंभा येथे जाण्यासाठी उंबरगाव रेल्वे स्थानकातून खाजगी रिक्षांची सोय आहे. कोटावर जाण्यासाठी आधी सरकारवाडा गणेश मंदीर अशी विचारणा करावी व तेथे पोहोचल्यावर मेडी अशी विचारणा करावी. ... कोटाजवळ आल्यावर वाटेच्या उजव्या बाजुस झाडाझुडुपांनी वेढलेली सुलसुंभा कोटाची वास्तु पहायला मिळते. पोर्तुगीजांनी बांधलेल्या या टेहळणीच्या बहुतांशी वास्तु एकसमान व एक आकाराच्या दिसुन येतात. ३० x ३० फुट आकाराची हि दुमजली इमारत वगळता कोटाचे इतर कोणतेही अवशेष दिसुन येत नाहींत. या इमारतीच्या बांधकामात ओबडधोबड दगडांचा तसेच विटांचा वापर केलेला आहे. इमारतीच्या आतील भिंतींना चुन्याचा गिलावा केलेला आहे. इमारतीच्या भिंतीत वरील मजल्यासाठी वासा रोवण्यासाठी असलेल्या खोबण्या दिसुन येतात. दरवाजाची कमान आजही शिल्लक असुन दरवाजाच्या आतील बाजुस अडसर सरकवण्यासाठी खोबणी दिसुन येतात. वास्तुच्या वरील मजल्यावर चारही बाजुच्या भिंतीत मोठमोठया खिडक्या दिसतात. इमारतीच्या बांधकामात कोणतीही संरक्षण व्यवस्था नसल्याने येथे कोट असावा असे ठाम विधान करता येत नाही. या वास्तुचे स्थान व बांधकाम पहाता हि वास्तु म्हणजे जकातनाका किंवा प्रशासकीय ठिकाण असावे. कोटाची सध्याची अवस्था फारच दयनीय असुन कोट पाहण्यास १० मिनिटे पुरेशी होतात. साधारणतः १६व्या शतकात पोर्तुगीजानी उभारलेल्या या टेहळणीवजा कोटांचा मुख्य उपयोग जलमार्गाचे रक्षण करणे व प्रांतातील लहान मोठया कोटाना आवश्यक रसद पुरविणे हा होता. हे सगळे लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. १७३९ च्या वसई मोहिमे दरम्यान हा भाग मराठ्यांच्या ताब्यात आला. किल्ला पाहण्याच्या हेतुने येणाऱ्याचा येथे हिरमोड होण्याची शक्यता आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!