SALPE

TYPE : GADHI

DISTRICT : SATARA

HEIGHT : 0

GRADE : EASY

महाराष्ट्रात गढीकोटांची संख्या हजारोच्या घरात आहे. यातील बऱ्याच गढी काळाच्या ओघात पुर्णपणे नष्ट झालेल्या आहेत तर उरलेल्या गढी त्यांचे अवशेष संभाळत काळाशी झुंज देत आहेत. मराठेशाहीच्या उत्तरकाळात बऱ्याच सरदारांनी त्यांच्या प्रदेशात भुईकोटवजा गढ्या बांधल्या. यातील बरेच भुईकोट गढी हे खाजगी स्वरूपाचे असुन त्यांचा उपयोग महसूल जमा करणे व स्वसंरक्षण यासाठी होत होता. या भुईकोटाचा फारसा वापर न झाल्याने व लवकरच इंग्रज सत्ता भारतावर आल्याने या कोटांवर फारसा इतिहासा घडला नाही. खाजगी मालकीचे हे भुईकोट व गढ्या आज मोठया प्रमाणात उध्वस्त झाले असुन इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहेत. अशीच एक उध्वस्त गढी म्हणजे सालपे येथील गढी. वतने खालसा झाल्यावर खाजगी मालमत्ता असलेल्या या गढीची देखभाल करणे गढी मालकाला अवघड झाल्याने बहुतांशी गढीकोट उध्वस्त होत आहेत. स्थानिकांची उदासीनता देखील या गढीकोटांच्या ऱ्हासाला कारणीभूत होत आहे. ... या गढीची माहिती आंतरजाल व इतर कोठेही सापडत नसल्याने या गढीची ओळख करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न. काही काळाची सोबती असलेली हि गढी अंतिम श्वास घेण्यापुर्वी लवकरात लवकर भेट दयायला हवी. माझे दुर्गभटके मित्र बलराज मुदलीयार यांनी सालपे येथे एक गढी असल्याचे माझ्या कानावर घातले आणि आम्ही आमच्या सातारा दुर्गभ्रमंतीत आमचा मोर्चा सालपे येथील गढीकडे वळवला. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात असलेले हे गाव फलटण पासुन ३८ कि.मी.वर असुन लोणंद पासुन १० कि.मी.अंतरावर आहे. गावात प्रवेश करताना भैरवनाथ मंदीरासमोर असलेला भलामोठा दगडी बांधकामातील समाधी चौथरा आपले लक्ष वेधुन घेतो. याशिवाय मंदिराशेजारी तीन दगडी समाधी असुन यातील दोन समाधीला चिटकुन सतीशीळा ठेवलेल्या आहेत. गावातील वयस्कर माणसाना देखील या समाधीबद्दल काही सांगता येत नाही. खुप मोठया प्रमाणात चौकशी केल्यावर या समाधी धनगर समाजातील सरदारांच्या आहेत इतकीच माहिती मिळाली. यानंतर आम्ही गावाच्या मध्यभागी असलेल्या गढीकडे आलो. गढीचे उत्तराभिमुख मुख्य प्रवेशद्वार कमानीसह आजही सुस्थितीत असुन त्याशेजारील तटबंदी मात्र पुर्णपणे ढासळली आहे. गढीचे प्रवेशद्वार भव्य असुन अंबारीसहित हत्ती जाईल इतपत त्याची उंची आहे. दरवाजाचे खालील बांधकाम घडीव दगडात केलेले असुन वरील बांधकाम विटांनी केलेले आहे. या बांधकामात बंदुकीच्या मारगीरीसाठी असलेल्या जंग्या दिसुन येतात. माझ्या आजवरच्या भटकंतीत या गढी विषयी पाहिलेली अनास्था मी इतरत्र कोठेही अनुभवली नाही. गढीचा परीसर साधारण अडीच एकरचा असुन गढीच्या एका कोपऱ्यात गढीचे मालक असलेले शिंदे कुटुंब रहाते. खेदाची गोष्ट म्हणजे या शिंदे कुटुंबाला आपल्या पुर्वजांविषयी तसेच या गढीबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती नाही. ते हि गढी आमच्या पूर्वजांनी बांधली असुन आमच्या आजोबांच्या काळापर्यंत वापरात असल्याचे सांगतात. याशिवाय त्यांना इतर कोणतेही माहिती देता येत नाही. गढीच्या आतील भागात मोठया प्रमाणात बाभळीचे रान माजले असुन या रानात मोठया प्रमाणात वास्तु अवशेष विखुरलेले आहेत. या अवशेषात एक मंदिर असुन एका चौथऱ्यावर तीन मजली वाड्याचे अवशेष दिसुन येतात. वाड्याचे खालील दोन मजले दगडात बांधले असुन तिसरा मजला विटांनी बांधला आहे. गढीत माजलेल्या या झाडोऱ्यातुन फिरताना आतील भागात दगडात बांधलेली एक विहीर तसेच गढीच्या पुर्व भागात ढासळलेली तटबंदी दिसुन येते. गढीत असलेल्या बाभळीच्या काटेरी रानामुळे इतर भागात जाता येत नाही. गढीचा हा परीसर फिरण्यास १५ मिनिटे पुरेशी होतात. गढीचा इतर कोणताही इतिहास ज्ञात होत बसला तरी गढीचे बांधकाम शिवकाळानंतर झाल्याचे जाणवते. थोरले शाहू छत्रपतींच्या वेळी आणि नंतर दुसरा बाजीराव काळात फौजांची हालचाल सालपे मार्गे पुणे सातारा होताना दिसते. इंग्रजांच्या फौजेने दुसऱ्या बाजीरावाचा पाठलाग सालपे घाटाने केल्याचे उल्लेख येतात. या काळात सालपे हे मराठयांच्या ताब्यात असलेले एक ठाणे होते.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!