RAJGOLI

TYPE : GADHI

DISTRICT : KOLHAPUR

HEIGHT : 0

GRADE : EASY

महाराष्ट्राला गडकिल्ल्याचा वारसा इतक्या मोठया प्रमाणात लाभला आहे कि कित्येक गढीकोटांची नोंद सरकारी दफ्तरात किंवा दुर्गप्रेमींच्या यादीतही दिसत नाही. मराठयांच्या उत्तरकाळात पेशवे सत्तेच्या केंद्रस्थानी असताना महाराष्ट्रात बरेच भुईकोट व गढ्या बांधल्या गेल्या. यातील काही भुईकोट वाडे हे खाजगी स्वरूपाचे असुन त्यांचा उपयोग महसूल जमा करण्यासाठी व स्वसंरक्षणसाठी होत होता. वतने खालसा झाल्यावर खाजगी मालमत्ता असलेल्या या गढीकोटाची देखभाल करणे गढी मालकाला अवघड झाल्याने बहुतांशी गढीकोट उध्वस्त होत चालले आहेत तर काही ठिकाणी वाढत्या कुटुंबामुळे व कामधंद्याच्या निमित्ताने गढीमालक इतरत्र स्थलांतरीत झाल्याने गढ्या ओस पडुन इतिहास जमा झाल्या आहेत. स्थानिकांची या वास्तुप्रती असलेली उदासीनता देखील या गढीकोटांच्या ऱ्हासाला कारणीभूत होत आहे. कागदोपत्री गढी अथवा कोट अशी कोणतीही नोंद नसलेली राजगोली गावात असलेली गढी त्यापैकी एक. ... या गढीवजा कोटाची माहिती आंतरजाल व इतर कोठेही सापडत नसल्याने या गढीची ओळख करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न. कोल्हापुर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात राजगोली गावात असलेल्या या गढीला भेट देण्यासाठी आपल्याला संकेश्वर हे कर्नाटकातील शहर गाठावे लागते. राजगोली गाव कोल्हापुर पासुन कागल-निपाणी-संकेश्वर मार्गे ९५ कि.मी.अंतरावर असुन संकेश्वर राजगोली हे अंतर ३५ कि.मी. आहे. राजगोली गावात हि गढी इनामदार वाडा म्हणुन ओळखली जाते. गढीचे एकुण बांधकाम पहाता या गढीची बांधणी शिवकाळानंतर झाली असावी. साधारण आयताकृती आकार असलेली हि गढी चार एकर परीसरावर पुर्वपश्चिम पसरलेली असुन गढीची लांबीरुंदी ४०० x ३५० फुट तर तटाची जाडी १२ फुट आहे. गढीच्या उत्तर बाजुस असलेला खंदक आजही काही प्रमाणात शिल्लक असुन इतर बाजुस असलेला खंदक मात्र पुर्णपणे नष्ट झाला आहे. गढीची २० फुट उंच तटबंदी ओबडधोबड दगडांनी बांधलेली असुन बांधकाम जोडण्यासाठी कोणतेही मिश्रण वापरलेले नाही. गढीच्या तटबंदीत चार टोकाला चार व मध्यभागी दोन असे एकुण ६ बुरुज असुन तटबंदी व बुरुजात बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या आहेत. गढीचे पुर्वाभिमुख प्रवेशद्वार हे मुख्य तटबंदी पासुन वेगळे बांधलेले असुन या बांधकामात रणमंडळाची रचना दिसुन येते. त्यामुळे मुख्य दरवाजातून आत शिरल्यावर वळणदार मार्गाने दुसरा दरवाजा पार केल्यावरच आपला गढीत प्रवेश होतो. पहिल्या प्रवेशद्वाराचा लाकडी दरवाजा आजही शिल्लक आहे. या मुख्य दरवाजाशेजारी तटबंदीत एक लहान दिंडी दरवाजा असुन त्यावर दगड रचुन हा मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला आहे. याशिवाय तटबंदीच्या पुर्व भागात नव्याने बांधलेला अजुन एक लहान दरवाजा पहायला मिळतो. मुख्य दरवाजातून आत शिरल्यावर उजव्या बाजुस असलेल्या चौथऱ्यावर पहारेकऱ्याच्या देवड्या दिसतात. या चौथऱ्याच्या खालील बाजुस दगड टाकुन बंद केलेली एक लहान दगडी चौकट पहायला मिळते. येथुन दुसरा दरवाजा पार केल्यावर आपला गढीत प्रवेश होतो. गढीत शिरल्यावर समोर एका चौथऱ्यावर बांधलेले शिवमंदीर आपले लक्ष वेधुन घेते. या मंदिरासमोर दगडी बांधकामातील एक चौकोनी बारव असुन या विहिरीचे पाणी आजही वापरात आहे. गढीच्या आतील बाजुस गढीचे मालक देसाई यांचे काही वंशज आजही वास्तव्यास असुन त्यांची घरे आहेत. यातील मुख्य ठिकाणी असलेला वाडा १८० वर्ष जुना आहे. गढीच्या आतील बाजुस काही ठिकाणी तटबंदीची मोठया प्रमाणात पडझड झालेली असुन घरे नसलेल्या भागात झाडी वाढलेली आहे. संपुर्ण गढी पहाण्यास अर्धा तास पुरेसा होतो. इ.स.१७१५ मध्ये करवीरकर छत्रपतीचे सरदार यमाजी रुद्र यांनी बेळगावचा किल्ला जिंकण्यासाठी केलेल्या पराक्रमाबद्दल त्यांना राजगोली येथे वतन देण्यात आले व त्यानंतरच्या काळात त्यांनी या गढीची बांधणी केली. काही काळाची सोबती असलेल्या ह्या गढीचे साक्षीदार होण्यासाठी या गढीला लवकरात लवकर भेट दयायला हवी.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!