PRAYAGRAJ
TYPE : GROUND FORT
DISTRICT : PRAYAGRAJ
GRADE : EASY
आपले दुर्गभरारी या संकेतस्थळाची निर्मिती करताना यावर केवळ स्वराज्यातील किल्ले व महाराष्ट्रातील किल्ले यांची माहीती देण्याचा मानस होता. पण कामानिमित्ताने संपुर्ण भारताची भ्रमंती झाली व इतर राज्यातील अनेक किल्ले देखील पाहण्याची संधी मिळाली. आजवर इतर राज्यातील अनेक किल्ल्यांची भटकंती झाली पण त्या किल्ल्यांची माहीती मी आपल्या संकेतस्थळावर दिली नाही. पण सध्या काहीसा मोकळा वेळ हाताशी असल्याने मी पाहिलेल्या भारतातील काही महत्वाच्या किल्ल्यांची माहीती आपल्या संकेतस्थळावर टाकण्याचे ठरवले आहे व त्याची सुरवात मी प्रयाग संगमावर असलेल्या अलाहाबादच्या किल्ल्यापासुन करत आहे. गंगा यमुना व गुप्त सरस्वती यांच्या संगमावर असलेला हा किल्ला प्रामुख्याने यमुना नदीच्या काठावर आहे. किल्ल्याच्या आत एक शिलालेख असुन त्यात इ.स. १५८३ साली येथील बांधकाम केल्याचे लिहिले आहे. पण अबुल फज़ल या अकबरकालीन इतिहासकाराने अकबरनामात लिहिल्याप्रमाणे मुघल सम्राट अकबर यांनी इ.स. १५८३ मध्ये हा किल्ला बांधला.
...
तो अकबरनामात म्हणतो कि "बराच काळ [अकबराला] पियाग (प्रयाग) या शहरात एक भव्य नगरी व एक उत्कृष्ट किल्ला उभारायची इच्छा होती, जेथे गंगा व यमुना एकत्र येतात. हे स्थान भारतातील लोकांसाठी अत्यंत पवित्र मानले जाते आणि अनेक संन्याशांचे तीर्थक्षेत्र आहे. अकबरने या किल्ल्याचे नाव "इलाहाबास" (अल्लाची नगरी) असे ठेवले, जे पुढे जाऊन "इलाहाबाद" झाले. अकबराने हा किल्ला बांधल्याने हा किल्ला अकबर किल्ला म्हणुन देखील ओळखला जातो. पण आता झालेल्या नामांतरानुसार आपण या किल्ल्याला प्रयागराज किल्ला म्हणुन संबोधणे जास्त योग्य आहे. इतिहासकार कॅथरीन आशर यांच्या मते पूर्व भारतातील बंडांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अकबरने हा किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला. त्याच्या रणनीतिक स्थानाव्यतिरिक्त, प्रयागच्या त्रिवेणी संगमाला भेट देणाऱ्या यात्रेकरूंकडून कर गोळा करता येईल, या विचारामुळेही हा निर्णय घेतला गेला असे मानले जाते. येथील स्थानिक प्रयागवाल ब्राह्मणांचे म्हणण्यानुसार हा किल्ला बांधताना त्याचा पाया अनेक वेळा ढासळत होता त्यावेळी त्याला सांगण्यात आले की, किल्ल्याची उभारणी करण्यासाठी मानव बळी आवश्यक आहे. तेव्हा एका स्थानिक ब्राह्मणाने स्वेच्छेने बलिदान दिले. त्या बदल्यात अकबरने त्याच्या वंशजांना प्रयागवाल ब्राह्मणांना संगमावर यात्रेकरूंची सेवा करण्याचा विशेष अधिकार दिला.(मुळ कथा वेगळीच असावी ती सांगणे टाळलेले योग्य). अकबराने त्याच्या कारकिर्दीत जे काही किल्ले बांधले त्यात इलाहाबाद किल्ला (आताचा प्रयागराज किल्ला) हा सर्वात मोठा किल्ला आहे. इतिहासकार विल्यम फिंच यांच्या मते या किल्ल्याच्या बांधकामासाठी ५,००० कामगारांनी तब्बल चाळीस वर्षे मेहनत घेतली. इ.स. १६०० मध्ये मुघल राजपुत्र सलीम याने अकबराविरुद्ध बंड केले आणि इलाहाबाद किल्ल्यात स्वतःचा दरबार स्थापन केला. पण हे बंड फार काळ टिकले नाही. इ.स. १७६५ मध्ये बक्सरच्या लढाईनंतर झालेल्या 'इलाहाबाद करार'नुसार, ईस्ट इंडिया कंपनीने या किल्ल्यात आपले सैन्य तैनात केले. हा करार ब्रिटिश भारताचे सेनापती रॉबर्ट क्लाईव्ह, मुघल सम्राट शाह आलम दुसरा, आणि अवधचा नवाब शुजाउद्दौला यांच्यात झाला होता. करारानुसार, इंग्रजांनी किल्ल्यातील सैन्य शाह आलमचे रक्षण करण्यासाठी ठेवायचे होते. पण शाह आलमला ही व्यवस्था आवडली नाही आणि तो १७७२ मध्ये दिल्लीला निसटून गेला. तिथे त्याने प्रयत्न केला की इलाहाबाद मराठा साम्राज्याला सुपूर्त करावा. मात्र इंग्रजांनी हस्तक्षेप केला आणि शाह आलमचा हक्क नाकारत किल्ल्याचा मालकी हक्क शुजाउद्दौलाला दिला. शुजाउद्दौलाच्या मृत्यूनंतर १७७५ मध्ये त्याचा मुलगा आसफउद्दौला अवधचा नवाब झाला. कंपनीने सतत प्रयत्न करूनही त्याने हा किल्ला त्यांच्या ताब्यात दिला गेला नाही. आसफउद्दौलाच्या मृत्यूवेळी (१७८७) त्याला कंपनीचे मोठे कर्ज होते शिवाय त्याला वारस देखील नव्हता. यानंतर सादत अलीखानने सत्ता हस्तगत केली पण आर्थिक अडचणींमुळे सादतअली खानने इ.स.१७९८ मध्ये हा किल्ला ईस्ट इंडिया कंपनीकडे सुपूर्त केला. तीन वर्षांनंतर इ.स. १८०१ मध्ये त्याने संपूर्ण इलाहाबाद जिल्हा ब्रिटीशांच्या ताब्यात दिला. यानंतर इलाहाबाद ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रदेशाचा एक भाग बनला आणि किल्ला येथील सैनिकी तळाचे मुख्य केंद्र बनवण्यात आला. १८५७ च्या बंडाच्या वेळी अलाहाबाद किल्ला काही काळ तुरुंग म्हणून वापरण्यात आला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय लष्कराने या किल्ल्यावर ताबा घेतला आणि आजही याचा बहुतांश भाग हत्यारांचा साठवणूक केंद्र (Ordnance Depot) म्हणून वापरात आहे. आता पर्यटकांना फक्त ठराविक भाग पाहण्याची परवानगी असुन उर्वरित भाग लष्करी नियंत्रणात आहे. मध्ययुगीन काळात हा किल्ला उत्तर भारतातील मुघल प्रशासनाचे एक महत्त्वाचे केंद्र होता. प्रयागराज किल्ला मुघल आणि स्थानिक स्थापत्यशैलींच्या मिश्रणाचा एक उत्तम नमुना आहे. साधारण १७३ एकरवर पसरलेल्या या किल्ल्याचे बांधकाम आणि कोरीव काम पाहण्यासारखे आहे. किल्ल्याला तीन मुख्य प्रवेशद्वार असुन ती अशा प्रकारे बांधण्यात आली आहेत की मनुष्य किंवा हत्ती सहजपणे या दरवाजात पोहोचू शकत नाही. प्रवेशद्वारांवर इस्लामी आणि हिंदू शैलीतील कोरीव नक्षीकाम दिसते. किल्ल्याच्या एका बाजूस यमुना नदीचे पात्र असुन चारही बाजूंनी उंच व बलदंड बुरुज आहेत. पूर्वी हा किल्ला मजबूत भिंती, दरवाजे, राजवाडे, मशिद, मंदिरे आणि बागांनी सजलेला होता. जहांगिराने येथे जनाना महाल आणि जोधाबाईचे स्मारक बांधले. औरंगजेबाने मंदिर आणि राजवाडा पाडून त्याच्या जागी मशीद व रंगमहाल उभारले. मराठ्यांनी काही जुन्या रचना दुरुस्त केल्या व मोती महाल व दिवान-ए-खास यांची भर घातली. सध्या किल्ल्याच्या आतील भागात असलेल्या महत्त्वाची अशा सहा वास्तु आपल्याला पहाता येतात.
१.जोधाबाईचा राजवाडा – किल्ल्याच्या आत स्थित हा राजवाडा हिंदू स्थापत्यशैलीचे उत्तम उदाहरण आहे. यातील छत्री, गोलघुमट, आणि रंगीत फरशी राजपूत व मुघल एकतेचे प्रतीक आहेत.
२.जनाना आणि मरीयम-उझ-झमानी महल – अकबराच्या इतर राण्यांसाठी बांधले गेलेले हे महाल पर्शियन व इस्लामी स्थापत्यशैलीचे नमुने आहेत.
३.अशोक स्तंभ – इ.स.पू. २३२ मध्ये उभारलेला ३५ फूट उंचीचा हा स्तंभ किल्ल्यातील मुख्य आकर्षण आहे. सम्राट अशोकाच्या काळातील धर्माज्ञा (edicts) या स्तंभावर कोरल्या आहेत. हा स्तंभ भारताच्या प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासाला जोडणारा एक महत्त्वाचा दुवा मानला जातो. सम्राट अशोकाने हा स्तंभ कोशंबी येथे उभारला होता तो नंतर इलाहाबादला हलवण्यात आला.
४.अक्षयवट – किल्ल्यातील सर्वात प्रसिद्ध स्थळे. अक्षयवट म्हणजेच "अविनाशी वडवृक्ष", जो इच्छापूर्ती करणारा मानला जातो.
५. सरस्वती कूप- सरस्वती कुंड हे पवित्र विहीर आहे. असे मानले जाते की या विहिरीचे पाणी सरस्वती नदीचे आहे जी गंगा आणि यमुनेच्या संगमाखाली प्रवाहित होते.
६.पाताळपुरी मंदिर – हे किल्ल्यातील प्राचीन भुमिगत मंदिर असुन किल्ल्यातील सर्वात जुनी व मुळ वास्तु मानली जाते. येथे विष्णूचा मूळ मूर्ती आहे, आणि इतर देवतांचीही स्थापना आहे. काही आख्यायिकांनुसार येथे महर्षी भारद्वाजांनी तपश्चर्या केली होती.
याशिवाय किल्ल्याच्या परिसरातच एक सुंदर वास्तुशैली असलेली जामा मशीद देखील आहे. किल्ल्यात अजूनही अकबराच्या महालाचे अवशेष पाहायला मिळतात, जे मुघल स्थापत्याचे उत्कृष्ट नमुने दर्शवतात. अकबरचा प्रयागराज किल्ल्याबाबतचा दृष्टीकोन भव्यतेवर आणि वैभवावर आधारित असल्याने शिवाय हा किल्ला त्याच्या साम्राज्याच्या अंतर्गत भागात असल्याने या किल्ल्यावर सुरक्षिततेवर जास्त भर दिल्याचा दिसून येत नाही. या किल्ल्याचा उद्देश मुघल साम्राज्याचे सामर्थ्य व वैभव इतर राज्यांना दाखवणे हाच होता. जर तुम्ही प्रयागराज संगमावर जात असाल तर वेळ काढून दोन तासात या किल्ल्याची भटकंती सहजपणे करता येईल.
© Suresh Nimbalkar