PENDRIPADA

TYPE : HILL FORT

DISTRICT : THANE

HEIGHT : 180 FEET

GRADE : EASY

मध्ययुगीन काळात कल्याण-भिवंडी हि मोठी बंदरे असुन खाडीमार्गाने वसई येथे थेट समुद्राशी जोडली होती. या भागावर बराच काळ पोर्तुगीजांची सत्ता असल्याने त्यांनी वसई ते भिवंडी- कल्याण या सागरी मार्गावरील उल्हास खाडी काठावर तर काही ठिकाणी लहानशा टेकडीवर लहान-लहान कोट बांधले. यातील बहुतांशी कोटांची मोठया प्रमाणात पडझड झालेली असुन फार थोडे अवशेषरुपात शिल्लक आहेत. वसई-भिवंडी महामार्गावर एका लहान टेकडीवर पोर्तुगीजांची निर्मिती असलेला असाच एक लहानसा कोट म्हणजे पेंद्रीपाडा कोट. वसई-भिवंडी महामार्गावर चिंचोटी येथुन १६ कि.मी.अंतरावर असणारा हा कोट वसई रेल्वे स्थानकापासुन २६ कि.मी.अंतरावर आहे. वसईहुन भिवंडीकडे जाणाऱ्या बसने पायगाव येथे उतरून पेंद्रीपाडा कोटास जाता येते. महामार्गावरील पायगाव येथुन पेंद्रीपाडा हि वस्ती ४ कि.मी.आत असुन सोबत खाजगी वाहन असल्यास ठीक अन्यथा हे अंतर पायी पार करावे लागते. पेंद्रीपाडा कोट साधारण १५० फुट उंच टेकडीवर बांधलेला असुन गावात प्रवेश करताना सहजपणे नजरेस पडतो. येथे चालू असलेल्या दगडांच्या खाणीमुळे या परिसरास बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. टेकडीवर जाण्यासाठी दोन वाटा असुन एक वाट वस्तीतुन तर दुसरी वाट वस्तीबाहेरून जाते. ... कोट समोरच दिसत असल्याने वाट चुकण्याची शक्यता नाही. पायथ्यापासून टेकडी चढुन १५ मिनीटात आपण कोटाजवळ पोहोचतो. पोर्तुगीजांनी बांधलेल्या टेहळणीच्या बहुतांशी वास्तु एकसमान व एक आकाराच्या दिसुन येतात. साधारण २०x २० फुट आकाराचा हा कोट दुमजली असुन याचा वरील भाग पुर्णपणे उध्वस्त झाला आहे. या कोटाच्या बांधकामात ओबडधोबड दगड व चुन्याचा वापर केलेला आहे. कोटाच्या भिंतीत वरील मजल्यासाठी वासा रोवण्यासाठी खोबण्या तसेच बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या दिसुन येतात. सद्यस्थितीत १५ फुट उंच असणाऱ्या या वास्तुची मूळ उंची याहुन जास्त असावी. या कोटाचे स्थान व आकारमान पाहता या कोटाचा वापर टेहळणीसाठी होत असावा. कोट पाहण्यास १० मिनिटे पुरेशी होतात. साधारणतः १६व्या शतकात पोर्तुगीजानी उभारलेल्या या टेहळणीवजा कोटांचा मुख्य उपयोग जलमार्गाचे रक्षण करणे व प्रांतातील लहान मोठया कोटाना आवश्यक रसद पुरविणे हा होता. हे सगळे लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. इ.स.१७३९च्या वसई मोहिमे दरम्यान हा परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला आणि पोर्तुगीजाचे या भागातून बस्तान उठले ते कायमचेच. सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांची टेहळणी चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या स्थानास भेट द्यायलाच हवी.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!