PALASDURG

TYPE : HILL FORT

DISTRICT : THANE

HEIGHT : 2450 FEET

GRADE : MEDIUM

मुंबई-ठाण्यापासून जवळ असलेल्या शहापुर तालुक्यात एक दिवसाच्या भटकंतीसाठी माहुली किल्ला हे प्रसिद्ध ठिकाण आहे. प्रसिद्ध या अर्थाने कि येथे सतत हौशी पर्यटकांची मौजमजा (?) करण्यासाठी वर्दळ सुरु असते. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये येणारा हा किल्ला म्हणजे एक दुर्गत्रिकुट असुन माहुली, भंडारगड, आणि पळसगड असे तीन किल्ले मिळून हे दुर्गत्रिकुट झाले आहे. हे तीन किल्ले त्यातील खिंडीमुळे एकमेकापासुन वेगळे झाले असुन मध्यभागी माहुली उत्तरेस पळसगड तर दक्षिणेस भंडारगड अशी याची रचना आहे. या सर्व किल्ल्यांना स्वतंत्र दरवाजे असुन वर जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. यातील मधला माहुली किल्ला आकाराने सर्वात मोठा असुन त्यावरून भंडारगड तसेच पळसगडावर जाण्यासाठी मार्ग आहे. वेळेचे व्यवस्थित नियोजन केल्यास आदल्या दिवशी गडाच्या पायथ्याशी मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर सुरवात केल्यास एका दिवसात तीनही किल्ले व्यवस्थित पाहुन संध्याकाळी पायथ्याशी परतता येते. ... माहुली, भंडारगड, आणि पळसगड हे तीनही स्वतंत्र किल्ले असल्याने त्यांचे एकत्र वर्णन न देता या तीनही किल्ल्यांचे वेगवेगळे वर्णन केलेले आहे. गडावर येणारे बहुतांशी दुर्गप्रेमी माहुली किल्ल्याचा महादरवाजा व त्याच्या आसपासच्या परिसराला भेट देतात व तेथुन मागे फिरतात. यातील फारच कमी दुर्गप्रेमी भंडारगडावर जातात पण पळसगडाकडे मात्र कोणाची पावले फिरकत नाही. आजच्या या लेखात आपण अपरीचीत अशा पळसगडाला भेट देणार आहोत. मुंबई -ठाण्यावरून पळसगडला भेट देण्यासाठी आपल्याला ठाणे-नाशीक महामार्गावरील आसनगाव येथुन किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले माहुली गाव गाठावे लागते. मुंबईहुन हे अंतर ७७ कि.मी तर ठाण्याहून हे अंतर ५५ कि.मी.आहे. पर्यटकांना येथे रहाण्यासाठी पर्यटक निवास बांधलेला असुन गावातील गणपती मंदीर व शंकराचे मंदीर यात देखील राहण्याची सोय होते. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वाडीत एकुण तीन जुनी मंदीरे असुन यातील एक मंदीर गणपतीचे दुसरे शंकराचे तर तिसरे ग्रामदेवतेचे आहे. या मंदिराच्या आवारात काही कोरीव शिल्प विखुरलेली आहेत. याशिवाय गावात एक मध्ययुगीन काळातील तलाव पहायला मिळतो. शिवमंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यावर मंदिराच्या मागील बाजुने उजवीकडे एक रस्ता जातो. या रस्त्यावर काही मिनिटाच्या अंतरावर गणेश मंदिर असून मंदीरासमोर असलेल्या हातपंपावर पिण्याच्या पाण्याची सोय होते. गणेश मंदीराच्या आवारात एक दगडी घुमट व अर्धवट तुटलेली विरगळ पहायला मिळते. या पायवाटेने नव्याने बांधलेली कमान पार करत आपण वनखात्याने नव्याने बांधलेल्या पर्यटन केंद्रात पोहोचतो. किल्ल्यावर जाण्यासाठी येथे प्रती व्यक्ती २० रुपये प्रवेश शुल्क भरावे लागते. किल्ल्यावर जाणारी वाट या पर्यटन केंद्राच्या आतूनच जाते. किल्ल्यावर पर्यटकांची सतत वर्दळ असल्याने वाट मळलेली असली तरी तुरळक जंगलातुन जाणाऱ्या या वाटेवर बऱ्यापैकी चढण आहे. पर्यटन केंद्रासमोर असलेली टेकडी व ओढा पार केल्यावर आपण एका लहानशा सपाटीवर पोहोचतो. या ठिकाणी काही वास्तुंचे अवशेष पहायला मिळतात. पेशवाई काळात माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी सरदारांची कचेरी व वाडे असल्याचे उल्लेख येतात हे बहुदा त्यांचेच अवशेष असावेत. या वाटेने वाटेत २-३ ठिकाणी सोपे प्रस्तरारोहण करत साधारण दोन तासात आपण आपण माहुलीच्या कड्याखाली येतो. कडयाच्या या भागात असलेली किल्ल्याची तटबंदी आजही शिल्लक असुन हा कडा व तटबंदी चढून जाण्यासाठी सुमारे १५-२० फुट उंचीची लोखंडी शिडी बसवली आहे. हि शिडी चढून तटबंदी पार केल्यावर आपला माहुली किल्ल्यात प्रवेश होतो. गडावर जाण्यासाठी महादरवाजा, हनुमान दरवाजा, कल्याण दरवाजा, वांद्रे खिंड, पळसगड व माहुली यामधील खिंड असे वेगवेगळे मार्ग आहेत. माहुली गावातुन आपण आलो ती शिडीची वाट हि जरी किल्ल्यावर येणारी अधीकृत वाट नसली तरी सध्या किल्ल्यावर येण्यासाठी हाच सोपा व रुळलेला मार्ग आहे. येथे पळसगड हे आपले उद्दीष्ट असल्याने माहुलीगडाचे वर्णन न देता केवळ वाटेत दिसणाऱ्या वास्तुंचे थोडक्यात वर्णन केले आहे. तटबंदी पार केल्यावर सरळ जाणारी वाट आपल्याला सर्वप्रथम माहुली गडाच्या महादरवाजाकडे व तेथुन पळसगडावर नेते. या वाटेने जाताना सर्वप्रथम खडकात खोदलेले एक पाण्याचे टाके पहायला मिळते. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. या वाटेने ५ मिनिटे चालत पुढे आल्यावर या वाटेला उजवीकडे एक फाटा फुटतो. येथुन सरळ जाणारी वाट माहुली गडावरील नमाजगीर नावाने ओळखल्या जाणाऱ्या इदगाहकडे जाते तर उजवीकडील वाट माहुली गडाच्या महादरवाजाकडे जाते. माहुली गडाचा महादरवाजा एका घळीच्या तोंडाशी कातळात कोरलेला असुन त्याला दोन्ही बाजुंनी बुरुजाचे सरंक्षण देण्यात आले आहे. येथे असलेल्या पहारेकऱ्याच्या देवड्या देखील कातळात कोरल्या आहेत. गडाखालील माची गावातुन या दरवाजात येणारा मार्ग काळाच्या ओघात पुर्णपणे नष्ट झाला आहे. दरवाजा समोरील भागात पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. पळसगडावर पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने येथूनच पाणी भरून घ्यावे.महादरवाजाच्या उजव्या बाजुने उत्तरेच्या दिशेने पळसगडाकडे जाणारी वाट आहे. या वाटेवर मोठया प्रमाणात कारवीची झाडे वाढलेली आहेत. या वाटेने १० मिनिटे चालल्यावर वाटेच्या उजव्या बाजुस उंचवट्यावर एका वास्तुचे जोते पहायला मिळते. हि वास्तु म्हणजे किल्लेदाराचा वाडा असल्याचे सांगीतले जाते. येथुन पुढे आल्यावर वाटेला उजवीकडे जाणारा फाटा फुटतो. येथुन सरळ जाणारी वाट माहुली गडाच्या उत्तर टोकावर जाते तर उजवीकडे उतरत जाणारी वाट पळसगडावर जाते. उजवीकडील वाटेने माहुलीगडाची तटबंदी पार करत आपण माहुलीगड व पळसगड यामधील दरीत उतरत जातो. माहुली गडाचा या तटबंदीत असलेला दरवाजा आज पुर्णपणे ढासळला असुन त्याचा केवळ तळातील चौथरा शिल्लक आहे. पळसगडाच्या पश्चिमेला असलेल्या खोर येथुन येणारी वाट दरीमध्ये उतरताना या वाटेला येऊन मिळते. या वाटेवर चुकण्याची शक्यता असल्याने थोडी सावधता बाळगावी अन्यथा आपण पळसगडाकडे न जाता या वाटेने खोर गावाच्या दिशेने किल्ला उतरण्यास सुरवात करतो. पळसगडाच्या चारही बाजुस नैसर्गीक कडे असल्याने उत्तर बाजुची तुरळक तटबंदी वगळता इतर कोठेही तटबंदी दिसुन येत नाही. दरीतील बांबुच्या दाट जंगलातुन जाणारी वाट पार करून आपण पळसगडाच्या चढावर येतो. या ठिकाणी असलेली गडाची तटबंदी व दरवाजा पुर्णपणे नष्ट झाला आहे. पळसगडचा माथा म्हणजे माहुली गडापासुन सुटावलेली तीन अरुंद पठारे आहेत. गडाची समुद्रसपाटीपासून उंची २४१० फुट असुन गडाचा माथा पुर्वपश्चिम ९ एकरवर पसरलेला आहे. पळसगडावर मोठयाप्रमाणात कारवीचे जंगल वाढले असुन बहुतांशी अवशेष त्यात लपले आहेत. गडावर काही ठिकाणी उध्वस्त घरांचे अवशेष दिसतात पण कोणत्याही मोठया वास्तुचे अवशेष ठळकपणे दिसुन येत नाही. गडावर एका ठिकाणी खडकात खोदलेल्या पायऱ्या पहायला मिळतात पण पाण्याची सोय मात्र कोठेही दिसुन येत नाही. गडावरून उत्तरेला अलंग, मदन, कुलंग व कळसूबाई पर्वतरांग तसेच मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारा तानसा तलाव, तुंगारेश्वर आणि गुमतारा किल्ला दिसतो तर पूर्वेला हरिश्चंद्रगड, आजोबा व दक्षिणेला माथेरान रांग आणि इतर प्रदेश नजरेस पडतो. संपुर्ण किल्ला फिरण्यास दीड तास पुरेसे होतात. पळसगडाची रचना व आकार पहाता याचा उपयोग प्रामुख्याने टेहळणीसाठी व माहुलीचा सरंक्षक दुर्ग म्हणुन केला जात असावा. हा किल्ला कोणी बांधला हे माहित नसले तरी बहामनी राज्याच्या अस्तानंतर १४८५ च्या सुमारास हे ठिकाण निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमदच्या ताब्यात आले. मध्ययुगीन कालखंडात कल्याण सुभ्याजवळ असलेला हा किल्ला नाशिक, सुरत,जुन्नर व अहमदनगर अशा महत्वाच्या ठिकाणाशी जोडलेला होता. माहुलीवरून जव्हार मार्गे सुरत व मुरबाडमार्गे नाणेघाट ओलांडून जुन्नर तसेच अहमदनगरला जाणारा मार्ग अशा भौगोलिक रचनेमुळे माहुलीला महत्व प्राप्त झाले होते. पळसगडचा इतिहास हा माहुलीगडाशी संबंधीत आहे. मुघल व आदिलशाही यांच्या एकत्रीत सेना निजामशाही बुडवण्यासाठी आल्या असता १६३५-३६ च्या सुमारास शहाजीराजे यांनी निजामशाही वाचवण्यासाठी बळकट अशा माहुली किल्ल्याचा आश्रय घेतला. खानजमान याने माहुलीला वेढा दिला. शहाजीराजांनी पोर्तुगीजांकडे मदत मागितली पण त्यांनी नकार दिला व शहाजीं राजानी शरणागती पत्करली. पुढे ८ जानेवारी १६५८ रोजी शिवाजीराजांनी हा किल्ला मोगलांकडून मिळवला. १६६५ च्या पुरंदर तहात मोगलांना २३ किल्ले देताना शिवाजी महाराजांनी चातुर्याने हे एकत्रित असलेले दुर्गत्रिकुट तीन किल्ले म्हणून मोगलांना दिले. त्यानंतर मनोहरदास गौड हा मोगलांचा कर्तबदार सरदार माहुलीवर किल्लेदार म्हणुन कारभार पाहू लागला. त्याने गडावर बरीच बांधकाम केली. इ.स.१६७०च्या फेब्रुवारी महिन्यात हा किल्ला जिंकण्यासाठी खुद्द शिवाजीराजांनी माहुलीवर केलेल्या हल्ल्यात किल्लेदार मनोहरदास गौड याच्या सावधानतेने दीड हजार मावळ्यांपैकी तब्बल हजार मावळे मोगलांनी कापून काढले व मराठ्यांना पराभव पत्करावा लागला. पण मनोहरदास गौड याने मराठयांच्या दहशतीने माहुलीची किल्लेदारी सोडली व त्याच्या जागी अलावर्दी बेग हा नवा किल्लेदार आला. त्यांनतर १६ जून १६७० रोजी मोरोपंत पिंगळे यांनी दोन महिन्यांच्या वेढ्यानंतर माहुली, पळसगड व भंडारगड हे त्रिकूट स्वराज्यात सामील करून घेतले. संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर व्दारकोजी या किल्लेदाराने फितुरीने किल्ला मोगलांच्या ताब्यात दिला व त्यांची चाकरी पत्करली. गडावर हल्ला चढवून गड घेणे अवघड असल्याने भेदनीतीचा वापर करत मराठ्यांनी इ.स.१७३५ मध्ये गड ताब्यात घेतला. पुढे दुसऱ्या बाजीरावाने जून १८५७ मध्ये इंग्रजांशी झालेल्या तहानुसार माहुली किल्ला त्यांच्या हवाली केला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!