NAVZE KOT

TYPE : FORTRESS

DISTRICT : PALGHAR

HEIGHT : 0

GRADE : EASY

उत्तर कोकणात बराच काळ पोर्तुगीजांची सत्ता असल्याने वसई ते दमण या समुद्री पट्ट्यात त्यांनी बांधलेले अनेक लहान मोठे गढीवजा कोट पहायला मिळतात.यातील बहुतांशी कोटांची मोठया प्रमाणात पडझड झालेली असुन फारच थोडे अवशेष शिल्लक आहेत. सफाळेजवळ पोर्तुगीजांची निर्मिती असलेला नावजे कोट हा असाच एक लहानसा अपरिचित कोट. नावजे कोटास भेट देण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनने सफाळे स्थानकास उतरावे. नावजे कोट सफाळे रेल्वे स्थानकापासून १५ कि.मी.तर मुंबई-अहमदाबाद मार्गावर वारई फाट्यापासून ६ कि.मी.वर आहे. वराई फाटा तसेच सफाळे स्थानक येथुन नावजे गावास जाण्यासाठी खाजगी तसेच शेअर रिक्षा उपलब्ध आहेत. सफाळेहुन जाताना पहिले तांदुळवाडी फाटा नंतर पारगाव फाटा नंतर नावजे गावाचा फाटा लागतो. या फाट्यापासून नावजे गाव साधारण १.५ कि.मी.आत आहे. गावात आल्यावर कोटाकडे जाण्यासाठी जुनी ग्रामपंचायत अशी विचारणा करावी. या ग्रामपंचायतीच्या मागील बाजुस झाडाझुडुपांनी वेढलेले नावजे कोटाचे अवशेष नजरेस पडतात. ... ३० x ३० फुट आकाराची हि दुमजली इमारत वगळता कोटाचे इतर कोणतेही अवशेष दिसुन येत नाहींत. या इमारतीच्या बांधकामात ओबडधोबड दगडांचा व चुन्याचा वापर केलेला आहे. इमारतीच्या केवळ दोन भिंती शिल्लक असुन त्यात वरील मजल्यासाठी वासा रोवण्यासाठी असलेल्या खोबण्या दिसुन येतात. कोटाची सध्याची उंची १५ फुट असुन त्याची मूळ उंची २५ फुटापर्यंत असावी असे कोटाच्या भिंतीवर लाकडी वाशाकरिता असलेल्या खोबण्या वरून लक्षात येते.इमारतीच्या बांधकामात कोणतीही संरक्षण व्यवस्था नसल्याने येथे कोट असावा असे ठाम विधान करता येत नाही. नावजे गाव वैतरणा नदीकाठी असले तरी हि वास्तु नदीकाठ पासुन बरीच आत आहे. एकंदरीत वास्तुचे स्थान व आकार पहाता हि वास्तु म्हणजे प्रशासकीय ठिकाण असावे. कोटाची सध्याची अवस्था फारच दयनीय असुन कोट पाहण्यास १० मिनिटे पुरेशी होतात. या कोटाविषयी कोणतीही ऐतिहासिक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने त्याला स्थानिक गावच्या नावाने नावजे माडी म्हणुन ओळखले जाते. साधारणतः १६व्या शतकात पोर्तुगीजानी उभारलेल्या या टेहळणीवजा कोटांचा मुख्य उपयोग जलमार्गाचे रक्षण करणे व प्रांतातील लहान मोठया कोटाना आवश्यक रसद पुरविणे हा होता. हे सगळे लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. १७३९ च्या वसई मोहिमे दरम्यान हा भाग मराठ्यांच्या ताब्यात आला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!