KARIVALI KOT

TYPE : COASTAL FORT

DISTRICT : THANE

HEIGHT : 0

GRADE : EASY

उत्तर कोकणात बराच काळ पोर्तुगीजांची सत्ता असल्याने वसई ते कल्याण या सागरी मार्गावर असलेल्या उल्हास खाडीच्या काठावर त्यांनी बांधलेले अनेक लहान-लहान कोट पहायला मिळतात. यातील बहुतांशी कोटांची मोठया प्रमाणात पडझड झालेली असुन फार थोडे अवशेषरुपात शिल्लक आहेत. मध्ययुगीन काळात भिवंडी हे मोठे बंदर असुन सागरी मार्गाने थेट समुद्राशी जोडले होते. उल्हास नदीची उपनदी असलेली कामवारी नदीतुन जहाजांची वाहतुक थेट वसईपर्यंत होत असे. या सागरी मार्गाच्या रक्षणाकरता पोर्तुगीजांनी अनेक लहान लहान कोट उभारले. भिवंडी-वसई दरम्यान कारीवली जवळ पोर्तुगीजांची निर्मिती असलेला कारीवली कोट हा असाच एक लहानसा कोट. कारिवली गावाबाहेर असलेल्या जंगलात आज हा कोट पुर्णपणे हरवला आहे. त्याची ओळख करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न. भिवंडी ते कारीवली हे अंतर ५ कि.मी.असुन खाजगी रिक्षाने कारीवली गावात जाता येते. कारीवली गावात प्रवेश केल्यावर चौकात असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडून उजव्या बाजूने १०० फुट पुढे आल्यावर सिमेंटचा एक रस्ता डावीकडे जाताना दिसतो. ... हा रस्ता जेथे संपतो तेथे एक पायवाट सुरु होते. हि पायवाट खाडीजवळ असलेल्या गावदेवी मंदीराकडे जाते. या पायवाटेने साधारण ४००-५०० फुट पुढे आल्यावर डावीकडील झाडीत कारीवली कोटाचे अवशेष विखुरलेले आहेत. ते सहजपणे नजरेस पडत नसल्याने थोडीशी शोधशोध करावी लागते. स्थानिकांना देखील या कोटाची फारशी माहीती नाही पण विचारताना माडी म्हणुन चौकशी करावी किंवा आता हे स्थान गुगल नकाशावर दाखवले आहे त्याची मदत घ्यावी. संपुर्ण कोटाची आज पडझड झालेली असुन केवळ चौथरा शिल्लक असल्याने हे ठिकाण कचेरी कि कोट हे ठामपणे सांगता येत नाही. चौथऱ्याचा आकार ३०x३० फुट असुन त्यावर झाडे वाढलेली आहेत. या कोटाच्या बांधकामात ओबडधोबड दगड व चुना याचा वापर केलेला आहे. या चौथऱ्याच्या आसपास बांधकामाचे दगड विखुरलेले असुन त्यात किर्तीमुख कोरलेले दोन दगड आहेत. कोटापासून काही अंतरावर एक जुनी विहीर असुन तिचे पाणी या कोटासाठी वापरले जात असावे. कोट पाहण्यास १० मिनिटे पुरेशी होतात. पोर्तुगीज हि दर्यावर्दी जमात. पोर्तुगालशी जलमार्गाने थेट संबंध ठेवता यावा यासाठी त्यांनी बहुतांशी कोट समुद्रकिनाऱ्यावरच बांधले. वसई ते कल्याण दरम्यान असलेले उल्हास खाडीवरील हे कोट समुद्राशी समांतर रेषेत बांधलेले आहेत. कोटाच्या जवळच उल्हास खाडीचे पात्र असुन खाडीच्या दुसऱ्या बाजूस असलेले डोंबिवली शहर नजरेस पडते. साधारणतः १६व्या शतकात पोर्तुगीजानी उभारलेल्या या टेहळणीवजा कोटांचा मुख्य उपयोग जलमार्गाचे रक्षण करणे हा होता. हे सगळे लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. शिवाजी महाराजांनी भिवंडी शहर ताब्यात घेतल्यावर पोर्तुगीजांचा या भागातील वावर संपल्याने नंतरच्या काळात हे ठिकाण ओस पडले असावे. किल्ला पाहण्याच्या हेतुने येणाऱ्याचा येथे हिरमोड होण्याची शक्यता आहे पण ज्याला प्राचीन सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांची टेहळणी चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या स्थानास अवश्य भेट द्यावी.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!