KALA KILLA

TYPE : COASTAL FORT

DISTRICT : MUMBAI

HEIGHT : 0

GRADE : EASY

पोर्तुगीजांकडून आंदण मिळालेले मुंबई बेट ब्रिटीशांच्या ताब्यात आल्यावर त्यांनी मुंबईचे रक्षण करण्यासाठी मोक्याच्या जागी किल्ले बांधले. त्यापैकी मिठी नदीवर धारावी येथे बांधलेल्या किल्याचे बांधकाम काळ्या दगडात झाल्याने स्थानिक लोक या किल्ल्याला काळा किल्ला म्हणून ओळखतात. धारावी परिसरात असल्यामुळे हा किल्ला धारावीचा किल्ला म्हणुनही ओळखला जातो. काळा किल्ला मध्य रेल्वेच्या सायन स्टेशनच्या पश्चिमेस आहे. सायन स्टेशनच्या पश्चिमेस सायन-बांद्रा लिंक रोडवर ओ.एन.जी. सी. बिल्डींगच्या अलिकडे उजव्या हातास काळा किल्ला गल्लीच्या टोकावर हा किल्ला आहे. किल्ल्याच्या चारही बाजुस धारावी झोपडपट्टीचा विळखा पडलेला आहे. त्रिकोणी आकाराच्या या किल्ल्याच्या दोन बाजुस बाणाच्या फाळाच्या आकाराचे दोन त्रिकोणी बुरुज आहेत. गल्लीच्या टोकाशी आल्यावर आपल्याला दिसते ती किल्ल्याची तटबंदी व त्यावरील दगडात कोरलेला शिलालेख. ... या शिलालेखावर Built By Order of the Honorable Horn Esq. President and Governor of Bombay in 1737 म्हणजेच सदर किल्ला मुंबईचे अध्यक्ष व गव्हर्नर माननीय हॉर्न यांनी सन १७३७ मध्ये बांधला असा मजकूर कोरण्यात आला आहे. त्याखाली इंजिनीयर या शब्दाजवळ स्वाक्षरी कोरलेली आढळते. किल्ल्यात जाण्यासाठी दरवाजा नसुन पुर्वी किल्ल्यात ये-जा करण्यासाठी शिडीचा वापर केला जात असे. आपल्याला आता मात्र ८ फुट भिंत चढून जावी लागते. किल्ल्याचा आतील भाग पुर्णपणे कचऱ्याने भरलेला आहे. तटबंदीस अतिरिक्त संरक्षण देण्यासाठी तटबंदीच्या आतील बाजुस ओटे बांधण्यात आले आहेत. किल्ल्याच्या मध्यभागी एक छोटासा हौद असुन या टाक्यात पाणी साठवण्याची सोय केली असावी. याच टाक्याच्या आत वरील बाजुस एक छोटासा भुयारी दरवाजा दिसून येतो. या वाटेने रांगत आत शिरल्यावर हि वाट आपल्याला एका लहान खोलीत घेऊन जाते. हे बहुदा दारुगोळा साठवण्याचे कोठार असावे. भुयाराच्या या खोलीत आत हवा येण्यासाठी भिंतीत एक छोटीसी खिडकीवजा रचना दिसून येते. किल्यावर एक भुयार असुन ते भुयार सायनच्या किल्यापर्यंत जात असल्याची वदंता असणारे ठिकाण ते हेच आहे. इंग्रजांनी काळा किल्याचा वापर बहुधा दारुगोळा साठवण्यासाठी केला होता. किल्ल्याची तटबंदी व तोफांच्या जंग्या आजही सुस्थितीत आहेत. किल्ल्याच्या वरील तटाला लागुन बाहेरील बाजुस एक शौचकुप दिसून येते. काळा किल्ला मिठी नदीकाठी बांधला असला तरी आता मात्र या नदीपात्रात भराव पडल्याने मिठी नदी किल्ल्यापासुन दुरावली आहे. शिवकाळात ब्रिटीशांच्या ताब्यात मिठी नदीच्या दक्षिण तीरावरील माहीम ते सायन हा प्रदेश होता तर मिठीच्या उत्तर तीरावरील साष्टी परगणा म्हणजे वांद्र्यापासून पुढे वसई, दिव, दमण पोर्तुगिजांच्या ताब्यात होते. इ.स. १७३७ मधील वसई मोहिमेत पोर्तुगीजांच्या ताब्यातील माहीम खाडीच्या उत्तरेकडील साष्टी प्रांत मराठ्यांच्या ताब्यात आला व मराठयांच्या सीमा मुंबईला भिडल्या. मराठ्यांच्या आरमारी ताकदीची दहशत ब्रिटीशांना बसली. सावधगिरीचा उपाय म्हणून मुंबईचे गव्हर्नर गेराल्ड ऑन्जीअर याने इ.स १७३७ साली माहीम व सायन यांच्या मध्यावर मिठी नदीकाठी काळ्या किल्ल्याची बांधणी केली. माहीम किल्ला, काळा किल्ला, रिवा किल्ला, सायन किल्ला या एका रांगेतील चार किल्ल्यांमुळे मुंबई बेटाची उत्तर बाजू संरक्षणाच्या दृष्टीने मजबूत झाली होती. एका अर्थाने काळा किल्ला म्हणजे मराठ्यांच्या ताकदीचा ब्रिटीशांनी घेतलेल्या धसक्याचे प्रतिक आहे व ते जतन व्हायला हवे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!