JAGANNATH PURI
TYPE : HERITAGE VISHNUMANDIR
DISTRICT : ODISHA (PURI)
आयुष्यात चार धाम यात्रा करणे हे हिंदु धर्मात अतिशय पवित्र कर्म समजले जाते. या चार धामची यात्रा केल्याने मोक्ष प्राप्त करण्यास मदत होते असे मानले जाते. हे चार धाम भारताच्या चार कोपऱ्यांवर स्थित आहेत आणि त्यांची मंदिरे म्हणजे उत्तरेकडे बद्रीनाथ , पूर्वेकडे पुरी येथील जगन्नाथ, पश्चिमेकडे द्वारकेतील द्वारकानाथ तर दक्षिणेकडे रामेश्वरम येथील रामनाथ मंदिर आहेत. या चार धाम पैकी एक असलेल्या पुरीच्या जगन्नाथाची आज आपण यात्रा करणार आहोत. जगन्नाथ पुरी मंदिर हे ओडिशा राज्यातील पुरी शहरात आहे. ओडीसाची राजधानी असलेल्या भुवनेश्वर शहरात जाऊन या मंदीराला सहजरीत्या भेट देता येते. भगवान जगन्नाथ हे मंदिर विष्णूला समर्पित आहे. जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या रथयात्रेचे आयोजन हे जगन्नाथपुरीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मंदिर संकुल साधारण १० एकरवर पसरलेले असुन हा संपुर्ण परिसर तटबंदीने बंदिस्त केलेला आहे. २० फूट उंचीच्या या भिंतीला मेघनाद पचेरी असे म्हणतात. कूर्म बेध म्हणून ओळखली जाणारी आणखी एक भिंत मुख्य मंदिराभोवती आहे.
...
कलिंग वास्तुकलेतील शिल्पकलेची समृद्धता यामुळे जगन्नाथ मंदीर भारतातील सर्वात भव्य मंदिरांपैकी एक आहे. जगन्नाथ मंदिरात चार विशिष्ट विभागीय रचना असुन त्यात गर्भगृह, मुखमंडप, रंगमंडप, आणि भोगमंडप यांचा समावेश होतो. गर्भगृहात कडुलिंबाच्या लाकडापासून कोरलेल्या भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या मुख्य मुर्ती असुन त्यांना रत्नजडित व्यासपीठावर किंवा रत्नवेदीवर पूजले जाते. मंदिरातील इतर मूर्तींची नावे विश्वधात्री, मदन मोहन आणि श्रीदेवी अशी आहेत. सर्व देवतांना ऋतूनुसार वेगवेगळे कपडे आणि रत्नांनी सजवले जाते. या देवतांची पूजा मंदिराच्या बांधकामापूर्वीची आहे आणि कदाचित ती एखाद्या प्राचीन आदिवासी मंदिरात उगम पावली असावी. मुख्य मंदिर हे वक्ररेषीय मंदिर असुन त्याच्या वरील बाजुस अष्टधातुपासून बनलेले विष्णुचे नीलचक्र आहे. ओडिशातील विद्यमान मंदिरांपैकी, भगवान जगन्नाथाचे मंदिर सर्वात उंच आहे. मंदिराचा कळस दगडाच्या उंच व्यासपीठावर बांधला गेला असुन तो गर्भगृहापासून साधारण २१४ फूट उंचीवर आहे. नीलचक्र हे जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर बसवलेले चक्र आहे. प्रथेनुसार नीलचक्रावर दररोज वेगळा ध्वज फडकवला जातो. नीलचक्रावर फडकवलेल्या ध्वजाला पतित पावन म्हणतात आणि तो गर्भगृहात ठेवलेल्या देवतांच्या प्रतिमेच्या समतुल्य आहे. नीलचक्राच्या बाहेरील परिघावर आठ नवगुंजर असुन ते सर्व वरील ध्वजस्तंभाकडे तोंड करून आहेत. ते अष्टधातुपासून बनलेले असुन ११ फूट उंच व घेरा साधारण ३६ फुट आहे. मंदिराच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला जय-विजय हे दोन रक्षकांचे पुतळे कोरलेले आहेत. जगन्नाथ मंदिराला एकुण चार दरवाजे आहेत आणि हे सर्व दरवाजे धर्म, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानले जातात. मुख्य प्रवेशद्वाराला सिंहद्वार म्हणतात. यात प्रत्येक बाजूला सिंहांच्या दोन विशाल मूर्ती आहेत आणि ते मुख्य प्रवेश बिंदू आहे ज्याद्वारे भक्त पुरीच्या श्री जगन्नाथाचा आशीर्वाद घेण्यासाठी मंदिराच्या आवारात प्रवेश करतात. या दरवाज्यातून मंदिरात प्रवेश केला तर मोक्ष प्राप्ती होते अशी श्रद्धा आहे. पश्चिमेकडील व्याघ्रद्वार : जगन्नाथ मंदिराच्या या प्रवेशद्वारावर वाघाची प्रतिमा आहे. नेहमी धर्माचं पालन करावं ही शिकवणं हे दार देतं. वाघ हे इच्छेचंही प्रतीक मानलं जातं. विशेष भक्त आणि संत या दरवाज्यातून मंदिरात प्रवेश करतात.
उत्तरेकडील हस्तीद्वार : या दरवाजाच्या दोन्ही बाजूला हत्तीच्या प्रतिमा आहेत. हत्ती हे लक्ष्मी मातेचं वाहन मानलं जातं. मुघलांनी या मंदिरावर आक्रमण केलं त्यावेळी हत्तीच्या या मूर्तींची तोडफोड केली असं सांगितलं जातं. त्यानंतर या मूर्तींची दुरुस्ती केली गेली. हा दरवाजा ऋषींच्या प्रवेशासाठी आहे.
दक्षिणेकडील अश्वद्वार : या दरवाजांच्या दोन्ही बाजूला घोड्यांच्या मूर्ती आहेत. विशेष म्हणजे या घोड्यांच्या पाठीवर भगवान जगन्नाथ आणि बालभद्र यांच्या युद्ध मोहिमेसाठी सज्ज आहेत. हा दरवाजा विजयाचं प्रतीक मानला जातो.
पुरीच्या जगन्नाथ धाम मंदिरात २२ पायऱ्या आहेत. या सर्व पायऱ्या मानवी आयुष्यातील उणीवांचं प्रतीक आहेत. धार्मिक मान्यतेनुसार या पायऱ्या अत्यंत गूढ आहेत. या पायऱ्यांवर जाणाऱ्या भक्तांना तिसऱ्या पायरीचा विशेष खबरदारी घ्यावी लागते. पौराणिक कथेनुसार या तिसऱ्या पायरीवर पाव ठेवू नये. ही पायरी यम शिला समजली जाते. यावर पाय ठेवले तर मनुष्याचे सर्व पुण्य धुतले जातात आणि त्याला वैकूंठात नाही तर यमलोकात जावं लागतं, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे भगवान जगन्नाथच्या दर्शनाला जाताना तिसऱ्या पायरीवर पाय न ठेवण्याचा सल्ला दिला जातो. भगवान जगन्नाथचं दर्शन करण्यासाठी या सर्व पायऱ्या पार कराव्या लागतात. अरुण स्तंभ म्हणून ओळखला जाणारा एक भव्य सोळा बाजूंचा अखंड स्तंभ मुख्य प्रवेशद्वारासमोर उभा आहे. या स्तंभाच्या वर सूर्यदेवाचा सारथी अरुणाची मूर्ती आहे . अरुण स्तंभाबद्दल एक उल्लेखनीय गोष्ट अशी आहे की त्याच्या सध्याच्या स्थानापूर्वी तो कोणार्क येथील सूर्य मंदिरात होता. नंतर मराठा काळात ब्रह्मचारी गोसावीस्वामी यांनी हा स्तंभ कोणार्कहून येथे आणला व त्याची स्थापना केली. मंदिर संकुलात सुमारे तीस लहान मंदिरे आहेत जिथे नियमितपणे सक्रिय पूजा केली जाते. जगन्नाथाच्या मुख्य मंदिरापूर्वी काही मंदिरे महत्त्वाची मानली जातात आणि सामान्यतः दर्शनासाठी येतात कल्पवत वटवृक्षाजवळील गणेश मंदिर , विमला मंदिर , नीलमधाबा मंदिर, गोपालबल्लव मंदिर आणि लक्ष्मी मंदिर. विमला मंदिर हे शक्तीपीठांपैकी एक महत्त्वाचे मानले जाते. हे मंदिर संकुलातील रोहिणी कुंडाजवळ आहे. जोपर्यंत जगन्नाथाला अर्पण केलेले अन्न देवी विमलाला अर्पण केले जात नाही तोपर्यंत तो महाप्रसाद मानला जात नाही. जगन्नाथाची पत्नी लक्ष्मीचे मंदिर मुख्य मंदिराच्या विधींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. गणेश,शिव,सूर्य,सरस्वती,भुवनेश्वरी,नरसिंह,राम, हनुमान यांना समर्पित इतर मंदिरे आहेत. मंदिर दररोज सकाळी ५ ते रात्री १०.३० पर्यंत खुले असते. नबकलाबेरा हा जगन्नाथाशी संबंधित एक विधी आहे जो दर ८,१२, किंवा १९ वर्षांनी होतो, नबकलाबेरा म्हणजे "नवीन शरीर". या विधीमध्ये जगन्नाथ मंदिरात नवीन प्रतिमांची स्थापना आणि कोइली वैकुंठ येथील मंदिरात जुन्या प्रतिमांचे दफन करणे समाविष्ट आहे. या तिन्ही मूर्ती विशेष प्रकारच्या लाकडापासून बनवल्या जातात. पुरीचे विद्यमान गजपती राजा आणि राजा दिब्यसिंह देबा हे मंदिराचे सध्याचे अध्यायसेवक (मुख्य सेवक) आहेत. त्यांचे वडील, पुरीचे तत्कालीन राजा बिरकिशोर देब यांच्या निधनानंतर, त्यांनी १९७० मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी ही भूमिका स्वीकारली.
जगन्नाथ, त्याचा मोठा बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांची रथयात्रा हे जगन्नाथपुरीचे एक वैशिष्ट्य आहे. जगन्नाथ मंदिराची रथयात्रा दरवर्षी आषाढ महिन्यातल्या शुक्ल पक्षातील द्वितीयेपासून होते. रथयात्रा सुरू होण्यापूर्वी , जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा या देवतांना या प्रवेशद्वारातून मंदिराबाहेर काढले जाते. ही यात्रा जगन्नाथपुरीला सुरू होऊ जनकपुरी येथे समाप्त होते. गुंदेचा मंदिर येथे आपल्या मावशीच्या निवासस्थानी ही तीन भावंडे तीन रथांत बसून जातात अशी यामागील धारणा आहे. गुंडीचा मंदिरातून परतताना दाराच्या वर कोरलेल्या देवी लक्ष्मीला यात्रेत त्यांच्यासोबत नेण्यास दुर्लक्ष केल्याबद्दल विधीपूर्वक प्रसन्न करावे लागते. त्यानंतरच देवी त्यांना मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी देते. जगन्नाथाचा १६ चाके असलेला लाकडी रथ हा ४५ फूट उंच, ३५ फूट लांब आणि ३५ फूट रुंद अशा आकारमानाचा असतो. प्रचंड चाकांचे हे रथ लाकडी बांधकाम असुन त्यावर लाकडात कोरलेले सारथी आणि घोडे असतात. ते दरवर्षी नवीन बांधले जातात आणि बांधण्यासाठी सुमारे २ महिने लागतात. पुरीचे कलाकार आणि चित्रकार रथ सजवतात आणि चाकांवर फुलांच्या पाकळ्या व इतर चित्रे रंगवतात. बाकीचे दोन रथ थोडे लहान असतात. सिंहद्वार येथून देव आपआपल्या रथात बसून निघतात. भारतभरांतून आणि परदेशांतूनही आलेली सर्व जाति-धर्म-संप्रदायांची भक्त मंडळी मिळून हे रथ दोरीने ओढतात. जनकपुरी येथे भगवान तीन दिवस लक्ष्मीसन्निध राहतात अशी व्यवस्था आहे. या उत्सवात विविध धार्मिक विधी-विधाने संपन्न केली जातात. या मंदिराचा पुरावा सर्वप्रथम महाभारतातील वनपर्वात आढळतो. या मंदिराच्या संदर्भात एक पौराणिक कथा आहे ज्यामध्ये या मंदिराचा इतिहास देखील दिसून येतो. एके काळी इंद्रद्युम्न हा माळव्याचा राजा होता. त्यांच्या वडिलांचे नाव भरत आणि आईचे नाव सुमती होते. राजा इंद्रद्युम्नने भगवान जगन्नाथाला स्वप्नात पाहिले होते. असे मानले जाते की एके दिवशी भगवान जगन्नाथ राजा इंद्रद्युम्नच्या स्वप्नात प्रकट झाले आणि त्यांनी राजाला सांगितले की त्यांची मूर्ती नीलाचल पर्वतावर असलेल्या गुहेत आहे. त्याला नीलमाधव म्हणतात. भगवान जगन्नाथांनी राजाला मंदिर बांधून त्यात आपली मूर्ती बसवण्यास सांगितले. लगेच दुसऱ्या दिवशी राजाने आपल्या लोकांना नीलांचल पर्वतावर मूर्ती शोधण्यासाठी पाठवले. राजाने पाठवलेल्या लोकांमध्ये एक ब्राह्मणही होता. ज्याचे नाव होते विद्यापती. त्या ब्राह्मणाला माहित होते की साबर जातीचे लोक नीलमाधवची पूजा करतात आणि ती मूर्ती त्या गुहेत लपवून ठेवली होती. विद्यापतीने धूर्तपणे सबर कुळाच्या प्रमुखाच्या मुलीशी लग्न केले आणि त्या गुहेत जाऊन मूर्ती चोरली. यानंतर त्यांनी ही मूर्ती राजाला दिली. मूर्ती चोरीला गेल्याने जमातीचे लोक अतिशय दु:खी झाले. आपल्या भक्तांना दुःखी पाहून देवही गुहेत परतले. यानंतर भगवान जगन्नाथांनी राजाला समुद्रात तरंगणारा एक मोठा लाकडाचा तुकडा आणून त्याची मूर्ती बनवण्यास सांगितले. राजाने आपली माणसे लाकडे आणायला पाठवली पण ती कोणी उचलू शकली नाही. तेव्हा राजा इंद्रद्युम्नने सबर कुळाच्या प्रमुखाची मदत घेतली. कुळप्रमुखाने एकट्याने ते मोठे लाकूड आणले. राजा इंद्रद्युम्नने एक यज्ञ केला ज्यातून नरसिंह प्रकट झाला आणि त्याने नारायणाला चार पट विस्तारित बनवण्याची सूचना केली म्हणजेच परमात्माला वासुदेव (कृष्ण), त्याचा व्यूह संकर्षण (बलभद्र), त्याची योगमाया सुभद्रा आणि त्याचा विभव सुदर्शन म्हणून बनवा. यानंतर भगवान विश्वकर्मा त्यांच्याकडून मूर्ती बनवण्यासाठी वृद्धाच्या रूपात आले. विश्वकर्माजींनी मूर्ती बनवण्यासाठी २१ दिवसांचा वेळ मागितला होता. आणि त्याला सांगितले की त्याला २१ दिवस कोणीही मूर्ती बनवताना दिसणार नाही. पण दोन आठवड्यांनंतरच, इंद्रद्युम्नची राणी खूप चिंताग्रस्त झाली. मंदिरातून आवाज येत नसल्याने तिने सुताराला मृत समजले. म्हणून तिने राजाला दार उघडण्याची विनंती केली.परंतु राजाने या अटीचे उल्लंघन केल्यावर भगवान विश्वकर्माने त्या मूर्तीपैकी अर्ध्याच मूर्ती सोडल्या. देवतेचे कोणतेही हात नव्हते. परंतु एका दिव्य वाणीने इंद्रद्युम्नला मंदिरात त्यांची स्थापना करण्यास सांगितले. राजा इंद्रद्युम्नने ही भगवान जगन्नाथाची इच्छा मानून त्या अर्धवट मूर्ती मंदिरात स्थापित केल्या. तेव्हापासून आजतागायत भगवान नीलमाधव आणि भगवान विश्वकर्मा यांनी बनवलेल्या त्यांच्या दोन भावंडांच्या मूर्ती याच पद्धतीने अस्तित्वात आहेत. मंदिराच्या ऐतिहासिक नोंदींवरून व मिळालेल्या पुराव्यावरून असे दिसते की मूळ मंदिर उज्जयनीचा राजा इंद्रद्युम्न याच्या राजवटीत इ.स.३१८ च्या सुमारास बांधले गेले होते. पण सध्याच्या पुरी जगन्नाथ मंदिराचे बांधकाम गंगा राजवंशाचा राजा अनंतवर्मन चोडगंगा याने ११ व्या शतकात हे मंदिर पुन्हा बांधले. याचे वर्णन त्याचे वंशज नरसिंहदेव दुसरा आणि राजेंद्र चोल यांनी केंदुपटाच्या ताम्रपटात केले आहे . अनंतवर्मन मूळचा शैव होता आणि १११२ मध्ये त्याने मंदिर असलेल्या उत्कल प्रदेशावर विजय मिळवल्यानंतर तो वैष्णव बनला . ११३४-११३५ च्या शिलालेखात त्याने मंदिराला दिलेल्या देणगीची नोंद आहे. म्हणून, मंदिराचे बांधकाम १११२ नंतर कधीतरी सुरू झाले असावे. मंदिराच्या इतिहासातील एका कथेनुसार, त्याची स्थापना अनंगभिमदेव द्वितीय यांनी केली होती. वेगवेगळ्या इतिहासात बांधकामाचे वर्ष ११९६, ११९७, १२०५, १२१६ किंवा १२२६ असे वेगवेगळ्या प्रकारे नमूद केले आहे. यावरून असे सूचित होते की मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले किंवा अनंतवर्मनचा मुलगा अनंगभिम याच्या कारकिर्दीत मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. ११५० च्या सुमारास या मंदिराच्या बांधकामाच्या समाप्तीनंतर सत्ताधारी राजवंशाने रथयात्रेची स्थापना केली. त्यानंतर १६ व्या शतकापर्यंत गंगा राजवंश आणि गजपती राजवंश यासह त्यानंतरच्या राजांच्या कारकिर्दीत मंदिर परिसराचा आणखी विकास झाला.सध्याची रचना १६ व्या शतकातील आहे. मंदिराच्या इतिहासात मदला पणजीमध्ये , जगन्नाथ मंदिरावर अठरा वेळा आक्रमण करून लुटमार करण्यात आल्याची नोंद आहे. देवतेचा सर्वात जुना उल्लेख इंद्रभूती यांनी लिहिलेल्या ओडियाना वज्रयान तांत्रिक ग्रंथ ज्ञानसिद्धीमध्ये आहे, जो जगन्नाथाच्या आवाहनाने सुरू होतो. याशिवाय पुरीमध्ये नरेंद्र पोखरी व लोकनाथ मंदिर हि अजून दोन प्राचीन ठिकाणे पहायला मिळतात. नरेंद्र पोखरी हा एक अतिशय मोठा तलाव आहे. हा तलाव दांडी माला साही परिसरात सुमारे १ किमी अंतरावर आहे. या नरेंद्र पोखरीला नरेंद्र टाकी असेही म्हणतात. हा तलाव ओरिसा राज्यातील सर्वात मोठा तलाव देखील मानला जातो. हा तलाव १५व्या शतकात राजा नरेंद्र देव राय यांनी बांधला. या तलावाची खोली जमिनीच्या खाली १० फूट मानली जाते. या तलावाच्या मध्यभागी एक मंदिर आहे. याशिवाय लोकनाथ मंदिर हे पुरी शहरातील सर्वात जुने मंदिर आहे. हे ११ व्या शतकात बांधले गेले. हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. स्थानिक कथांनुसार या मंदिराच्या आत स्थापित केलेले शिवलिंग भगवान श्री राम यांनी स्वतः स्थापन केले आहे. घडीव दगडात बांधलेले हे मंदिर ४ भागात विभागलेले असुन जमिनीपासून ३० फूट उंचीवर बांधले आहे. मंदिराच्या भिंतींवर हिंदू धर्माशी संबंधित देवदेवतांची चित्रे आहेत.
© Suresh Nimbalkar