GWALIOR
TYPE : HILL FORT
DISTRICT : GWALIOR- MADHYA PRADESH
HEIGHT : 1130 FEET
GRADE : EASY
भारतातील अनेक महत्वाच्या किल्ल्यांमध्ये ग्वाल्हेरचा किल्ला हा एक महत्वाचा डोंगरी किल्ला मानला जातो. या किल्ल्याचा इतिहास ५ व्या शतकाचा किंवा कदाचित त्याहूनही पूर्वीचा आहे. स्थानिक कथेनुसार ग्वाल्हेर किल्ल्याचा पाया इ.स. सहाव्या शतकात राजपूत योद्धा सूरज सेनने घातला. या कथेनुसार ग्वालीप नावाचा एक संत किल्ल्यावर भटकंती करत आला व राजाला भेटला. यावेळी राजा त्वचेच्या आजाराने त्रस्त ग्रस्त होता. तेव्हा या संताने त्याला आता सूरज कुंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किल्ल्यावरील तलावात डुबकी मारण्याचा सल्ला दिला. त्याच्या या सल्ल्याने राजा लगेच बरा झाला व कृतज्ञता म्हणून सूरज सेनने त्या ऋषीच्या नावावरून शहराचे नाव ग्वाल्हेर ठेवले. सूरज सेनने येथील टेकडीवर तटबंदी बांधली व ग्वाल्हेर किल्ल्याचा पाया घातला. जुन्या शिलालेखांमध्ये या टेकडीचे नाव 'गोपाचला, गोपागिरी' आणि गोपालिकेरा असे येते. ग्वाल्हेर हे सध्याचे नाव 'गोपालिकेरा' या नावाचा अपभ्रंश आहे. किल्ल्याची सध्याची रचना हि ८ व्या शतकातील असुन किल्ल्याच्या परिसरात आढळणारे शिलालेख हा किल्ला ६ व्या शतकापासुनच अस्तित्वात असल्याचे दर्शवितात.
...
ग्वाल्हेर किल्ल्यावर कुशाण,नाग,गुप्त,हूण,प्र तिहार, कच्छवाह, तोमर, पठाण,सुर, मुघल , इंग्रज, जाट आणि मराठे यासारख्या वेगवेगळ्या राजवंशानी राज्य केले. या सर्व सत्तांच्या वास्तु आपल्याला किल्ल्यावर पहायला मिळतात. सध्याच्या किल्ल्यामध्ये संरक्षणात्मक रचना आणि सहा मुख्य राजवाडे असुन त्यात मान मंदिर, विक्रम मंदिर, कर्ण पॅलेस, शाहजहां पॅलेस, जहांगीर पॅलेस आणि गुर्जरी महाल यांचा समावेश आहे. यातील दोन राजवाडे तोमर राजपूत शासक मान सिंह तोमर (१४८६-१५१६ ) यांनी बांधले होते. या प्रदेशातील सुरुवातीच्या शासकांमध्ये मौर्य, शुंग, कुशाण आणि नाग यांचा समावेश होता. त्यांनी चौथ्या शतकापर्यंत येथे सत्ता गाजवली. गुप्तांनी ५ व्या शतकाच्या शेवटपर्यंत या ठिकाणी राज्य केले. किल्ल्यावरील सूर्य मंदिरावर सापडलेल्या शिलालेखांवरून इ.स.५२५ मध्ये हूण सम्राट मिहिर कुल या प्रदेशावर राज्य करत असल्याचे दिसून येते. त्यापुढील किल्ल्यावरील ऐतिहासिक नोंद म्हणजे चतुर्भुज मंदिरावरील ८७५ आणि ८७६ मध्ये कोरलेले दोन शिलालेख ग्वाल्हेर कनौज राज्यात समाविष्ट असल्याचे दर्शवितात. ऐतिहासिक नोंदींमध्ये हुन साम्राज्यानंतर १० व्या शतकात या किल्ल्यावर चंडेलांचे सामंत म्हणून कच्छपांचा उल्लेख येतो. ११ व्या शतकापासून मुस्लिम राजवटीनी किल्ल्यावर अनेक वेळा हल्ला केला. इ.स.१०२२ मध्ये गझनीच्या महमूदने किल्ल्याला चार दिवस वेढा घातला. तबकत-ए-अकबरीनुसार त्याने ३५ हत्तींच्या खंडणीच्या बदल्यात हा वेढा उठवला. मुहम्मद घोरीचा गुलाम बहाउद्दीन तुघलकने इ.स.११९६ मध्ये दीर्घ वेढा घातल्यानंतर किल्ला ताब्यात घेतला. इ.स.१२३२ मध्ये इल्तुतमिशने तो ताब्यात घेतला. इ.स.१३९८ मध्ये ग्वाल्हेर किल्ला तोमरांच्या ताब्यात आला. तोमर शासकांपैकी मानसिंग तोमर यांनी ३० वर्षे या ठिकाणी राज्य केले व किल्ल्यात अनेक वास्तु बांधल्या. इ.स. १५०५ मध्ये दिल्लीचा सुलतान सिकंदर लोदीने किल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला. १५१६ मध्ये त्याचा मुलगा इब्राहिम लोदीने केलेल्या दुसऱ्या हल्ल्यात मान सिंगचा मृत्यू झाला. वर्षभर किल्ल्याला वेढा पडल्याने तोमरांनी अखेर नाईलाजाने किल्ला दिल्ली सल्तनतला सोपवला. त्यानंतर एका दशकातच बाबरने इब्राहिम लोधीकडून हा किल्ला जिंकला. इ.स.१५४२ मध्ये मुघलांनी शेरशाह सुरीकडून हा किल्ला जिंकला. त्यानंतर हा किल्ला हिंदू सेनापती आणि दिल्लीचा शेवटचा हिंदू शासक हेमू याने त्याच्या अनेक मोहिमांसाठी या किल्ल्याचा वापर केला. इ.स.१५५८ मध्ये अकबरने तो पुन्हा ताब्यात घेतला. अकबरने हा किल्ला राजकीय कैद्यांसाठी तुरुंग बनवला. त्याने कामरानचा मुलगा आणि अकबरचा चुलत भाऊ अबुल-कासिम याला किल्ल्यात कैद केले व नंतर फाशी देण्यात आली. ग्वाल्हेरचा शेवटचा तोमर राजा महाराजा रामशाह तोमर याने मेवाडमध्ये आश्रय घेतला व त्याने हल्दीघाटीच्या लढाईत भाग घेतला. या लढाईत तो त्याच्या तीन मुलांसह मारला गेला. येथे ठेवण्यात आलेल्या प्रमुख कैद्यांपैकी एक म्हणजे सहावे शीख गुरु गुरु हरगोबिंद. ग्वाल्हेरच्या कैदखान्यात औरंगजेब यानें आपला सख्खा भाऊ मुराद बक्ष याला बंदिवान केले होते व विष प्रयोगाने ठार मारले तर पुतण्या सुलेमान शिकोह याला या किल्ल्यावरच फाशी देण्यात आली. सुलेमान शिकोह १६५९ ते १६७५ पर्यंत ग्वाल्हेर किल्ल्यावर कैदेत होता. औरंगजेबाचा मुलगा मुहम्मद सुलतान १६६१ ते १६७२ दरम्यान किल्ल्यावर कैदेत होता. औरंगजेबाच्या मृत्युनंतर गोहाडचा जाट शासक भीमसिंग राणा याने ग्वाल्हेर किल्ला ताब्यात घेतला. औरंगजेबाच्या मृत्युनंतर मराठ्यांनी उत्तर आणि मध्य भारतातील मुघल साम्राज्यातील अनेक प्रदेश ताब्यात घेतले होते. उत्तर भारतात मराठ्यांचे आक्रमण पेशवे बाजीरावांनी केले होते. १७५५-१७५६ मध्ये मराठ्यांनी गोहाडच्या जाट शासकाचा पराभव करून ग्वाल्हेर किल्ला ताब्यात घेतला. मराठा सेनापती महादजी शिंदे यांनी गोहड राणा छतरसिंग यांच्याकडून किल्ला जिंकला. किल्ला महादजी शिंदे यांच्या ताब्यात आल्यावर मराठ्यांनी देखील काही शत्रुंना शिक्षा देण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला. महादजींनी मराठ्यांचा कट्टर वैरी इस्माईल बेग याला येथे आमरण कैदेत ठेवले होते. परंतु मराठ्यांनी त्याचे हाल न करता उलट त्याला वर्षाची बिदागी घेऊन राजकैद्यांचा सन्मान दिला. इस्माईल बेग हा महादजीच्या काळात मराठ्यांचा कट्टर शत्रू होता. महादजी विरुद्ध सतत कट कारस्थाने व लढाया करून त्याने बेजार करून सोडले. मराठ्यांविरुद्ध डिग, पाटण,मेडता,आग्रा येथील लढायांत त्याने भाग घेतला. इ.स.१७९२मध्ये कन्नौदच्या लढाईत महादजींचा सरदार खंडेराव हरी याने त्याला कैद केले. परंतु यावेळी देखील त्याने डी बॉयन या महादजींच्या फ्रेंच अधिकाऱ्याच्या वशिल्याने जीवदान मिळवले. डी बॉयनच्या शब्दाखातर महादजींनी त्याला जीवदान दिले पण त्याला ग्वाल्हेरच्या कैदखान्यात बंदिवान केले. त्याच्या किरकोळ खर्चासाठी वार्षिक सहाशे रुपये वेतन ठरवून दिले. १६एप्रिल१७९२मधील ही घटना आहे. इस्माईल बेग १७९९ पर्यंत येथे बंदिवान होता आणि येथेच त्याने अखेरचा श्वास घेतला. ३ ऑगस्ट १७८०मध्ये कॅप्टन पोफॅम आणि ब्रूस यांच्या नेतृत्वाखालील कंपनीच्या सैन्याने रात्रीच्या हल्ल्यात किल्ला जिंकला. या लढाईत दोन्ही बाजूंचे साधारण २० लोक जखमी झाले. इ.स.१७८०मध्ये ब्रिटिश गव्हर्नर वॉरेन हेस्टिंग्ज यांनी गोहडच्या राणांना किल्ला परत दिला. चार वर्षांनंतर मराठ्यांनी किल्ला परत मिळवला पण यावेळी इंग्रजांनी हस्तक्षेप केला नाही कारण गोहडचे राणा यांच्याशी त्यांचे बिनसले होते. दुसऱ्या अँग्लो-मराठा युद्धात दौलतराव सिंधिया यांच्याकडून इंग्रजांनी किल्ला ताब्यात घेतला. १८०८ ते १८४४ दरम्यान सिंधिया आणि ब्रिटिशांमध्ये किल्ल्याच्या नियंत्रणात वारंवार बदल होत होते. जानेवारी १८४४ मध्ये महाराजपूरच्या लढाईनंतर हा किल्ला ब्रिटिश सरकारच्या संरक्षणाखाली मराठा सिंधिया कुटुंबाच्या ग्वाल्हेर राज्याने ताब्यात घेतला. १८५७च्या उठावादरम्यान ग्वाल्हेर येथे तैनात असलेल्या सुमारे ६५०० शिपायांनी कंपनीच्या राजवटीविरुद्ध बंड केले. किल्ल्यावर शेवटचा हल्ला १८५७ च्या युद्धात झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि तात्या टोपे यांनी केला पण ग्वाल्हेरचे त्यावेळचे शासक जयाजीराव सिंधिया ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहिले. जून १८५८ मध्ये ब्रिटिशांनी किल्ल्याचा ताबा घेऊन जयाजीरावांना काही प्रदेश दिला. १८८६ पर्यंत संपुर्ण भारत ब्रिटिशांच्या नियंत्रणात आला व किल्ल्याचे सामरिक महत्त्व राहिले नाही. ब्रिटीशांनी किल्ला झाशीच्या बदल्यात सिंधिया कुटुंबाच्या ताब्यात दिला. १९४७ पर्यंत मराठा सिंधियांनी ग्वाल्हेरवर राज्य केले आणि जय विलास महालसह अनेक वास्तु बांधल्या. महाराज माधवराव सिंधिया यांनी १८९७ मध्ये स्थापन केलेली सिंधिया शाळा देखील किल्ल्यावर आहे. किल्ला पुरातत्व खात्याच्या ताब्यात असल्याने त्याच्या परिसराची चांगली देखभाल केली जाते. संपुर्ण किल्ला ३ चौरस किलोमीटर वर पसरलेला असुन किल्ल्याची तटबंदी साधारण ३६ फूट उंच आहे. संपुर्ण तटबंदी टेकडीच्या कडेला बांधलेली असुन ती अनेक बुरुजांनी एकमेकांशी जोडलेली आहे. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी दोन मुख्य दरवाजे असुन त्यातील पहिला दरवाजा म्हणजे ग्वाल्हेर किल्ला गेट आणि दुसरा उरवाई गेट. या शिवाय वापरात नसलेले धोंडापूर गेट आणि लधेडी गेट हे ग्वाल्हेर किल्ल्याचे इतर दरवाजे आहेत. धोंडापूर दरवाजा करण महाल, जहांगीर महाल यांच्या परिसरात आहे. ग्वाल्हेर दरवाजा हा ग्वाल्हेर शहराला किल्ल्याशी जोडणारा पुर्वेकडील मुख्य दरवाजा आहे. या दरवाजाने किल्ल्यावर जाताना आपल्याला उतारावर रांगेत बांधलेले एकुण सहा दरवाजे पार करावे लागतात. या रांगेतील दुसरा दरवाजा म्हणजे आलमगिरी दरवाजा. हा दरवाजा औरंगजेबाच्या कारकिर्दीत बांधलेला आहे. या दरवाजावर आणि कोपऱ्यातील बुरुजांवर छत्री बसवलेली असुन त्याची वास्तुकला मुघल आणि राजपूत शैलीचे मिश्रण आहे. यानंतर येणारा तिसरा दरवाजा म्हणजे हिंदोळा दरवाजा. १५ व्या शतकात बांधला हा दरवाजा बादल महाल दरवाजा म्हणुनही ओळखला जातो. या दरवाजाला राजा मानसिंग यांचे काका बादलसिंग तोमर यांचे नाव देण्यात आले आहे. यानंतर येणारा चौथा दरवाजा म्हणजे लक्ष्मण दरवाजा. हा दरवाजा देखील १५ व्या शतकात बांधलेला असुन तोमर राजवंशातील लक्ष्मणसिंग यांचे नाव या दरवाजाला देण्यात आले आहे. यानंतर येणारा पाचवा गणेश दरवाजा राजा डूंगरसिंग तोमर यांनी पंधराव्या शतकात बांधला. यानंतर किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी असलेला शेवटचा दरवाजा म्हणजे हाथी पोळ. आग्नेय दिशेला असलेला हाथी पोळ दरवाजा मान मंदिर राजवाड्याकडे आहे. सहा दरवाज्यांच्या मालिकेतील हा शेवटचा दरवाजा आहे. एकेकाळी या दरवाजाला सजवणाऱ्या हत्तीच्या पूर्ण आकाराच्या पुतळ्यावरून हे नाव पडले आहे. हा दरवाजा घडीव दगडात बांधलेला असुन त्याच्या गोलाकार बुरुजावर कोरीव काम केलेले घुमट आहेत. सहा दरवाजांची हि मालिका पार करून किल्ल्यावर जाताना आपल्याला वाटेच्या दोन्ही बाजूला सुंदर नक्षीकाम असलेली मंदीरे पहायला मिळतात. त्यात चतुर्भुज मंदीर महत्वाचे आहे. किल्ल्याचे जल व्यवस्थापन अतिशय मजबुत असुन किल्ल्याला पाणी पुरवठा करण्यासाठी मानसरोवर तलाव, गंगोला तलाव, एक खांब तलाव, कटोरा तलाव, राणी तलाव , चेदी तलाव आणि जौहर कुंड असे अनेक जलाशय आहेत. या जलाशयांमधून किल्ल्यावरील १५००० सैन्य व इतर सर्व वास्तुना पाणी पुरवठा केला जात होता. आता आपण किल्ल्यावरील वास्तुना भेट देऊया. हत्ती दरवाजाने आत शिरल्यावर समोरच दिसतो तो राजा मानसिंग यांचा राजवाडा.
मान मंदिर / मान सिंग राजवाडा- राजा मान सिंह पॅलेस हा ग्वाल्हेर किल्ल्यातील सर्वात प्रमुख रचना असुन राजपूत स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना आहे. मान मंदिर राजवाडा किल्ल्याच्या ईशान्य टोकाला आहे. राजा मान सिंह तोमर यांनी इ.स.१५०८ मध्ये बांधलेला हा राजवाडा तोमर राजवंशाच्या शासकांचे मुख्य निवासस्थान होता. हा राजवाडा वेगवेगळ्या रंगांच्या काचेच्या टाइल्स व त्यावर केळीची झाडे, बदके, मोर, हत्ती, सिंह,खांबांचे घुमट अशा सुंदर चित्रांनी सजवलेला आहे. मान मंदिर राजवाड्याचे चार मजले असुन त्यापैकी दोन मजले जमिनीखाली भुमिगत आहेत. वरच्या दोन मजल्यांवर एक उघडे अंगण, संगीत सभागृह आणि राजा-राणीच्या खोल्या आहेत. बहुतेक खोल्यांमध्ये हवा व प्रकाश येण्यासाठी लहान खिडक्या असुन त्यावर जाळीचे सुंदर काम आहे. जमिनीखाली जाण्यासाठी उभ्या आणि अरुंद पायऱ्याचे जिने आहेत. या पायऱ्यांनी खाली उतरल्यावर आपण झुलाघर नावाच्या ठिकाणी पोहोचतो. येथे मध्यभागी एक बंद विहीर असुन तिच्याभोवती खांब आहेत. पुर्वी येथे झोपाळे होते आणि स्त्रिया त्यावर बसण्यासाठी आणि विहिरीजवळ आराम करण्यासाठी खाली येत असत. हि विहीर केसर कुंड म्हणुन ओळखली जाते. प्रकाशासाठी आणि हवेसाठी येथील खिडक्या प्रमाणबद्ध रितीने बांधलेल्या आहेत. हा राजवाडा ग्वाल्हेर किल्ल्याच्या बाहेरील भिंतीवर बांधला असल्याने त्यातुन बाहेरील परिसराचे सुंदर दर्शन होते. १६ व्या शतकात जेव्हा किल्ला मुघलांच्या ताब्यात आला त्यावेळी या राजवाड्याचा वापर राजकैद्याना तुरुंग म्हणून करण्यात आला.
करण महाल- करण पॅलेस विक्रम महालाच्या अगदी समोर स्थित आहे. तोमर राजवंशाचा दुसरा शासक कीर्ती सिंह याने १४८०-१४८६ मध्ये करण महाल बांधला होता. कीर्ती सिंह यांचे दुसरे नाव करण सिंह असल्याने या राजवाड्याला करण महाल असे नाव पडले. किल्ल्यात बांधलेल्या सुरवातीच्या राजवाड्यांपैकी हा एक आहे. करण महाल ही दोन मजली इमारत असुन त्याच्या आसपास दरबार- तुरुंग- हमामखाना यासारख्या वास्तु आहेत. करण पॅलेसची साधी रचना असूनही ही मध्ययुगीन इमारत त्याच्या भव्य आकाराने वेगळी दिसते.
विक्रम महाल-विक्रमादित्य हा मानसिंह तोमरचा मोठा मुलगा होता आणि त्याने इ.स १५१६ मध्ये मान मंदिरा शेजारी स्वतःसाठी एक राजवाडा बांधला. हा एक अतिशय साधा पण सुंदर राजवाडा आहे. मध्यभागी एक बारादरी ज्याच्या दोन्ही बाजूला खोल्या आहेत. बारादरीमध्ये हवा आणि प्रकाशासाठी एक उघडा दरवाजा असलेले दालन आहे.
शेर महाल/जहांगीर महाल- शेरशाहने बांधलेल्या या महालाची जहांगीरने या परीसरात स्वतःच्या भेटीदरम्यान राहण्यासाठी पुनर्बांधणी केली आणि त्यामुळे या महालाला जहांगीर महाल असे नाव पडले.
शाहजहां महाल- जहांगीर महालाच्या अगदी समोर शाहजहां महाल आहे जो त्याने स्वतः बांधला होता. जहांगीर महालचा एक भाग शाहजहां महालाला जोडलेला आहे. या महलावर मुघल वास्तुकलेचा प्रभाव दिसून येतो.
भीम सिंग राणा यांचे स्मारक- भीमसिंग राणा की छत्री म्हणून ओळखले जाणारे हे स्मारक भिंड (मध्य प्रदेश) येथील गोहाडचे राजा भीम सिंग राणा यांचे घुमटाखाली बांधलेले तीन मजली समाधीस्थळ आहे ज्यांनी १७१७ ते १७५६ दरम्यान भिंड येथे राज्य केले. मुघल आणि मराठा राजवटीदरम्यान भीम सिंग राणा यांनी किल्ल्यावर काही काळासाठी कब्जा केला. १७४० मध्ये मुघल सरदार अली खान यांनी शरणागती पत्करली तेव्हा भीमसिंग यांनी ग्वाल्हेर किल्ला ताब्यात घेतला. १७५४ मध्ये, भीमसिंग यांनी किल्ल्यावर एक भिमतल (तलाव) बांधला पण १७५६ मध्ये शिंदेंच्या नेतृत्वाखालील मराठ्यांशी झालेल्या लढाईत भीमसिंग राणा जखमी होऊन मरण पावले. त्यानंतर राणा छत्रसिंग यांनी भीमसिंग राणांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे स्मारक बांधले. भीमसिंग राणा हे राणा जयसिंग बमरोलिया यांचे वंशज होते .
जौहर कुंड- जेव्हा किल्ला शत्रूंच्या ताब्यात जाण्याची शक्यता असे त्यावेळी क्रूर मुस्लीम आक्रमण कर्त्यांपासून संरक्षण करण्यासाठी स्त्रिया आत्मदहन करत असत जेणेकरून त्यांच्यावर बलात्कार होऊ नये. जेव्हा मान सिंग तोमर लढाईत मारला गेला तेव्हा त्याच्या राजपूत राण्या आणि त्यांच्या दासींनी आक्रमणकर्त्या पासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी आत्मदहन केले ते विशाल जौहर कुंड आहे. किल्ल्याला पाणीपुरवठा करण्यासाठी हे विशाल पाण्याचे टाके बांधण्यात आले होते पण इस्लामिक हल्ल्यांदरम्यान ते महिलांसाठी जौहरचे ठिकाण बनले. जौहर कुंड किंवा जौहर स्थळ हे भीमसिंग राणा यांच्या समाधीस्थळाजवळ आणि जहांगीर महालाच्या पश्चिमेस आहे.
चतुर्भुज मंदिर - चतुर्भुज मंदिरात आपल्याला शून्य अंक दर्शविणारा सर्वात जुना शिलालेख पहायला मिळतो. हा शिलालेख सुमारे १५०० वर्षे जुना असुन त्याला शुन्य अंक दर्शविणारा पहिला पुरावा मानला जातो. ग्वाल्हेर किल्ल्याच्या परिसरात असलेले चतुर्भुज मंदिर हे अभ्यासकांना आवर्जून भेट देण्याचे ठिकाण आहे. प्राचीन भारतातील गणितज्ञ-खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट (४७६-५५० इ.स.) यांनी जगाला शून्य दिले हे सर्वज्ञात सत्य आहे. विष्णू भगवान यांना हे मंदीर समर्पित आहे.
तेली का मंदिर - ग्वाल्हेरच्या किल्ल्यातील एक महत्वाची वास्तु असलेले हे मंदिर ८-९ व्या शतकात प्रतिहार सम्राट मिहिरभोज यांनी बांधले आहे पण स्थानिक कथेनुसार ते तेल व्यापाऱ्यांनी दिलेल्या पैशातून बांधले गेले म्हणून त्याचे नाव तेली का मंदिर असे पडले. हा किल्ल्याचा सर्वात जुना भाग असुन जवळपास ७० फुट उंच असलेले हे विष्णू मंदिर उत्तर भारतीय नागर आणि दक्षिण भारतीय द्रविड शैलीतील स्थापत्यशैलीतीचे मिश्रण आहे. मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करताना सर्वात आधी मंदीराची उंची नजरेत भरते. मुख्य प्रवेशद्वारावर सुंदर गरुड कोरलेला आहे. मंदिराच्या दरवाज्यांच्या दोन्ही बाजूला गंगा आणि यमुना यांच्या प्रतिमा सोबत पानांचे तोरण कोरलेले आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूंच्या उभ्या पट्ट्या साध्या पद्धतीने सजवल्या असुन त्यावरील नक्षीकाम आता खूप खराब झालेले आहे. थोड्या पायऱ्या चढून आपण गर्भगृहात प्रवेश करतो. आयताकृती कमानदार छत या मंदिराच्या वैशिष्ट्यात भर घालते. आयताकृती रचना असलेल्या या मंदिरात आसपासच्या मंदिरांप्रमाणे कोणताही मंडप अथवा खांब नसुन माथ्यावर दक्षिण भारतीय शैलीतील त्रिकोणाकृती उताराचे छप्पर आहे. बाहेरील भिंतींमधील कोनाड्यांमध्ये कधीकाळी पुतळे असावेत पण आता ते रिकामे आहेत. हे मंदिर मूळतः विष्णूचे असले तरी मुस्लिम हल्ल्यांदरम्यान त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असावे. कारण १८८१ ते १८८३ दरम्यान त्याचे नूतनीकरण करताना मंदिरावरील गरुडासारख्या वैष्णव आकृत्या कायम ठेवून आत शिवलिंग बसवून त्याचे शिव मंदिरात रुपांतर करण्यात आले.
जैन लेणी -उर्वही दरवाज्यातून किल्ल्यात प्रवेश करताना आपल्याला किल्ल्याच्या भिंतीखालील उंच कड्यात १५व्या शतकात कातळात कोरलेल्या लेण्या पहायला मिळतात. या लेण्या पश्चिमेकडे सिद्धांचल (उर्वही) गट, गोपाचल पर्वत (दक्षिणपूर्व गट), दक्षिण पश्चिम गट, वायव्य गट, पूर्वोत्तर गट अशा पाच गटांमध्ये विभागल्या आहेत. यात जैन तीर्थंकरांना समर्पित अकरा जैन लेणी असुन दक्षिणेला कातळात खोदलेली २१ लहानमोठी लेणी आहेत ज्यात तीर्थंकरांचे सूक्ष्म कोरीवकाम आहे. या लेण्यात अतिशय सुंदर अशा लहान मोठ्या १५०० मूर्ती आहेत. या लेण्यात पद्मासन मुद्रेत असलेल्या तीर्थंकरांच्या २४ मूर्ती, कायोत्सर्ग मुद्रेत असलेल्या ४० मूर्ती आणि भिंती आणि खांबांवर कोरलेल्या सुमारे ८४० मूर्ती आहेत. या सर्व लेण्या १३४१-१४७९ या काळात तोमर राजवंशातील राजा डुंगर सिंह आणि कीर्ती सिंह यांच्या काळात कोरल्या गेल्या. यातील सर्वात उंच मूर्ती म्हणजे पहिले जैन तीर्थंकर ऋषभनाथ किंवा आदिनाथ यांची ५८ फूट उंच मुर्ती. हि मुर्ती बैलाच्या चिन्हामुळे ओळखता येते. २२ वे तीर्थंकर नेमिनाथ यांची ३२ फुट उंच बसलेली मूर्ती शंखाचे चिन्हाने ओळखता येते. येथे पद्मासन मुद्रेत भगवान पार्श्वनाथांची एक अतिशय सुंदर मुर्ती असुन त्याची उंची ४२ फूट आणि रुंदी ३० फूट आहे. या मूर्तीच्या डोक्यामागे नागाचा आकार आहे. भगवान पार्श्वनाथांच्या उपदेशस्थळासह. श्री १००८ सुप्रतीष्ठ केवली यांनी निर्वाण प्राप्त केले ते ठिकाण देखील हेच आहे. १५२७ मध्ये बाबरच्या सैन्याने ग्वाल्हेर किल्ल्यावर हल्ला केला व किल्ला ताब्यात घेतल्यानंतर बाबरने आपल्या सैनिकांना मूर्ती तोडण्याचा आदेश दिला. मुर्तीभंजक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सैन्याने हिंदू देवता किंवा जैन तीर्थंकर असोत या सर्व देवतांचे चेहरे नष्ट केले. मूर्ती विद्रूप करण्याच्या या खुणा आजही दिसतात. बाबरच्या सैन्याने नग्न दिगंबर जैन तीर्थंकरांच्या मूर्तींचे गुप्तांग देखील नष्ट केले. तीर्थंकरांच्या काही मूर्तींचे चेहरे आणि गुप्तांग वगळता बहुतेक दगडी कोरीवकामाच्या प्रतिमा आजही शिल्लक असुन चांगल्या स्थितीत आहेत.
अस्सी खंबा की बाओरी- हाथी दरवाजापासून काही अंतरावर हे ठिकाण आहे. नावाप्रमाणे हि पायऱ्यांची एका विहीर असुन या विहिरीच्या आतील बाजुस खांब आहेत. या विहिरीच्या आत अनेक दालने असुन त्यांचा वापर कपडे बदलण्यासाठी किंवा राण्यांना आंघोळ करण्यासाठी केला जात असावा.
सहस्त्रबाहू मंदिर- सास-बहू मंदिर म्हणूनही ओळखले जाणारे हे मंदीर ग्वाल्हेर किल्ल्यातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. ग्वाल्हेर किल्ल्याच्या पूर्वेकडील कोपऱ्यावर असलेल्या या मंदिराचे बांधकाम कच्छप शासक राजा रतनपाल यांनी सुरू केले पण नंतर राजा महिपालाच्या काळात इ.स. १०९३ मध्ये हे मंदीर पूर्ण झाले. सास मंदिर हे मोठ्या विष्णुमंदिराचे प्रतीक असुन मंदिराच्या प्रवेशद्वारावर ब्रह्मा, विष्णू आणि सरस्वती यांच्या मुर्ती आहेत. सास मंदिराच्या आतील भागात कृष्णलीला व गरुडाची प्रतिमा कोरलेली असुन बाहेरील भिंतींवर अनेक भौमितिक आकृत्या, संगीतकार, नर्तक, फुलांची नक्षी व हत्ती कोरलेले आहेत. बहू मंदिर हे लहान शिवमंदिराचे प्रतीक आहे. लहान बहू मंदिरातून ग्वाल्हेर शहर नजरेस पडते. मोठ्या सास मंदिराप्रमाणे बहू मंदिर देखील सुंदर नक्षीनी सजवले आहे. मंदिराला एक प्रवेशद्वार आणि लहान सभामंडप आहे. सास-बहू मंदिराचे मूळ नाव सहस्त्रबाहू मंदिर होते. सहस्त्रबाहू म्हणजे: हजार हात. पण काळाच्या ओघात स्थानिक बोलीभाषेत त्याचे नामकरण सास-बहू मंदिर झाले. मंदिराचा आराखडा उत्तर-दक्षिण असा असुन त्यात दक्षिणेकडून उत्तरेकडे गर्भगृह, अंतराळ महामंडप आणि अर्धमंडप आहे. मध्यवर्ती सभागृहात मोठ्या प्रमाणात कोरीव खांब असुन आणि छत तीन बाजूंनी व्हराड्यांनी वेढलेले आहेत.
गुरुद्वारा दाता बंदी चोर- हे गुरुद्वारा ६ वे शीख गुरु हरगोबिंद साहिब जी यांचे स्मारक आहे. १९७० आणि १९८० च्या दशकात गुरुद्वारा दाता बंदी चोर हे त्या ठिकाणी बांधले गेले. २४ जून १६०६ रोजी वयाच्या ११ व्या वर्षी गुरु हरगोबिंद यांना सहावे शीख गुरु म्हणून राज्याभिषेक करण्यात आला. मुघल सम्राट जहांगीरने गुरु अर्जन यांना फाशी दिल्यामुळे गुरु हरगोबिंद सुरुवातीपासूनच मुघल राजवटीचे शत्रू होते. त्यांनी शिखांना शस्त्रे घालून लढण्याचा सल्ला दिला. जहांगीरच्या हातून त्यांच्या वडिलांच्या मृत्युमुळे त्यांनी शीख समुदायाच्या लष्करी वाढीवर भर दिला. जहांगीरने १६०९ मध्ये १४ वर्षांच्या गुरु हरगोबिंदांना ग्वाल्हेर किल्ल्यावर तुरुंगात टाकले कारण गुरु अर्जन यांना लावण्यात आलेला दंड शिखांनी आणि गुरु हरगोबिंदांनी भरला नव्हता. त्यांनी कैदी म्हणून किती वेळ घालवला हे स्पष्ट नसले तरी त्यांच्या सुटकेचे वर्ष १६११ किंवा १६१२ असे असावे कारण तेव्हा गुरु हरगोबिंद १६ वर्षांचे होते. दबिस्तान इ मजाहिब सारख्या पर्शियन नोंदींवरून असे दिसून येते की त्यांना बारा वर्षे तुरुंगात ठेवण्यात आले होते ज्यामध्ये १६१७-१६१९ पेक्षा जास्त काळ ते ग्वाल्हेरमध्ये होते. शीख परंपरेनुसार गुरु हरगोबिंदांना दिवाळीच्या दिवशी तुरुंगवासातून मुक्त करण्यात आले. शीख इतिहासातील या महत्त्वाच्या घटनेला आता बंदी चोर दिवस म्हणतात.
गुजरी महाल- गुजरी महाल हा राजा मानसिंग तोमर यांच्या त्यांच्या शूर गुजरी राणी मृग्नयनी यांच्यावरील प्रेमाचे स्मारक आहे. राजा मान सिंह यांनी राणी मृग्नयनी यांच्यासाठी किल्ल्याखाली गुजरी महाल हा चौकोनी दुमजली महाल बांधला. गुजरी महालची बाहेरील बाजु जतन केलेली असुन आतील भागात पुरातत्व संग्रहालय बनविण्यात आले आहे. गुजरी महाल संग्रहालयात पुरातन मुर्तींचा संग्रह असुन त्यातील काही इ.स.पहिल्या शतकातील आहेत. गुजरी महालमधील दुर्मिळ मुर्ती म्हणजे ग्यारसपूर येथील सुरसुन्दरी शालभंजिका मूर्ती. ही मूर्ती संग्रहालयाच्या क्युरेटरच्या ताब्यात असुन विनंतीनुसार पाहता येते. या मूर्तीचे वर्णन भारताचा व्हीनस डी मिलो म्हणून केले गेले आहे. राजा मान सिंह तोमर शिकारीला गेले असताना, त्यांना निन्नी नावाची एक गुजर मुलगी भेटली! राजाने निन्नीला दोन बलाढ्य म्हशींची शिंगे सोडवताना पाहिले आणि तिच्या सौंदर्याने आणि शौर्याने तो मोहित झाला व निन्नी मान सिंग तोमरची नववी राणी बनली. त्याने गुज्जर राजकुमारीचे नाव मृगनयनी ठेवले. त्याने राणीसाठी डोंगराच्या पायथ्याशी राजवाडा बांधला आणि त्याला गुजरी महाल असे नाव दिले. ग्वाल्हेर किल्ल्याचे प्रवेश शुल्क प्रौढांसाठी ४० रुपये, मुलांसाठी २५ रुपये आणि परदेशी लोकांसाठी २५० रुपये आहे. गुजरी राजवाड्यासाठी स्वतंत्र प्रवेश तिकीट आहे. ग्वाल्हेर किल्ला सकाळी ९:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत खुला असतो.
© Suresh Nimbalkar