DONGARTAL

TYPE : HILL FORT

DISTRICT : NAGPUR

HEIGHT : 1520 FEET

GRADE : EASY

महाराष्ट्रातील एक भौगोलिक प्रदेश म्हणजे विदर्भ. महाराष्ट्रातील भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वाशिम आणि गोंदिया या अकरा जिल्ह्यांचा समावेश विदर्भात होतो. विदर्भातील बहुतांशी किल्ले हे गोंड राजसत्तेच्या काळात म्हणजे इ. स. १२-१३ व्या शतकात बांधलेले आहेत. गोंड राजसत्तेने बांधलेला असाच एक पुर्णपणे अपरीचीत गिरीदुर्ग आपल्याला नागपुर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात पहायला मिळतो. नागपुर जिल्ह्यातील दुर्गभ्रमंती करताना आपण रामटेक, नगरधन हे किल्ले आवर्जुन पहातो पण या किल्ल्यापासुन काही अंतरावर एखादा गिरिदुर्ग असेल याची आपल्याला कल्पनादेखील नसते. ब्रिटीश कागदपत्रातुन देवळापार येथील पेंढाऱ्यांची गढी अथवा ठाणे म्हणून ओळखला जाणारा हा कोट काळाच्या ओघात आता डोंगरतळ म्हणुन ओळखला जातो. त्यामुळे देवळापार येथील किल्ल्याची शोधाशोध केल्यास आपला भ्रमनिरास होतो. पूर्वी सिंदुरगिरी किंवा तपोगिरी म्हणुन ओळखल्या रामटेक टेकड्यांच्या डोंगररांगेत हा गिरीदुर्ग वसलेला आहे. ... डोंगरतळ हा किल्ला गिरीदुर्ग असुन या किल्ल्याच्या (तळाशी)पायथ्याशी गोंडकालीन राजवाडा अथवा सराई आहे. हि वास्तु आसपासच्या परीसरात परिचयाची असुन डोंगरतळाशी असल्याने डोंगरतळ म्हणुन ओळखली जाते. त्यामुळे या टेकडीवर असलेला किल्ला देखील डोंगरतळ किल्ला म्हणुन ओळखला जातो. डोंगरतळ गावाची ग्रामपंचायत आजही देवळापार हीच आहे. देवळापार किल्ल्याचे हे नामाभिमान अलीकडील काळात झालेले आहे. स्थानिक लोक पायथ्याशी असलेल्या गढीवजा वास्तुला गोंड राजाचा किल्ला म्हणुन ओळखतात पण खरा किल्ला या गढी समोरील डोंगरावर आहे. नागपुर शहरापासुन ६८ कि.मी.अंतरावर असलेला हा किल्ला रामटेक किल्ल्यापासुन २९ कि.मी. अंतरावर तर देवळापार येथुन फक्त ४ कि.मी.अंतरावर आहे. देवळापार हे गाव नागपुर-जबलपुर महामार्गावर असल्याने तिथपर्यंत जाणे सोयीचे असले तरी तेथून डोंगरतळ येथे जाण्यासाठी खाजगी वहानाचा अथवा पायगाडीचा आधार घ्यावा लागतो. खाजगी वाहानाने आल्यास आपण थेट डोंगरतळ गढीसमोर पोहोचतो. गढीच्या मुख्य दरवाजासमोर विटांनी बांधलेली चौकोनी आकाराची पायऱ्याची विहीर असुन विहिरीत उतरणाऱ्या पायऱ्यावर कमान बांधलेली आहे. विहिरीतील पाणी खेचण्यासाठी दगडी रहाट बांधलेला आहे. या विहिरीपासून काही अंतरावर कोरडा पडलेला लहानसा हौद पहायला मिळतो. गढीची चारही बाजूची तटबंदी आजही सुस्थितीत असुन गढीचा मुख्य दरवाजा उत्तराभिमुख आहे. संपुर्ण गढीचे बांधकाम विटांनी केलेले असुन त्यावर चुन्याचा गिलावा दिलेला आहे. गढीचा मुख्य दरवाजा सुशोभित करण्यासाठी त्यावर चुन्यामध्ये वेगवेगळ्या नक्षी कोरलेल्या आहेत. पण त्यात हत्तीवर आरूढ सिंह हे गोंड राजवटीचे राजचिन्ह नसल्याने हा राजवाडा नसून बहुदा सराई असावी असे वाटते. गढीच्या मागील बाजुस म्हणजे दक्षिणेला तटबंदीला लागून चौकोनी आकाराचा बुरुज आहे. या बुरुजाचा वापर गढीत तसेच आसपास लक्ष ठेवण्यासाठी तसेच गढीत पाणीपुरवठा करण्यासाठी केला जात असावा. गढीत प्रवेश केल्यावर तटबंदीच्या चारही बाजुस निरनिराळ्या आकाराचे नक्षीदार कोनाडे दिसून येतात. चौकोनी आकाराची हि गढी साधारण अर्धा एकरवर पसरलेली असुन मध्यभागी चौकोनी आकाराचा लहानसा कारंजा हौद दिसुन येतो.कधीकाळी दुमजली असणारी हि गढी आतील बाजूने पुर्णपणे ढासळलेली असुन वरील भागात जाण्याचा मार्ग देखील शिल्लक नाही. गढीच्या पश्चिमेकडील तटबंदीत ये-जा करण्यासाठी दुसरा लहान दरवाजा पहायला मिळतो. संपुर्ण गढी पहाण्यासाठी १५ मिनिटे पुरेशी होतात. गढीचा ताबा पुरातत्व खात्याकडे असला तरी त्यांचे या गढीकडे फारसे लक्ष दिसुन येत नाही. गढीच्या मुख्य दरवाजाने बाहेर आल्यावर समोरच बाबा लाल दिवान शहा यांचा दर्गा पहायला मिळतो. दर्ग्याजवळ लहान विहीर असुन या विहिरीचे पाणी पिण्यायोग्य आहे. गढीतुन बाहेर आल्यावर डावीकडे काही अंतरावर गडावर जाण्यासाठी वाट आहे.स्थानिकांना वर काय आहे विचारले असता ते बाबा कि घुमने कि जागा सांगतात पण आपण मात्र वर किल्ला आहे हे लक्षात ठेवुन पुढी भटकंती सुरु करावी. या वाटेने उभा चढ चढून १५ मिनिटात आपण किल्ल्याच्या पुर्वाभिमुख उध्वस्त दरवाजात पोहोचतो. दरवाजा उध्वस्त झाला असला तरी त्याचे अस्तित्व सांगणाऱ्या खुणा आजही शिल्लक आहेत. भग्न दरवाजातुन आत प्रवेश केल्यावर डावीकडील वाट आपल्याला बालेकिल्ल्याच्या दिशेला नेते तर उजवीकडील वाट तटबंदीवर घेऊन जाते. आपण उजव्या बाजुस वळून सर्वप्रथम तटबंदी पाहुन घ्यावी. दरी काठावर असलेली किल्ल्याची तटबंदी साधारण ७-८ फुट रुंद असुन ५-६ फुट उंच आहे. तटाच्या आसपास मोठ्या प्रमाणात झाडी असुन या वाढलेल्या झाडीतुन वाट काढतच तटबंदीची फेरी करावी लागते. हि तटबंदी रचीव दगडांची असुन आजही सुस्थितीत आहे. या भागात मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली असल्याने कोणतेही वास्तु अवशेष दिसुन येत नाही. तटबंदीचा हा भाग पाहुन झाल्यावर मूळ वाटेवर म्हणजे दरवाजाकडे येऊन बालेकिल्ल्याच्या दिशेने निघावे. बालेकिल्ल्याच्या दिशेने जाताना या भागात असलेली तटबंदी व त्यातील दोन बुरुज नजरेस पडतात. या भागात झाडी नसल्याने येथून थेट देवळापार पर्यंतचा परिसर नजरेस पडतो. येथून काही बांधीव पायऱ्या चढुन आपण बालेकिल्ल्यावर पोहोचतो. संपुर्ण किल्ला साधारण ८ एकरवर पसरलेला असुन समुद्रसपाटी पासून १५२० फुट उंचावर आहे. गडाचा बालेकिल्ला फारच लहान म्हणजे ४० x ४० फुट आकाराचा असुन पुर्णपणे दगडात बांधलेला आहे. वनखात्याने येथे निरीक्षणासाठी मनोरा उभारलेला आहे. बालेकिल्ल्यावर नव्यानेच बांधलेला लहान सिमेंट चौथरा असुन त्यावर चादर अंथरलेली आहे. पायथ्यापासुन येथवर येण्यासाठी अर्धा तास पुरेसा होतो. देवळापार किल्ला रामटेक डोंगर रांगेतुन बाहेर आलेल्या एका डोंगर सोंडेच्या टोकावर बांधलेला असल्याने येथुन डोंगररांगा न दिसता खूप मोठा सपाट प्रदेश नजरेस पडतो. किल्ल्याची फेरी करताना गडावर पाण्याची सोय कोठे दिसुन येत नाही किंवा असल्यास ती झाडीत लपली गेली असावी. संपुर्ण किल्ला पाहुन पायथ्याशी परत जाण्यासाठी एक तास पुरेसा होतो. गोंड राजवटीचा उदय १३ व्या शतकाच्या मध्यार्धात पूर्व विदर्भात झाला व त्यांनी या प्रदेशावर आपली सत्ता स्थापन केली. गोंड राजांनी या भागावर जवळजवळ ४०० वर्षे राज्य केले. त्यामुळे त्यांनी बांधलेले किल्ले या भागात जास्त प्रमाणात आढळतात. बल्लारशहा, चंद्रपूर आणि नागपूर ही शहरे त्यांची राजधानीची ठिकाणे होती. गोंड राजांनी सुरुवातीपासून मुस्लीम राजवटीचे मांडलिकत्व पत्करल्यामुळे त्यांना फार कमी प्रमाणात युद्धाला सामोरे जावे लागले. नागपूरकर भोसल्यांनी १८ व्या शतकाच्या पूर्वार्धात विदर्भावर आपले वर्चस्व प्रस्थापित करून अनेक किल्ल्यांचे नुतनीकरण केल्याचे उल्लेख सापडतात पण महादागडचा संदर्भ काही मिळत नाही. क्रांतिकारकांनी या देवळापार किल्ल्याच्या आधाराने इंग्रजांशी लढा देण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला. त्यामुळे ब्रिटीश कागदपत्रात देवळापार किल्ल्याचा उल्लेख पेंढाऱ्यांचे ठाणे असा येतो.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!