DINDU

TYPE : COASTAL FORT

DISTRICT : VALSAD

HEIGHT : 100 FEET

GRADE : EASY

मुंबईमुळे कोकण प्रांताचे उत्तर कोकण व दक्षिण कोकण असे दोन भाग पडले आहेत. वसई ते दमण हा पट्टा उत्तर कोकण म्हणुन तर अलीबाग ते कारवार हा पट्टा दक्षिण कोकण म्हणुन ओळखला जातो. यातील उत्तर कोकणात बराच काळ पोर्तुगीजांची सत्ता असल्याने वसई ते दमण या समुद्री पट्ट्यात त्यांनी बांधलेले अनेक लहान मोठे गढीवजा कोट पहायला मिळतात. यातील बहुतांशी कोटांची मोठया प्रमाणात पडझड झालेली असुन थोडेफार शिल्लक असलेले अवशेष पहायला मिळतात. पोर्तुगीजांची निर्मिती असलेला दिंडूगड हा दमणच्या सरहद्दीवर असलेला असाच एक किल्ला. एकेकाळी स्वराज्यात असणारा हा प्रदेश भाषावार प्रांत रचना करताना व इतर काही कारणामुळे गुजरात राज्यात सामील झाला. कधीकाळी हा किल्ला स्वराज्यात असल्याने मी या किल्ल्यांचा उल्लेख महाराष्ट्रातील किल्ले या सदराखाली करत आहे. चिंतामण गंगाधर गोगटे यांनी १८९६ सालात लिहिलेल्या महाराष्ट्र देशातील किल्ले या पुस्तकात या किल्ल्याचा उल्लेख येतो. ... याशिवाय कॅप्टन नरवणे यांनी लिहिलेल्या The Maritime and Coastal Forts of India या इंग्रजी पुस्तकात या किल्ल्याचा उल्लेख येत असला तरी फणसे गावाजवळ हा किल्ला असल्याचा उल्लेख वगळता इतर कोणतेही संदर्भ मिळत नव्हते. पण दुर्गानी झपाटलेले आमचे एक मित्र श्री. जगदीश धानमेहेर यांनी केवळ या एका उल्लेखाच्या आधारे या किल्ल्याचे स्थान शोधुन काढले याबद्दल त्यांचे मनपुर्वक अभिनंदन!!! त्यांनी दिलेल्या माहितीमुळेच आम्ही या किल्ल्याला भेट देऊ शकलो. काळाच्या ओघात मराठीतील फणसे गावाचा उल्लेख आता गुजराती भाषेत फन्सा म्हणुन होतो. फन्सा गावातील बी. एफ. बी. एम. शाळेच्या पाठीमागे १०० फुट उंचीच्या एका लहान टेकडीवर या कोटाचे अवशेष काळाशी झुंज देत उभे आहेत. फन्सा गावात जाण्यासाठी भिलाड हे जवळचे रेल्वे स्थानक असुन भिलाड- फन्सा हे अंतर १३ कि.मी.आहे. गावात जाण्यासाठी रेल्वे स्थानकातून बस तसेच रिक्षाची सोय आहे. गावात आल्यावर बी. एफ. बी. एम. वाडीया शाळेचा पत्ता विचारून आपण सहजपणे किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. शाळेपासुन टेकडीवर जाण्यासाठी ५ मिनीटे पुरेशी होतात. कोटाची मोठया प्रमाणात पडझड झालेली असुन सर्वात उंच भागात असलेली दुमजली इमारत वगळता इतर कोणतेही अवशेष दिसत नाहीत. या इमारतीच्या भिंतीत बंदुकीचा मारा करण्यासाठी असलेल्या जंग्या पहाता हा कोट असल्याचे लक्षात येते. इमारतीच्या आतील भागात वरील मजल्यासाठी वासा रोवण्यासाठी असलेल्या खोबण्या दिसुन येतात. इमारतीच्या बांधकामासाठी ओबडधोबड दगड वापरलेले असुन आतील बाजुस चुन्याचा गिलावा दिलेला आहे. वास्तु दुमजली असल्यामुळे गावकरी या कोटास माडी म्हणुन ओळखतात. टेकडीचा आकार व स्थान पहाता कोटाचे इतर भाग असावेत पण आज ते पुर्णपणे नष्ट झाले आहेत. इतर कोणतेही अवशेष नसल्याने ५ मिनिटात कोटाची फेरी पुर्ण होते. टेकडीवरून दूरवर पसरलेला अथांग समुद्र तसेच इंद्रगड नजरेस पडतो. किल्ला म्हणुन स्थानिकांना या वास्तुची जाणीव नसली तरी या जागेला ते माडी म्हणुन ओळखतात. पोर्तुगीज हि दर्यावर्दी जमात. पोर्तुगालशी जलमार्गाने थेट संबंध ठेवता यावा यासाठी त्यांनी बहुतांशी कोट समुद्रकिनाऱ्यावरच बांधले. वसई ते दमण परिसरातील गढीकोट हे समुद्राशी समांतर रेषेत बांधलेले आहेत. साधारणतः १६व्या शतकात पोर्तुगीजानी उभारलेल्या या टेहळणीवजा कोटांचा मुख्य उपयोग जलमार्गाचे रक्षण करणे व प्रांतातील लहान मोठया कोटाना आवश्यक रसद पुरविणे हा होता. हे सगळे लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. इ.स.१७३७ ते १७३९च्या वसई मोहिमेदरम्यान हा कोट मराठ्यांच्या ताब्यात आला आणि पोर्तुगीजाचे या भागातून उच्चाटन झाले. झेंद अवेस्ता या पारशी ग्रंथात चाचे लोकांपासुन येथील समुद्रकिनाऱ्याचे रक्षण करण्यासाठी इ.स. १७५७ मध्ये मराठयांनी या किल्ल्याची दुरुस्ती केल्याचे उल्लेख येतात. कोटाची सध्याची अवस्था फारच दयनीय असुन कोट पाहण्यास १० मिनिटे पुरेशी होतात. किल्ला पाहण्याच्या हेतुने येणाऱ्याचा येथे हिरमोड होण्याची शक्यता आहे पण ज्यांना प्राचीन सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांची चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या स्थानास अवश्य भेट द्यावी. कोटावर मोठया प्रमाणात गवत वाढत असल्याने पावसाळ्यात कोटावर जाणे टाळावे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!