CHATALE KOT

TYPE : FORTRESS

DISTRICT : PALGHAR

HEIGHT : 0

GRADE : EASY

मुंबईमुळे कोकण प्रांताचे उत्तर कोकण व दक्षिण कोकण असे दोन भाग पडले आहेत. वसई ते दमण हा पट्टा उत्तर कोकण म्हणुन तर अलीबाग ते कारवार हा पट्टा दक्षिण कोकण म्हणुन ओळखला जातो. उत्तर कोकणवर बराच काळ पोर्तुगीजांची सत्ता असल्याने त्यांनी या भागाच्या रक्षणासाठी व कारभारासाठी किनाऱ्यालगत अनेक लहान-लहान कोट बांधले. यातील बहुतांशी कोटांची मोठया प्रमाणात पडझड झालेली असुन फार थोडे अवशेषरुपात शिल्लक आहेत तर काही कोट पुर्णपणे नष्ट झाले आहेत. काळाच्या पडद्याआड गेलेला व केवळ कागदोपत्री आपले अस्तित्व दर्शविणारा असाच एक कोट म्हणजे चटाळे कोट. चटाळे कोट जेथे होता त्या चटाळे गावास भेट देण्यासाठी पश्चिम रेल्वेचे सफाळे रेल्वे स्थानक हे जवळचे ठिकाण असुन रेल्वे स्थानक ते चटाळे हे अंतर साधारण ८ कि.मी.आहे. चटाळे येथे जाण्यासाठी बस तसेच रिक्षाची सोय आहे. काही वयोवृद्ध स्थानिक वगळता या कोटाची फारशी कोणाला माहीती नाही. हे लोक देखील या कोटास माडी म्हणुन ओळखतात. गावात असलेल्या तलावाकाठी हा कोट अस्तित्वात होता. आज तो पुर्णपणे भुइसपाट करून त्या ठिकाणी शाळा व ग्रामपंचायतीचे कार्यालय उभारण्यात आले आहे. हीच काय ती त्या ठिकाणाची ओळख. ... कोटाची पुर्णपणे पडझड झालेली असुन केवळ चौथरा शिल्लक असल्याने हे ठिकाण कचेरी कि कोट हे ठामपणे सांगता येत नाही. या कोटाचे स्थान व आकारमान पाहता या कोटाचा वापर पोर्तुगीजकालीन जकातीचे ठाणे अथवा कचेरी म्हणुन होत असावा. स्थानिक वयोवृद्ध लोकांशी चर्चा केली असता ते हे ठिकाण जकात (धान्य स्वरूपातील कर) जमा करण्याचे ठिकाण असल्याचे सांगतात. साधारणतः १६व्या शतकात पोर्तुगीजानी उभारलेल्या या टेहळणीवजा कोटांचा मुख्य उपयोग जलमार्गाचे रक्षण करणे व प्रांतातील लहान मोठया कोटाना आवश्यक रसद पुरविणे हा होता. हे सगळे लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणातील समुद्री मार्गावर आपले साम्राज्य वसवले. इ.स.१७३९च्या वसई मोहिमे दरम्यान हा परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला आणि पोर्तुगीजाचे या भागातून बस्तान उठले ते कायमचेच.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!