BIBI KA MAQBARA

TYPE : TOMB / MONUMENTS

DISTRICT : AURANGABAD

मोगलकाळात दख्खनमधील औरंगाबाद शहरात मुघलांनी उभारलेली सर्वोत्तम वास्तु म्हणजे बीबी का मकबरा. आग्रा येथे ताजमहालाच्या निर्मितीनंतर त्याच्याच धर्तीवर दख्खनमध्ये वास्तू असावी या दृष्टिकोनातून बीबी का मकबरा उभारण्यात आला. शहराच्या पश्चिमेस असलेल्या सिहांचल पर्वतरांगांच्या पायथ्याशी मकबरा उभारला आहे. मकब-यामध्ये केलेले कोरीव नक्षीकाम सर्वांनाच भुरळ पाडणारे असून याच्या निर्मितीसाठी काही ठिकाणी संगमरवरचा वापर करण्यात आला आहे. चारबाग पद्धतीवर मकब-याची निर्मिती झालेली आहे. मकब-याच्या सुरक्षेसाठी येथे भक्कम तटबंदी उभारण्यात आली असुन तटबंदीच्या चारही बाजूंना अष्टकोनी बुरूज आहेत.मोगलांच्या काळात पाण्याला विशेष महत्त्व होते. त्यामुळे बहुतेक वास्तू नदीच्या काठी उभारण्यात आल्या. यमुना नदीतीरी ताजमहाल तर बीबी का मकबरा खाम नदीच्या तीरावर उभारण्यात आला. बीबी का मकबरा कोणी बांधला यावरून अनेक मतप्रवाह आहेत. ... पुरातत्त्व खात्याने मकब-याबाहेर लावलेल्या माहितीफलकावर ही वास्तू औरंगजेबाचा मुलगा आझमशहा याने त्याची आई दिलरसबानो बेगमच्या आठवणीत उभारल्याचे म्हटले आहे. वास्तविक पाहता शासनाच्या औरंगाबाद गॅझेटियरमध्ये व कॅम्पबेल क्लाऊड या लेखकाने १८९८ मध्ये लिहिलेल्या ‘ग्लिम्प्सेस ऑफ निझाम डोमिनियन’ या पुस्तकातही मकबरा आझमशहाने बांधल्याचे नमूद केलेले आहे. परंतु मोगल बादशहांवर विपुल लिखाण करणा-या यदुनाथ सरकार यांनी औरंगजेबावर लिहिलेल्या पाच खंडांमध्ये आझमशहाचा जन्म १६५३ झाल्याचे म्हटले आहे. शिवाय जिन ट्रव्हेरनिअर यांनी ‘ट्रॅव्हल्स ऑफ इंडिया’ या पुस्तकात १६५३ मध्ये मकब-याच्या निर्मितीसाठी औरंगाबादजवळून ३०० बैलगाड्या संगमरवर जात असल्याचे दाखले दिले आहेत. जर मकब-याची निर्मिती १६५३ मध्ये झाली आणि आझमशहाही त्याच वर्षी जन्मला तर त्याने मकबरा कसा बांधला? इतिहास अभ्यासकांच्या मते १६३६-४४ दरम्यान औरंगजेब पहिल्यांदा दख्खनचा सुभेदार म्हणून शहरात आला. औरंगजेबाचा १६३७ मध्ये दिलरसबानो बेगमशी निकाह झाला. दिलरसबानो बेगमला राबिया-उल- दौरानी असेही म्हटले जाते. त्यानंतर १६४४ ला औरंगजेबाला काबूल, कंदाहार येथे पाठवण्यात आले. १६५२ मध्ये पत्नी दिलरसबानो बेगमसह पुन्हा आग्रा येथे औरंगजेबाचे आगमन झाले. त्या वेळी नुकतेच ताजमहालाचे काम पूर्ण झाले होते. ही वास्तू दिलरसबानो बेगमला प्रचंड आवडली. त्यामुळे तिने याची प्रतिकृती दख्खनमध्ये उभारण्याचा आग्रह धरला. दरम्यानच्या काळात १६५३ मध्ये दुस-यांदा औरंगजेबाला दख्खनमध्ये सुभेदार म्हणून पाठवण्यात आले. त्या वेळी औरंगजेबाने शहाजहानकडून बीबी का मकबरा उभारण्याची परवानगी मिळवली आणि येथे येऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. १६६० मध्ये मकब-याचे काम पूर्ण झाले. मकबरा हा अरबी शब्द असुन मकबरा याचा अर्थ कबर असा होतो. ताजमहाल उभारणा-या उस्ताद अहमद लाहोरी यांचा मुलगा अताउल्ला खान याने बीबी का मकब-याचे काम केले. या वास्तूच्या निर्मितीवेळी हसपतराय हे इंजिनिअर होते. बीबी का मकब-याच्या निर्मितीसाठी ६ लाख ६८ हजार २०३ रुपये सात आणे खर्च आला होता. काश्मीरमधील शालिमार गार्डननंतर मकब-यात सर्वात जास्त लांब पाण्याचे हौद आहेत. मकब-यातील बागांना पाणी देण्यासाठी नहर-ए-अंबरी, थत्ते हौद, हाथी कुआ यातून पाणी पुरवले जायचे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!