AUDUMBAR

TYPE : MEDIEVAL DATTA MANDIR

DISTRICT : SANGALI

सांगली जिल्ह्यात कृष्णा नदी काठी वसलेले तीर्थक्षेत्र औदुंबर हे दत्तक्षेत्र भारतातील अनेक दत्त स्थानापैकी प्रमुख दत्तक्षेत्र आहे. श्री दत्त संप्रदायात या क्षेत्राचे विशेष महत्त्व आहे. नरसिंह-सरस्वतींचा जन्म कारंजा म्हणजे वऱ्हाडातला, परंतु कृष्णाकाठ हीच त्यांनी आपली कर्मभूमी बनविली. त्यांच्या वास्तव्याने, तपाने आणि लोकोद्धाराच्या कार्याने कृष्णाकाठी औदुंबर आणि नरसोबाची वाडी ही दोन पवित्र क्षेत्रे निर्माण झाली आहेत. कृष्णा नदीच्या ऐलतीरावर भिलवडी आहे व पैलतीरावर औदुंबर हे क्षेत्र आहे. श्री नरसिंहसरस्वती हे श्रीदत्तात्रेयांचे दुसरे अवतार समजले जातात. त्यांच्या प्रभावाने महाराष्ट्रात दत्तसंप्रदाय सर्वत्र प्रसार पावला. त्यांचे हे कार्य इतके मोठे आहे की लोक त्यांनाच दत्तसंप्रदायाचे प्रवर्तक मानतात. त्यांनी सन १४४१ मध्ये औदुंबर येथे चातुर्मासात वास्तव्य केले, त्यामुळे औदुंबर हे महाराष्ट्रात दत्तस्थान म्हणून विशेष प्रसिद्ध पावले. कृष्णेच्या तीरावर वृक्षांच्या दाटीमुळे आपोआपच एकांतमय तपोवन निर्माण झाले होते. ... या निसर्गसिद्ध तपोवनात, औदुंबराच्या दाट शीतल छायेत नरसिंह-सरस्वतींनी एक चातुर्मासाचा काळ घालविला आणि या स्थानाला चिरंतन पावित्र्य प्राप्त करुन दिले. तेथून पुढील तपश्चर्येसाठी त्यांनी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे बारा वर्षं वास्तव्य केलं. स्वामींनी असे सांगितले आहे की, माझे वास्तव्य नेहमी औदुंबर या वृक्षात असेल. जो भाविक या वृक्षाची नियमितपणे पूजा करेल किंवा औदुंबर वृक्षाखाली गुरुचरित्राचे पारायण करेल त्याला केलेल्या पारायणाचे चांगले फळ मिळेल. औदुंबर या क्षेत्राची महती अशी आहे की, या ठिकाणी श्री संत जनार्दनस्वामी आणि श्री संत एकनाथ महाराजांना श्री दत्तदर्शन झाले. या पवित्र वातावरणात कृष्णेच्या पवित्र पात्रात स्नान करून आपणास श्रीदत्तपादुकांचे दर्शन घ्यावयाचे आहे. हा स्नानाचा घाट प्रशस्त आहे. कृष्णामाईची मनोमन प्रार्थना करुन आणि शुचिर्भूत होऊन दत्तदर्शनाला जावयाचे. घाटावरून सरळ पादुकांपर्यत जाता येते. हा घाट येथील ब्रम्हानंदस्वामींचे शिष्य सहजानंदस्वामी यांनी दत्तभक्तांकडून आर्थिक सहाय्य गोळा करून विसाव्या शतकाच्या प्रारंभी बांधविला आहे. मंदिराच्या गर्भगृहात श्री नरसिंह सरस्वतींच्या पादुका विराजमान आहेत. श्री च्या पादुकावर अंकलखोपचे देशपांडे यांनी घुमट बांधला. बाहेरील मंडप अगदी अलिकडच्या काळात बांधलेला आहे. औदुंबरांच्या छायेतून मंदिर प्रदक्षिणा करुन, वरच्या ’आजोबा’ वडाखालच्या वाटेने गेले की, ब्रम्हानंदस्वामींचा मठ लागतो. हे सत्पुरुष १८२६च्या सुमारास गिरनारहून औदुंबरक्षेत्री आले आणि इथेच एक मठी उभारून त्यांनी तपश्चर्या केली. या शांत, प्रसन्न आणि पवित्र वातावरणात त्यांच्या तपाला सिद्धीचे यश प्राप्त झाले आणि अखेर इथेच त्यांनी समाधी घेतली. त्यांच्याबरोबर मेरूशास्त्री नावाचे एक विद्वान गृह्स्थ होते. त्यांनी ब्रम्हानंदांच्या सहाय्याने ‘हठयोगप्रदीपिका’ या योगशास्त्रावरील प्रसिद्ध संस्कृत ग्रंथावर ’ज्योत्स्ना’ नावाची टीका लिहिली. ब्रम्हानंदांचे शिष्य सहजानंदस्वामी यांनी भक्त-भाविकांकडून वर्गणी गोळा करुन औदुंबरचा प्रशस्त घाट बांधण्याचे सत्कार्य केले. या ब्रम्हानंद मठातच श्री वासुदेवानंद सरस्वती (दत्तसंप्रदायातील एक अर्वाचीन सत्पुरूष) यांनी आपल्या जीवनसाधनेची पहिली पावले टाकली होती. पु़ढे या मठात श्रीनारायणानंदतीर्थ या नावाचे एक सत्पुरुष राहात असत. औंदुबरक्षेत्री चैत्रात कृष्णमाई उत्सव, श्रीपाद श्रीवल्लभ उत्सव, श्री नरसिंह सरस्वती जन्मोत्सव, दत्तजयंती असे उत्सव साजरे केले जातात. सांगलीकडून बसने थेट औदुंबरात पोहोचता येते. तेथे रहाण्या-जेवण्याची व्यवस्था होऊ शकते. शिवाय गावात धर्मशाळाही आहेत. अत्यंत रमणीय अशा या दत्तक्षेत्राला अवश्य भेट द्यावी.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!